सुभद्राहरण २५
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
श्रीहलधर विचारमग्न झाले. काही क्षण विचार करून त्यांनी आपला मानस सांगण्याचा यत्न करण्याआधी वसुदेव व देवकी तिथे आले. त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला होताच. बलराम दादांच्या जवळ येत वसुदेव म्हणाले
" बलराम आम्हाला अर्जुन हा जामात म्हणून स्वीकृत होताच आणि आहे. तस्मात तू काहीही इतर विचार न करता कृष्णा सह अर्जुनाच्या मार्गावर वायूवेगाने प्रस्थान कर आणि त्या दोघांनाही आमंत्रित करून श्रद्धापूर्वक घेऊन ये. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी द्वारकेच्या वेशीवर सर्व तयारीनिशी उपस्थित राहतो. तुम्ही दोघांनी त्वरित प्रस्थान करा."
बलराम आणि कृष्ण माता पित्याना वंदन करून त्वरित प्रस्थान करतात. आपल्यासोबत पूजाविधी साहित्य घेऊन जाण्यास विसरत नाहीत , कारण आता अर्जुन सर्वसंमतीने वसुदेव देवकी यांचा जामात होणार होता. त्याकारणे त्याला विधिपूर्वक आमंत्रित करणे उचित होते.
इकडे अर्जुन सुभद्रा काय करत आहेत ते पाहूया. अपहरण झाल्यापश्चात एक क्षण क्रुद्ध आणि स्तब्ध झालेली सुभद्रा अर्जुनास पाहताच लज्जित झाली. कारण तिने आजपर्यंत पाहिलेल्या पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ , चित्ताकर्षक, सुयोग्य, मनमोहक अर्जुनच होता. तिलाही तो प्रथमदर्शनी मनोमन भावला होताच. फक्त तसं सांगण्याची वेळ कधी आली नव्हती.
अर्जुनाशी संबंध कोणत्या तरुणीला नको असेल. अर्थातच सुभद्रा लुब्ध झाली. मागे लागलेल्या सैन्याला पळवून लावल्यानंतर, अर्जुनाने रथ सुरक्षित उंच स्थान पाहून थांबवण्यास सांगितले. दारकाने रथातून उतरून अधिक उंचीवर जाऊन द्वारकेच्या मार्गावर आपली नजर रोखली जेणेकरून कोणी आल्यास त्याप्रमाणे अर्जुनास सावध करता येईल. दारूक उतरून गेल्यापश्चात, अर्जुनाने प्रेमभराने सुभद्रेकडे पाहिले. तिने अर्थात लटक्या रागाने पहात म्हटले
" इतकी धिटाई करण्याचे काय प्रयोजन, आर्यपुत्र"
" अर्थातच जी व्यक्ती वा स्त्री एखाद्या पुरुषाला भावली तर त्याने तिच्या प्राप्तीस्तव धिटाई करणे गरजेचे आहे. परंतु ही धिटाई काही माझ्या एकट्याच्या निर्णयाने केली नव्हती."
" अर्थात"
" अर्थात देवी सुभद्रे , या कार्यात प्रत्यक्ष मुलीच्या बंधुची संमती मला प्राप्त होती. नव्हे तर तू प्रथमदर्शनी माझ्या हृदयात मारलेला तिर मला लागल्यानंतर आणि माझी घायाळ अवस्था प्रत्यक्ष कृष्णाने अर्थात तुझ्या बंधूने स्वतः पाहिली होती."
सुभद्रा अर्थातच या क्षणी लज्जायुक्त भावाने खाली मान घालून स्मितवदन अर्जुनाचं कथन ऐकत होती.
" कृष्णाच्या हे लक्षात आलं हे मला लगेच कळलं. म्हणून मग त्यालाच मी तुझ्या प्राप्तीचा मार्ग विचारला आणि त्याच्या सल्ल्या नुसार कृती केली. एक गोष्ट तुझ्या ध्यानात आलीच असेल ?."
" कोणती "
" प्रत्यक्ष वासुदेवाची भगिनी मी हरण करून नेत असताना दारूक मला यात कशी साथ देईल, कृष्ण संमतीशिवाय."
" हो आपण मला धिटाईने उचलून रथात घेतलेत, त्या एका क्षणापूरती मी भांबावून भयभीत झाले. परंतु एका क्षणात आपलं रूप कळताच ही बाब माझ्या ध्यानात आलीच की, दारूक कसा काय आपल्या आज्ञेनुसार कार्य करत आहे. तेव्हाच या सर्व हरण नाट्याचा सूत्रधार कोण आणि कार्यकर्ता
कोण ते ध्यानात आलं."
" अर्थातच गोविंदाची भगिनी म्हणजे इतकी चलाख बुद्धी असलीच पाहिजे."
लाजून , हसून पुन्हा भानावर येत सुभद्रा शंकातूर नजरेने म्हणाली.
" परंतु आर्यपुत्र, आपण इंद्रप्रस्थास प्रस्थान न करता का थांबलो आहोत. अश्याने क्रुद्ध झालेले दादा आणि यादव दळभार घेऊन येतील आणि संकट समोर उभे राहिल. आपणास याच भय वाटत नाही का"
" सुभद्रे एकतर ज्याच्या पाठी कृष्ण उभा आहे त्याला कसले भय. दुसरं माझ्या सामर्थ्यावर माझा पूर्ण विश्वास व वासुदेवा वर नित्य आणि पूर्ण श्रद्धा व निष्ठा आहे त्याला याचे कसले भय."
" तरीही"
सुभद्रेला आश्वस्त करत अर्जुन वदला.
क्रमशः
भाग २५ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment