सुभद्राहरण ३३ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
दादा परतून गेले आणि काही काळ शांततेत गेला. कृष्णाने अर्जुनाला पुढील यात्रेच्या व्यवस्थेबाबत विचारले. अर्जुन म्हणाला
" अजून एक संवत्सर बाकी आहे बारा संवत्सर पूर्ण होण्यास. त्यामुळे हा एक संवत्सराचा काळ पुष्कर क्षेत्री सुभद्रेसह व्यतीत करून ततपश्चात इंद्रप्रस्थास परत जाईन असा मानस आहे."
कृष्ण यावर समाधान व्यक्त करून ठीक आहे म्हणाला. इतक्यात दादांचा संदेश आला आणि मागोमाग उग्रसेन, माता देवकी, पिता वसुदेव, दादा बलराम आणि निवडक यादववीर येताना दिसले. सर्वांनी विविध रंगांचे गर्भरेशमी वस्त्र परिधान केल्यामुळे संपूर्ण परिसर शोभून दिसत होता. माता देवकी पुढे झाली. तिने क्षीर जल यांनी अर्जुनाचं पाद्य पूजन केलं. त्याला ओवाळलं.
अर्थात कृष्णसखा आज वर पक्षाकडून असल्याकारणे त्याचाही उचित मानसन्मान मातेने केला. राजा उग्रसेन पिताश्री वसुदेव यांनी स्वतः अर्जुनाला, त्याच्या साठी खास सुशोभित केलेल्या, रथात कृष्णासह बसवलं. सर्वजण आपापल्या रथात आरूढ झाले आणि सर्व लवाजमा यथावकाश विवाहस्थानी अर्थात सभामंडपात पोचला. तिथे पुरोहितवर्ग , समस्त यादव नरनारी विविध रंगी आणि विविधांगी वस्त्र अलंकार यांनी सजून नटून थटून उपस्थित होते.
लाडक्या सुभद्रा राजकन्येचा विवाह, तोदेखील श्रेष्ठ धनुर्धर महावीर पांडुपुत्र अर्जुन यासोबत, आहे ही फक्त राजपरिवार नाही तर समस्त द्वाराकवासीयांसाठी भाग्याची गोष्ट होती. कारण कार्य प्रत्येकाच्या घरचच होतं. इतका स्नेहबंध राज परिवार आणि प्रजाजन यांच्यात दृढ होता आणि वेळोवेळी तो वृद्धिंगत होत असे.
सर्व रथ संभामंडपाच्या समीप पोचल्यानन्तर वसुदेव आणि माता देवकी त्वरेने पुढे येऊन अर्जुनाला रथातून उतरवून, लाल रंगाच्या गुलाब पाकळ्यांनी खास तयार केलेल्या आकर्षक पायघड्यांवरून नेत, सभामंडपात घेऊन आले. सर्वत्र वाजंत्री, सनई चौघडे यांचा मधुर नाद गुंजत आहे. रथातून उतरलेल्या नर नारायण जोडीला अर्थात कृष्णार्जुन यांना पहायला प्रत्यक्ष सूर्यनारायण समीप आले आहेत असाच भास होत आहे.
इंद्रादी देव, अष्ट वरुण, दशदिशांचे अधिपती अवकाशात आपापल्या स्थानी स्थिर होऊन हा विवाह सोहळा पाहण्यास सज्ज झाले आहेत. कृष्णाचर्येवरील अष्टसात्विक भाव, आपल्या प्रिय सख्याच्या, आपल्या प्रिय भगिनीसोबतच्या विवाहांनिमित्ताने, अतिप्रसन्न झाले आहेत. जणू शतसुर्याने आपले तेज त्यावर स्थापित केल्यामुळे कृष्णाच्या चर्येवर सुख समाधान शांती यांनी वास केला आहे, असाच भास होत आहे.
अर्जुन ज्याला नरश्रेष्ठ वा पुरुषश्रेष्ठ सबोधणं हा त्या शब्दाचा मान ठरेल, असा तो धनंजय आज जणू इंद्रासम तेजस्वी, बृहस्पतीसम बुद्धिमान व ज्ञानी, शुक्रासम आकर्षक आणि मदनासम सर्वांचे चित्त वेधून घेत आहे. गुलाब पुष्पांच्या पायघड्यांवरून चालताना अर्जुन जणू स्वर्गात देवादिकांनाही लाजवेल इतका बहुआकर्षित दिसत आहे. स्वतः शक्र अर्थात इंद्रदेखील आपल्या या अंशावर आज महद प्रसन्न दिसत आहे.
अर्जुनासह सर्वजण पायघड्यांवरून चालत चालत मुख्य विवाह स्थानी पोहोचले, जिथे पुरोहितगण त्यांच्या प्रतीक्षेत होते. अर्जुन हा वसुदेवांच्याच एका भगिनीचा अर्थात माता कुंतीचा पुत्र असल्यामुळे त्या स्थळी उपस्थित त्यांची भगिनी अर्थात अर्जुनाची मावशी पतीसह अर्जुनाच्या विवाहाचे सर्व विधी पार पाडण्यास उपस्थित होते.
सर्व उपस्थित होऊन स्थिरस्थावर झाले आणि पुरोहितांनी मंत्रोच्चाराला सुरवात केली आणि विवाहविधीं प्रारंभ झाले.
क्रमशः
भाग ३३ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment