Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५८

भोग आणि ईश्वर  ४५८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

मनाचं श्रेष्ठत्व आणि त्यावर आधारित संपूर्ण आध्यात्म विज्ञान हा सगुण ते निर्गुण सर्व मतांचा, शास्त्राचा, वेद पुराणं, संतवाङ्मय, या सर्वांचा पाया आहे. किंबहुना अध्यात्मविज्ञानातील कोणत्याही मार्गाचा  मूळ पाया आणि त्यावर आधारित सर्व कर्मकांड ते योग इत्यादी जे केले जातात त्याचाही मूळ पाया मनावर आधारित आहे. 

ईश्वराने स्वतः रचलेल्या या संकल्पित ब्रह्मांडाला भेदून, निर्गुण रूपातील ईश्वरी तत्वाला प्राप्त करण्याची किल्ली किंवा किलक, हे स्वतः ईश्वराने, मन या इंद्रियरूपात स्वतःला गुंफून, म्हटलं तर एकप्रकारे माणसाचा मार्ग सुलभ करण्याचा प्रयत्न स्वतः ईश्वरानेच केला आहे. मानवी देहातील सर्वात चंचल, पण देह बुद्धी यांना आपल्या कवेत सामावून, त्यांच्याकडून निहित कार्य करवून घेण्याची क्षमता या मनात आहे. मनात आणलं तर काहीही करू शकणारं मन, अनेक गोष्टी लीलया करतं. 

या मनाची शक्ती इतकी अमर्याद आहे की, प्रसंगी देहाची मर्यादा या मनाला बांधू शकत नाही. म्हणजेच मनाच्या शक्तीने प्रसंगी भौतिक व भौगोलिक अंतरसुद्धा सहज पार करून, हेच मन, देह स्थिर असतानासुद्धा कार्य घडवून आणू शकतं. त्यासाठी मनाला मनातील ऊर्जा व शक्ती यांना स्थिर करून, त्यांना नियंत्रित जरून, त्याद्वारे मनातील लहरींच्या शक्तीने अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. 

अर्थात त्यासाठीचा अभ्यास, प्रयास व सराव हा तितकाच कठीण व गहन आहे. पण आपल्याला इतक्या टोकाची शक्ती व ऊर्जा मिळवायची नसली तरीही,आपण आपल्या या जन्मासाठी आणि पुढील जन्मातील प्रगतीसाठी या मनातील अपार शक्तीचा सदुपयोग करून घेऊच शकतो. त्यासाठी मनाला एकाग्र करून, त्या मनाला साधनेच्या फेऱ्यातून फिरवून, अनेक योग बसल्या जागी सहज साध्य करता येतात. 

म्हणूनच कोणत्याही तत्वाची व्यक्ती असो, या मनाच्या शक्तीला जागृत करून, आव्हानीत करण्यासाठी आपण सर्वात प्रथम मनातील वेगवेगळ्या वृत्तींना नियंत्रित करून त्यांना एका लक्ष्या वर स्थिर करण्याचा प्रयास करावा. यासाठी वृत्तीचा पसारा आवरता येणं जरुरी आहे. ज्या तत्वावर आपण देह बुद्धी व मन रुपात आधारित आहोत, ते प्रारब्धाप्राप्त आहे. 

त्यामुळे आपण हे आधी जाणून घ्यावं की, पाच तत्वावर आधारित या देहाचा बुद्धीचा वा मनाचा पाया कोणतं तत्व आहे, त्याला आधी जाणलं पाहिजे. ते एकदा जाणल्यावर त्याला स्थिरचित्त करण्यासाठी प्रयास केले पाहिजेत. जल तत्वावर आधारित मन हे प्रवाही असतं, त्यामुळे त्या मनाला एका विषयात वा इच्छेत गुंतवून, त्यात प्रवाहित करणं गरजेचं आहे. 

म्हणून त्या लोकांनी मनाला अंतर्मुख करण्याच्या प्रवाहात गुंतवून, त्यायोगे, मनाच्या प्रवाहिपणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. कारण पाण्याला थांबवता येत नाही, पण त्याला योग्य दिशेने प्रवाहित करता येतं. म्हणूनच जलतत्व प्रभावित व्यक्तींनी मनाच्या स्थिरतेपेक्षा, त्याला योग्य मार्गावर प्रवाहित करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून मनाला गतीमय ठेवता येईलच, पण तो प्रवाह व ती गती योग्य दिशेला प्रवाहित करता येईल. 

याप्रमाणे इतर तत्वांना चित्तशांतिकडे नेण्याबद्दल।चिंतन करू. पण तरीही नामाची कास न सोडता,चिंतन सुरूच ठेवू. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...