सुभद्राहरण २९
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
अर्जुनाच्या स्वागताची मिरवणूक मोठ्या धामधुमीत राजप्रसादापर्यंत आली. त्यातही जवळजवळ एक प्रहर लोटला. कारण वाटेत आगतस्वागत, नृत्य यांसह मिरवणूक हळूहळू चौकाचौकात फिरत फिरत पुढे पुढे सरकत होती. संपूर्ण द्वारकेच्या घरचं कार्य असल्याप्रमाणे सर्व नगरवासी यात उत्साहाने नवीन वस्त्रप्रावरणं परिधान करून सहभागी झाले होते.
राजप्रासदाच्या मुख्य द्वारापाशी, अर्जुनाचं जल क्षीर यांनी चरण धुवून ओवाळून, पुन्हा एकदा स्वागत करून त्याला राजप्रसादातील विशेष कक्षात अर्थात विशेष महालात नेण्यात आलं. तिथे गेल्यावर पिताश्री वसुदेव यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अर्जुनाला मोठ्या आनंदाने सांगितलं की उद्यापासून चार दिवसाचा लग्नसोहळा सुरू होईल आणि यथाविधी सुभद्रेचा अर्जुनाशी विवाह होईल. वरपक्षातर्फे तुझा सोबती कृष्ण स्वतः असेल.
कृष्ण स्वतः जातीने त्याच्या सोबत होता. कारण यावेळी तो दुहेरी भूमिकेत होता. अर्जुनाचा सखा म्हणून वरपक्षातर्फे आणि बंधू म्हणून वधूपक्षातर्फे. अर्जुनाचा बारा वर्षांचा कालावधी संपायला अजून एक वर्ष बाकी असल्याकारणाने खांडव प्रस्थाहून कोणी येणं शक्य नव्हतं. अर्जुन आणि कृष्ण यांना तिथेच सोडून बाकी समस्त राजपरिवार मुख्य महालातील आपापल्या कक्षात गेला.
सर्व सेवाकवर्गाला आवश्यक सूचना, पुढील चार दिवसांच्या कामाच्या देऊन मुख्य सेवकावर सर्व जबाबदारी सोपवून बलरामदेखील तिथून प्रस्थान करता झाला. कार्य इतक्या जलद आणि उद्यावर येऊन ठेपलं असल्यामुळे प्रत्येकावर विशेष जबाबदारी आली होती. मुख्य भार हा बलरामदादांवर होता. तुलनेने कृष्णाकडे हलकं काम।होतं. वरपक्षातर्फे राहून अर्जुनाच्या बरोबर राहणं आणि त्याला काय मिळतंय , काय हवंय याची काळजी घेणं.
अर्थात ही व्यवस्था स्वतः दादांनीच केली होती. कारण त्यांच्यामते विवाह म्हणजे राजकारण व रण नव्हे. रणात व राजकारणात कुशल कान्हा इथे काही गडबड करून ठेवेल त्यामुळे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी मलाच सर्व बघावं लागेल. तसही अर्जुनाकडून कोणी नसल्यामुळे आणि कृष्ण हा अर्जुनाचा बंधू असूनही सखा म्हणून त्यांचे ऋणानुबंध हे अद्वितीय होते. हे बलरामदेखील मान्य करत असे.
सर्वजण आपापल्या जबाबदारीच्या कार्याला जुंपला गेला. कृष्ण अर्जुनाला त्याच्या तिर्थयात्रेच्या कथा विस्ताराने विचारून त्याच्या मनाचा भार हलका करत होता. या दोन दिवसातील घडलेल्या सर्व प्रकारात कृष्णाचा सल्ला, मार्गदर्शन, सहभाग, पाठिंबा हा अलौकिक होता हे अर्जुन कृष्णाला सांगत होता.
कृष्ण त्याला म्हणत होता अरे तुझ्यासारखा उत्तम पुरुष जर पती म्हणून माझ्या लाडक्या भगिनीला मिळत असेल तर मी का नको यात सहाय्य करू. माझाही स्वार्थ आहेच यात. याकारणे तू जास्त न्यून वाटून घेऊ नकोस. मी फक्त माझ्या सुभद्रेचे सुयोग्य जागी स्थिर होणे कसे होईल हेच पाहिले. नव्हे तर बंधू म्हणून माझं ते कर्तव्यच आहे.
कित्येक वेळ दोघांच्या अश्याच।वार्ता चालू होत्या आणि संपूर्ण द्वारका विवाहाच्या तयारीला लागली होती.
क्रमशः
भाग २९ समाप्त
२३/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment