Skip to main content

सुभद्राहरण ३५

सुभद्राहरण ३५ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा 

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

मंगलाष्टके सुरू झाली. दशदिशांना त्या सुमधुर मंगल शब्दांनी जणू भरून आणि भारून टाकलं. मंगलाष्टके सुरू झाली आणि अत्यंत रूपवान दिसणारी, वधूवेशात लज्जित होऊन, अंतरपाटा पलीकडे असलेल्या अर्जुनाला पाहण्यास, आतुर झालेली, सुभद्रा विवाहवेदिवर येऊन उभी राहिली. 

तिच्या समस्त सख्यांच्या, रेवतीसह घरातील सर्वांच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू आहेत. स्वतः दादा आणि कृष्णदेखील आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. दोन भावात एकुलती एक असलेली बहीण. कृष्णाच्या नेत्रापुढे लहान पणीची नाजूक सुकुमार भाबडी सुभद्रा उभी राहिली. कृष्ण खोड्या काढून सतावत असताना दादांकडे तक्रार घेऊन गेलेली. दादांनी कृष्णाला रागे भरताच अत्यंत हर्षित होऊन टाळ्या वाजवणारी. दादांच्या नेत्रापुढेसुद्धा तोच जीवनपट, सुभद्रेचा, आजपर्यंतचा,  तरळला. दोघे बंधू भावविभोर होऊन गेले. 

इकडे मंगलाष्टके सुरू आहेत. वधू वर दोघेही हातात पुष्पमाला घेऊन उभे आहेत. प्रत्येक कडव्यानन्तर सावधानच्या अक्षता वधूवरांच्या मस्तकी पडत आहेत. पुरोहित मंगलाष्टके म्हणत म्हणत चरणसीमेवर पोहोचले आणि शेवटी ताराबलम चंद्रबलम सुरू झालं. मंगलाष्टके संपली आणि अंतरपाट दूर झाला. वधूवेशातील सुस्वरूप सुभद्रेने, अत्यंत लज्जित होऊन, समोर पुष्पमाला घेऊन उभ्या असलेल्या अर्जुनाला, वरमाला घातली आणि प्रतीक्षेत असलेल्या अर्जुनानेदेखील आपल्या हातातील माला सुभद्रेच्या गळ्यात घातली. 

आणि सनई चौघाड्यांचा मंगल ध्वनी आसमंतात घुमला. जणू तो सर्वांना सांगत होता. सुभद्रेने अर्जुनास वरले. अर्जुन सुभद्रा विवाह संपन्न झाला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे मनोरथ सफल झाले. सुभद्रा अर्जुनास द्यावी ही इच्छा द्रविडी प्राणायाम करून कृष्णाने पूर्णत्वास नेली. विवाह संपन्न झाला आणि पुरोहित पुढील विधींसाठी सज्ज झाले.

सभामंडपात खास बनवून घेतलेल्या मिष्ठानाने सर्वांच्या हातावर आणि नन्तर पोटात जायला सुरवात केली. मिठाई इतकी मधुर होती की मंडळी अधिक मागून मागून सेवन करत होती. देणारे हात सढळपणे देत होते. कारण कार्य द्वारकेतील होतं. जिथे सुबत्ता आपलं ठाण मांडून विराजित झाली होती. 

विवाहाचे पुढील विधी सुरू झाले आणि मंडळी स्थिरस्थावर झाली. कृष्ण आणि बलराम आलेल्या अतिथींच्या आदर सत्कारात मग्न झाले. परिचित परिचितांशी चर्चा करू लागले. ख्यालीखुशाली विचारू लागले. अपरिचितांशी ओळख करून घेऊ लागले. कृष्ण बलराम मधेच विधींवर लक्ष ठेवता 
ठेवता अतिथींच्या जलपान मिठाईवाटप यावर देखील लक्ष ठेवून होते.

सर्व विधी यथासांग पार पडत होते आणि पुरोहितांनी कन्यादानाच्या विधीसाठी माता देवकी आणि पिताश्री वसुदेव यांना पाचारण करण्यास सांगितले. माता पिता श्रीमंत गरीब, राजा रंक कोणीही असोत, परंतु कन्यादानाच्या या क्षणी मन भरून येणं स्वाभाविक आहे. आपल्या लाडक्या कन्येचा हात एका श्रेष्ठ हातात देतांना, माता देवकी व पिता श्री वसुदेव यांना नक्कीच धन्यता वाटत असणार.

परंतु आपली कन्या इतक्या दूरदेशी अर्थात इंद्रप्रस्थाला द्यायची म्हणजे पुनः भेट कधी होईल ते ईश्वर जाणे. ज्या मुलीला तान्ही असल्यापासून आज इतकी मोठी, विवाहयोग्य होईपर्यंत वाढवून स्वहस्ते स्वाधीन करायची आणि जीची चिमणी पावलं अंगणात पडली, त्याच अंगणाला ती पारखी झाली, ही स्वीकृत  प्रथा असली तरी पित्याच्या मनाला कोण 
समजावणार. माता आणि कन्या हे जसं वेगळंच नातं आहे,  तसच पिता आणि कन्या हे अलौकिक आणि अद्भुत नातं आहे या विश्वातलं.

माता पिता दोघेही कन्यादानासाठी येऊन उभे राहिले.

क्रमशः

भाग ३५ समाप्त
२९/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...