सुभद्राहरण ७
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
मणिपूरचा त्याग करून अर्जुन समुद्र मार्गाने परमपावन तीर्थांचे दर्शन घेत घेत किनाऱ्याच्या रेषेने मार्गातील दानधर्म करत पुढे पुढे मार्गस्थ होत होता. अश्याच परमपुण्यवान तीर्थांचं दर्शन घेत असताना अर्जुनाच्या ध्यानात एक गोष्ट आली की, मार्गात पाच तीर्थ अशी आहेत की ज्यांचं दर्शन घेण्यासाठी ऋषीमुनी, साधू, तपस्वी, यात्रेकरू इत्यादी न जाता पुढे निघून जात आहेत.
त्या तीर्थांची नाव आहेत अगस्त्यतीर्थ, सौभद्रतीर्थ, परमपवित्र पौलोतीर्थ, अश्वमेधाचं पुण्य देणारं कारंधमतीर्थ, त्याचप्रमाणे पापनाशन महापुण्यवान भारद्वाजतीर्थ. अर्जुनाने बरोबरीच्या साधुजनांना पृच्छा केली
" आपण या परिसरातील सर्व तीर्थांचं यथोचित दर्शन घेता पण या पाच तीर्थांचं दर्शन घेण्यास्तव कोणीही का जात नाही. या मागे काय कारण आहे मी जाणून घेऊ इच्छितो."
एक अनुभवी आणि वयोवृद्ध तपस्वी म्हणाले
" हे धनंजया , या पाचही तीर्थांमध्ये पाच मगरी राहतात. ज्या त्या तीर्थात स्नान करणाऱ्याला जलामध्ये ओढून नेतात. म्हणून त्या पाचही तीर्थाना टाळून सर्व साधू, यात्री , धर्मज्ञानी बाकीच्या तीर्थांचं दर्शन घेतात. तू ही त्याचप्रमाणे कर."
याच प्रकारचं कथन बाकीच्यांनी करून अर्जुनाला त्या तीर्थाना जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु निडर, बलवान व पराक्रमी अर्जुन आपल्या निश्चयापासून तसूभरही ढळला नाही. तो सर्वांना प्रणाम करून त्या तीर्थांच्या दिशेने मार्गक्रमण करता झाला आणि भारद्वाज या तीर्थात स्नान करण्यासाठी उतरला.
अर्जुन जलात उतरून स्नान करत असतानाच एक अजस्त्र ग्राह अर्थात मगर आली. जिने त्वरेने अर्जुनाचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. अर्जुन चपळाईने आपल्याला सोडवून त्या ग्राहासह जलाबाहेर आला. जलाबाहेर येताच त्या ग्राहाचे रूपांतर उत्तम शृंगारीत व आभूषण धारण केलेल्या एका युवतीमध्ये झालं. त्या दिव्य स्वरूप युवतीला पाहताच अर्जुन वदला
" हे कल्याणी तू कोण आहेस या जलात या देहात तू कशी आलीस. पूर्वजन्मी तू असं कोणतं पापकर्म केलंस ज्यायोगे तुला ही शिक्षा प्राप्त झाली."
" हे महाबाहो ! मी नंदनवनात विहार करणारी एक अप्सरा आहे. माझं नाव वर्गा आहे. मी कुबेराची प्रेयसी होते. माझ्या अजून चार सख्या पण आहेत. त्यादेखील अत्यंत रूपवान आहेत. एके दिवशी आम्ही कुबराकडे निघालो होतो. वाटेत एक वनप्रदेश लागला. त्या वनात एक तेजस्वी व रूपवान ब्राम्हण उग्र तपश्चर्येला बसला होता. त्याचं अफाट तेज जणू त्या संपूर्ण वनप्रदेशात सूर्याच्या किरणांप्रमाणे पसरलं होतं.
अर्थात त्याच्या प्रभावळीमुळे सूर्यकिरणे देखील वनात प्रवेशास धास्तावत होती. मी, सौरभेयी , समीची, बुदबुदा आणि लता आम्ही पाचही जणी त्या सुस्वरूप ब्राम्हणाच्या तपाचा भंग करण्याच्या उद्देशाने अवकाशातून अवनीवर त्या वनप्रदेशात उतरलो."
क्रमशः
भाग ७ समाप्त
३१/०३/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment