सुभद्राहरण १९
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
रुक्मिणी रथारुढ होऊन कृष्णाच्या प्रतीक्षेत आहे आणि अर्थातच आता सर्वांचं लक्ष कृष्ण व कृष्ण भगिनी सुभद्रा यांच्या अगमनाकडे लागलंय. रथारूढ झालेल्या माता देवकी, रेवतीदेवी , रुक्मिणीदेवी यांचा शृंगार अपूर्व होता. माता देवकी या वयातही इतक्या सुंदर दिसत होत्या कि वसुदेव स्वतः अनेक वेळा त्यांच्याकडे पाहात होते आणि ते पाहून दादा, रेवतीदेवी रुक्मिणीदेवी माता देवकीला चिडवून दाखवत होते. अर्थातच उपस्थित सर्व या चेष्टा मस्करीचा आनंद घेत होते. तितक्यात ज्या क्षणाची प्रतीक्षा उपस्थित सर्व करत होते, तो क्षण येऊन ठेपला.
अत्यंत रूपवान आणि सर्वगुणसंपन्न व यदुनाथांची लाडकी आणि धाकटी बहीण सुभद्रा उंची व भरजरी राजवस्त्र उत्तम घडणीचे सुवर्ण अलंकार, गळ्यात रत्नांचे हार व मोत्यांच्या माळा, सुशोभित केससंभार त्यावर हिऱ्याची सजावट असलेली जाळी, कानात सुवर्ण मासोळी, नाकात मोत्याची अनमोल नथ, बोटात उत्तम नक्षीच्या मुद्रिका, दंडात बाजूबंद, नक्षीदार वेलबुट्टीच्या मनगट्या आणि पाटल्या व सोन्याची कंकणं , सोन्याच्या पट्टीवर हिरे जडलेला कमरपट्टा, पायात सर्वोत्तम नक्षीचे पैंजण यांसह
भव्य कपाळ , धनुष्याकृती भुवया, मत्स्याकार नेत्र, काळी आणि पाणीदार नेत्रवर्तुळे, सरळ नासिक, खळीदार आणि लोण्याप्रमाणे मऊ गाल, मुखचंद्राचं तेज प्रत्यक्ष आकाशीच्या चंद्राला लाजवेल असं वा त्याच्या प्रभेशी स्पर्धा करणारं , चालताना तिचा डौल पाहायला स्वर्गीच्या तिन्ही देवी, अप्सरा, अवकाशात येत , अश्या सर्व वर्णनाने जीची स्तुती करताना, कदाचित विध्यात्याच्या लेखणीतदेखील शब्द कमी पडतील अशी सुभद्रा राजमहालाबाहेर आली. या वर्णनावरून सुभद्रेच्या रूपाची थोडी तरी कल्पना आली असेल. त्या काळात समस्त भारतवर्षात सौन्दर्यात सर्वश्रेष्ठ स्वतः रुक्मिणी , द्रौपदी आणि सुभद्रा यांचाच वरचा क्रम लागतो अशी चर्चा होत असे.
राजप्रासादाची एक एक पायरी उतरताना अवकाशातील समस्त तारका तिच्या प्रत्येक पावलापुढे पायघड्या पसरत आहेत असाच भास होत होता. कृष्णाची सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे भगिनी सुभद्रा. तिच्या एका शब्दासाठी प्रत्यक्ष काळाशी दोन हात करण्याची तयारी कृष्ण करू शकत होता. पण याच भगिनीच्या भविष्याच्या विचार वा चिंता प्रत्यक्ष भगवंताला देखील सतावत होती. आपल्या रथासमीप येऊन सुभद्रेने सर्वात पहिला प्रश्न केला.
"भ्राता कृष्ण, नाही आला."
माता देवकी यावर म्हणालीच
"घ्या आम्ही इतकेजण उभे आहोत पण हिला पाहिलं कोण दिसायला हवंय तर कान्हा."
"भाऊजी तुझ्या सोबतच येत असतील असा आमचा कयास होता." रेवतीदेवी
"नाही भ्राता याआधीच प्रस्थान करते झाले आणि जाताना त्यांनी निरोप ठेवतो असं सांगितलं मला." सुभद्रा
तेवढ्यात एक सेवक धावत धावत दादांपुढे येऊन उभा राहिला. त्याच्या धापा टाकून झाल्या आणि त्याने दम घेतल्यावर दादा म्हणाले.
"काय समाचार आहे."
तो दादांना नमस्कार करून म्हणाला.
"यदुनाथ श्रीकृष्ण प्रभातीच द्वारकेच्या सीमेजवळील आश्रमात गेले. जाताना त्यांनी मला निरोप द्यायला सांगितला होता, परंतु कामाच्या गडबडीत राहून गेलं. क्षमस्व. आश्रमात आताच राहायला आलेले तपस्वी सिद्धयोगीजी यांच्या सह ते यात्रेस येतील असा संदेश त्यांनी द्यायला सांगितला होता. आपण प्रस्थान ठेवावं, ते आपल्याला मार्गात भेटतील वा रैवतक यात्रेत. "
हे ऐकून बलरामदादा आधी त्या सेवकावर रुष्ट झाले पण नन्तर स्वतःला सावरून म्हणाले.
"हा कान्हा देखील प्रत्येक वेळी काहीतरी करून समय व्यतीत करतो. "
यावर माता देवकी म्हणाली
"असुदे येईल तो आपण निघू. मार्गात भेटेलंच आपल्याला. "
'माते तू दरवेळी कान्हाची बाजू घेऊन त्याला चढवून ठेवलंयस ."
यावर माता , रेवतीदेवी रुक्मिणीदेवी यांसह सर्वजण हास्यात बुडाले. आणि त्या हास्यातच दादांनी प्रस्थानाची आज्ञा दिली.
क्रमशः
भाग १९ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment