Skip to main content

सुभद्राहरण २४

सुभद्राहरण २४

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

महायोगीच्या बाणांचा सामना कुणीही करू शकत नव्हतं. अर्थात त्याचवेळी काही जण बलरामदादा यांच्याकडे पोहोचले. 

" बलरामदादा घात झाला , घात झाला."

" अशी काय गोष्ट घडली यादव सैन्य उपस्थित असताना, की तू इतका धावत आला आहेस." 

" महाराज ते महायोगी आपल्या भगिनी देवी सुभद्रा यांना आपल्या रथात उचलून घेऊन उत्तर दिशेने प्रस्थान करते झाले. अर्थात त्यांनी देवी सुभद्रेचे हरण केले आहे.  आम्ही त्यांच्या मागोमाग जाऊन त्यांचा पाठलाग केला पण व्यर्थ." 

" व्यर्थ म्हणजे ........"

"त्यांच्या बाणांच्या वर्षावापुढे आमचा काही टिकाव लागला नाही. किंबहुना त्यांनी धरेपासून आकाशापर्यंत तिरांची भिंत उभी केली की आम्ही पुढे जाऊच शकलो नाही.  एकूणच  त्यांच्या धनुष्याच्या कौशल्यापुढे विश्वात कोणीही टिकाव धरू धजावेल असं वाटत नाही, इतके ते महायोगी कुशल धनुर्धारी आहेत." 

बलराम दादांनी त्वरेने समस्त यादवदळ युद्धसज्ज करून त्या महायोगीच्या मार्गावर प्रस्थान करण्याची आज्ञा द्या असा आदेश सैन्याला पाठवला. भोज, वृष्णी आणि अंधक वंशाचे लोक त्वरेने आपला उत्सव सोडून व शस्त्रसज्ज होऊन आज्ञेच्या प्रतीक्षेत उभे राहिले. इकडे दादा त्वरेने त्या योग्याचा शोध घेऊन सुभद्रेच्या हरणाचा प्रतिशोध घ्यावा या मताला दृढ आहेत.

परंतु ते कृष्णाच्या मताच्या प्रतीक्षेत आहेत. तिथेच उपस्थित असलेल्या, परंतु सर्व पाहत उभ्या असलेल्या कृष्णाला पाहून दादा म्हणाले

" कान्हा तू तर काहीच बोलत नाहीस. या यक्षप्रश्नाबद्दल तुझं मत काय आहे. मी स्वतः युद्धाच्या बाजूने आहे. साम दाम सुभद्रेला त्या योग्याच्या हातून सोडवून त्याला इथे आणून, त्याच्या या उद्दंड कृतीबद्दल त्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी हा माझा मानस आता दृढ झाला आहे." 

कृष्ण पुढे येत स्मित करून म्हणाला

" मुळात एक गोष्ट प्रत्यक्षदर्शींच्या कथनावरून स्पष्ट होते कि तो महायोगी सामान्य नक्कीच नाही. तो एक कुशल धनुर्धारी आहे हे नक्कीच. मला सांगा दादा की, समस्त जगतात आजपर्यंत जीवित वा गत काळात, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी दोनच होऊन गेले. एक भार्गवराम आणि दुसरे श्रीराम. यांच्या नन्तर आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाव्यतिरिक्त कोणी असूच शकत नाही, जो सुभद्रेचं हरण करण्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि आत्मिक क्षमता बाळगतो. 

आपण युद्धाला गेलो तरी त्याच्या दिव्य अस्त्रशक्तींपुढे आणि धनुर्धर विद्येपुढे तुमचाच काय पण माझाही पाडाव लागणार नाही. याशिवाय त्याला भगवान महादेवांकडून कवच आणि किरीट प्राप्त झालेली असल्यामुळे तो विश्वात अजेय आहे. मी तर असही ऐकलय की स्वतः अंजनीसुत श्रीहनुमान त्याच्या वर प्रसन्न आहेत आणि  ध्वजावर आरूढ आहेत. याकारणेही तो अपराजित आहे. किंबहुना जर मी त्याच्याशी युद्धास गेलो तर तो मलाही बंदी बनवून आपल्याला त्रास देऊ शकेल. 

मला तर अजून एक संशय ग्रासतोय की, दादा आपला सुभद्रे बाबतचा बदललेला विचार कर्णोपकर्णी  त्याला ज्ञात झाला असेल, तर क्रुद्ध होऊनसुद्धा तो सुभद्राहरणास प्रवृत्त झाला असेल. कारण विश्वात सुभद्रेइतकी सुस्वरूप व गुणवान कन्या आणि अर्जुनासारखा श्रेष्ठ पुरुष नाही हे आपणही जाणता." 

" परंतु आता तुझा परामर्ष काय आहे." 

" दादा प्राप्त स्थितीत मला असं वाटतं की, आपण अर्जुनाला सन्मानपूर्वक आमंत्रित करून, विधिवत त्याचा विवाह सुभद्रेशी करून घ्यावा. यामुळे होणारा कालापव्यव व प्रतिमा हानी टळून योग्य तेच  प्रस्थापित होईल. याशिवाय दादा आपला पूर्वी मानस सुभद्रा अर्जुन विवाहास अनुकूल होताच. 

तरीही यानंतर दुर्योधनाच्या गैरमर्जीबाबत आपण चिंतीत असाल तर, ते कार्य आपण ज्येष्ठ पांडुपुत्र धर्मराज युधिष्ठिर यांच्या शिरावर सोपवू. मग तर आपण निश्चीन्त असाल ना.  सर्व काही आपल्या मर्जीने आणि मनिषेप्रमाणे होईल. आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. मी फक्त माझं मत व्यक्त केलंय. परंतु आपण म्हणाल त्यानुसार कार्य वा कृती करू." 

श्रीहलधर विचारमग्न झाले.

क्रमशः

भाग २४समाप्त

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...