Skip to main content

सुभद्राहरण ३२

सुभद्राहरण ३२ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा 

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

सुभद्रेला अनेक गोष्टी सांगून तिला भावी उत्साहवर्धक काळाचा विचार करण्यास सांगून माता देवकी आपल्या महाली प्रस्थान करती झाली. सर्व महालांमधले दिवे मंद झाले . सेवकवर्गदेखील शांत निजला आता प्रहरी सोडून समस्त द्वारका काही घटिकांसाठी शांत झाली. सर्व घरांमधून मंद दिव्याच्या उजेडात सजलेली द्वारका अवकाशातून विलोभनीय दिसत होती, अगदी इंद्राच्या अलंकापुरीहून सुंदर. 

ब्राम्हमुहूर्त झाला आणि सेवकवर्ग प्रथम उठला आणि चार दिवसाच्या विवाहसोहळ्याच्या तयारीला लागला. उठल्या बरोबर प्रत्येकाची लगबग वरिष्ठांच्या सूचना, उपसूचना, कनिष्ठांकडून त्याचं पालन,  अर्थात सर्व कार्य आदेशानुसार सुरळीत होऊन सर्व विधी यथासांग पार पडावेत, हाच सर्वांचा भाव होता. कारण आपल्या सुभद्रेचा विवाह आहे आणि तो देखील महावीर अर्जुनासह हाच भाव दृढ होता सर्वत्र.

मातांसह सर्व स्रीवर्ग उठून कामाला लागला. मातेने तीन चार सख्यांना दिवसभराच्या कार्याचा पाढाच वाचला होता. पण त्यातही त्या सख्या अत्यंत हर्षित होत्या. कारण त्यांना दिलेल्या कार्यात मुख्य कार्य, विविध विधींसाठी, सुभद्रेला नटवणं सजवणं हेच होतं. तिच्या वस्त्रालंकरांची सर्व व्यवस्था त्या सख्यांना दाखवून, पुन्हा एकवार आपल्या कन्येला ममत्वाने पाहून, तिच्या डोक्यावरून हात फिरवून माता देवकी परत मुख्य सभागृही आली. 

महाराज उग्रसेन, श्रीवसुदेव आधीच तेथे येऊन उपस्थित होते. सर्व सेवकवर्ग, मंत्रीवर्ग, अधिकारी, अक्रूर, गद आदी महामंत्री देखील दादा बलराम यांच्या आज्ञेस्तव उभे होते. लग्नाचे मुख्य सभागृह म्हणजे एका विस्तीर्ण पटांगणात उभारलेले होते. चहुबाजूंनी उभारलेल्या मजबूत बांबूच्या आधारावर रंगीबेरंगी उंची कापड आच्छादून त्याला फुलं, माळा, रत्नजडित मोत्यांची सजावट करून, झालरी लावून  डौलदार करण्यात आलं होतं. दादातर एक क्षण देखील उसंत न घेता अखंड आदेशांचा पाट सोडत होते आणि त्यांची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानून समस्त यादववीर त्यानुसार आदेश सिद्धीस नेत होते.

इकडे अर्जुनाच्या महाली, ब्राम्हमुहूर्तीच कृष्णाने संदेश धाडला की, मी, अर्थात कृष्ण, काही काळात तेथे आवरून पोचतोच आहे, तद्वत त्याने तयार राहून प्रतीक्षा करावी. त्यानुसार नित्यकर्मे उरकून अर्जुन तयार होत असतानाच कृष्ण आपलं सर्व आवरून, वस्त्र अलंकार यांनी सुशोभित होऊन पोहोचला. पुढील अर्धा प्रहर अर्जुनाला विवाहासाठी सज्ज करण्यात गेला. परंतु उंची वस्त्र , अलंकार, बाहुभूषणं, मनगट्या, अमूल्य मोत्यांच्या माळा, राजसी वेशभूषा, कर्ण आभूषणे यांनी मुळात देखणा आणि राजबिंडा असलेला अर्जुन आता साक्षात मदनच दिसत होता.

सर्व आवरून झाल्यावर कृष्णाने दादांच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करू अस ठरवून अर्जुन आणि कृष्ण हे  दोन सखे वार्तालाप करत बसले. इतक्यात दादांची स्वारी अर्जुनाच्या महाली येताना दिसली आणि कृष्ण दादांच्या चरणास्पर्शा साठी पुढे गेला. त्यांना चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेऊन म्हणाला

" नवरदेव सजून तयार आहेत आणि आपल्याच आज्ञेच्या प्रतीक्षेत आहेत." 

दादा लगेच म्हणाले

" कृष्णा, वराला आदेश देणारा मी कोण. मी तर वधूचा बंधू. आज तू वराकडून आहेस. त्यामुळे आज तूच वरपक्षातर्फे आज्ञा देऊ शकतोस आणि आम्ही त्यानुसार करू. काय?, अर्जुनदेवा." 

यावर अर्जुन म्हणाला

" दादा कितीही स्तुतीपर बोललात तरी मी हे जाणतो की आपण ज्येष्ठ आहात. ज्येष्ठांचं आदर प्रत्येक वीराला शोभा देतो. आपणच आदेश द्यावा, आम्ही त्यानुसार वर्तन करू." 

" अर्जुना तुझा हाच स्वभाव मला अत्यंत प्रिय आहे. नम्र आणि विचारशील. कुंती आत्याचे संस्कार आहेत हे." 

अर्जुनाने अर्थातच बलरामदादांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद गेला. दादा पुढे म्हणाले

" मी, तुमची तयारी कितपत झाली आहे, तेच बघायला आलो होतो. तुम्ही तयार आहात म्हणजे मी आता संदेश धाडीन, त्यानंतर तुम्ही तयार रहा. पिताश्री माताश्री आणि वडील मंडळी येतील रितीनुसार अर्जुनाला विवाहमंडपी घेऊन जायला.  तेंव्हा तयार रहा." 

 त्यांच्या आदेशावर दोघांनीही होकारार्थी मान हलवली आणि दादा लगबगीने तिथून रथारुढ होऊन प्रस्थान करते झाले.

क्रमशः

भाग ३२ समाप्त

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...