सुभद्राहरण ३०
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
संपूर्ण द्वारका विवाहाच्या तयारीला लागली होती. प्रजेने आपल्या घरांना साफसफाई करून सजवलं. तोरणं, माळा, रंगीबेरंगी रांगोळ्या, नानाविध फुलांची सजावट यांनी संपूर्ण द्वारकाच जणू एका नववधू सारखी दिसायला लागली. विवाह सोहळा उद्याच असल्याने अत्यंत कमी वेळात पण कुशलतेने द्वारकावासीयांनी सर्व द्वारका सजवून नटवून आधीच असलेल्या सोन्याच्या द्वारकेला अजूनच रूपवान केलं.
रात्री कृष्ण अर्जुन महालातील पहिल्या माळ्यावरील छतावर जाऊन शांतपणे वार्ता करत असताना त्यांनी दिव्याच्या रोषणाईत सुशोभित द्वारका पाहिली आणि त्या नयनरम्य दृश्यात हरवून गेले. रात्रीचा पहिला प्रहर संपत आला होता आणि कृष्ण भानावर येऊन अर्जुनाला म्हणाला
"अर्जुना, तुला निद्रा न येणं मी समजू शकतो. परंतु मला तसा काही स्वप्नसोहळा जगायचा नसल्यामुळे, मला तर अतिनिद्रेने पूर्ण ग्रासले आहे.त्यामुळे मला माझ्या महाली जाऊन निद्रेच्या आधीन व्हावेच लागेल. शिवाय उद्यापासून सुरू होणारा लग्नसोहळा हा आम्हाला कार्यार्थ आहे. तुला जरी पुढची स्वप्न बघण्याचा हक्क मिळाला असला तरी आम्ही कार्य केलं तरच तुझं स्वप्न सत्यात येईल"
" केशवा तू सुद्धा "
एवढं बोलून दोघेही मनमुराद हसले आणि कृष्णाने अर्जुनाचे दोन्ही हात हातात घेतले, त्याला आलिंगन दिलं आणि खांद्यावर हात थोपटून निरोप घेत तिथून आपल्या महाली निघाला. मार्गात सुभद्रेचा महाल लागला. अजूनही तिथे जाग होतीच परंतु हास्यविनोदाचे आवाजही येत होते. बहुतेक सुभद्रेच्या सख्या तिची छेड काढून थट्टा करून हसत होत्या. जाता जाता एकदा डोकावून जाऊया या विचाराने कृष्ण आत गेला. अर्थात आधी तसा संदेश धाडला.
कृष्ण आल्याचा संदेश आला आणि सुभद्रा त्वरित बाहेर आली. सख्या एकदम शांत झाल्या. बाहेर येऊन सुभद्रा कृष्णाला हाताला धरून आत घेऊन येत म्हणाली
" कान्हा तुला कधीपासून अनुमती लागायला लागली माझ्या महाली येताना."
" आतापर्यंत नव्हती लागत पण आता सवय केली पाहिजे संदेश पाठवायची. कारण आता तू एकटी नसशील आपल्या महाली. कुणीतरी असणार आहे. म्हणजे खाजगीची काही वार्ता वगैरे वगैरे असेल. आम्ही कसे काय न सांगता आत येऊ शकतो ?. काय ग सख्यानो ? बरोबर ना ?."
त्यावर सर्व सख्या एकाच सुरात हो बरोबर म्हणाल्या. सुभद्रा लाजून म्हणाली
" कान्हा आता तू पण का. इतका वेळ ह्यादेखील त्रासच देत आहेत, मला. चहाटळ कुठल्या."
त्यातीलच एक सखी म्हणाली
" बरोबरच आहे कान्हा आता आपलं बोलणं हा त्रासच आहे. कारण स्वतः जाऊन त्यांचे मधुर बोल ऐकून आली आहे. आता काय त्यांच्या वाणीचे वेध लागले असतील."
कृष्ण म्हणाला
"तुमचं चालू दे मी येतो उद्यापासून खूप कार्य करायचं आहे."
कृष्णाने प्रेमाने सुभद्रेच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो तिथून निघून गेला. कृष्णाला जाताना बघून विचारात गढून गेलेली सुभद्रा पुढील वाक्याने भानावर आली.
" तिने कधी बाई आवाज ऐकला" दुसरी सखी.
"तुला काहीच माहिती नाही का. अग ते नाही का हिने अर्जुनाला पळवून नेलं होतं तेंव्हा." पहिली सखी
" मी नाही तर अर्जुनानेच मला म्हणजे त्यांनीच मला पळवून न्यायचं ठरवलं होतं, नव्हे पळवलंच होतं. कृष्ण नसता तर......." सुभद्रा
"तर............ म्हण की तर एव्हाना विवाह होऊन आम्ही मार्गीसुद्धा लागलो असतो. उलट तुमच्यामुळेच सर्व लांबलं चार पाच।दिवस आणि म्हणूनच आपला त्रास होतोय. सर्व यादवानी जाऊन पुन्हा परत आणून सर्व गोष्टी विनाकारण लांबवल्या. अन्यथा आतापर्यंत सुभद्रेचा गांधर्वविवाह होऊन पुढील सिद्धीची तयारी झाली असती."
यावर चवथी सखी म्हणाली.
"आणि गांधर्वविवाह हा शास्त्रसंमत असल्याकारणे सर्वच सुकर झालं असतं , आतापर्यंत."
यावर सुभद्रा म्हणाली
तुम्हींजर अशीच चेष्टा करणार असाल तर ................"
तिचं वाक्य अर्धवट कापत एक सखी म्हणाली.
क्रमशः
भाग ३० समाप्त
२४/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment