Skip to main content

भोग आणि ईश्वर ४०२

भोग आणि ईश्वर  ४०२

ईश्वर स्मरणाने काय साधतं हे सांगण्यासाठी आपण एक उदाहरण  घेऊ, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. शेगडीवर दूध ठेवून, त्याला खालून आंच दिल्यास, त्यातून सत्व, सायीच्या रुपात पृष्ठभागावर जमा होतं. त्याला विरजण लावून, त्याचं दही घालून, त्या तयार झालेल्या दह्यातून ताक तयार करून, त्या ताकातून आलेल्या लोण्याला कढवून, सरतेशेवटी तूप मिळतं. जे सर्वात उत्तम आणि अत्यंत गुणकारी असतं. 

म्हणजे या एका शेवटच्या पदार्थासाठी दुधाला, अग्नी, किण्वन प्रक्रिया, पुन्हा मंथन अर्थात प्रचंड संघर्ष आणि पुन्हा अग्नीवर तापवलं जाणं, अश्या अनेक संघर्षात्मक परिस्थितीतून जावं लागतं. त्याचबरोबर अनेकविध नव नवीन देहधारण करावे लागतात. बरं या सर्व नैसर्गिक प्रक्रिया आहेत. कारण अग्नी, किण्वन, मंथन व पुन्हा अग्नी, हे सर्व निसर्गातील मूळ घटक आहेत. 

आपण अग्नी कोणत्याही प्रक्रियेने तयार केला तरी, तो अग्निच असतो.किण्वन ही सुद्धा एक प्रकारची, बॅक्टेरिया द्वारे घडणारी, नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याचं पृथक्करण व विश्लेषण विज्ञानाने एखाद, दोन शतकं आधी केलं असेल, पण त्याचा वापर करून तूप काढण्याचं कार्य, सनातन भारतीय युगानुयुगांपासून करत आले आहेत. 
तूप बनवण्याची ही प्रक्रिया इतकी संथ आणि नैसर्गिक गतीने घडली व घडू दिली गेली तरच मिळणारा शेवटचा सत्वयुक्त घटक अर्थातच तूप, हा सर्वोत्तम असेल. आता या सर्व प्रक्रियेत कुठेही घाई किंवा अनैसर्गिकपणा केला, तर मिळणारं सत्व, हे निश्चितच कमी प्रतीचं असेल किंवा कदाचित प्रक्रिया बिघडून जाईल. हे नक्कीच सर्वसामान्य ज्ञान आहे. 

पण हेच तंत्र अध्यात्मात, देहाकडून, मनाकडे आणि मनाकडून आत्म्याच्या गाभाऱ्यात जाताना, वापरून, अनेक स्तरीय मार्ग आखून देण्यात आले. कुठेही दोन दिवसात मनःशांती वा चार दिवसात आत्मप्राप्ती सांगितली गेली नाही. कारण मन हे सहज नियंत्रणात येणारं, इंद्रियं नाही. कलियुगाच्या विशिष्ट परिस्थिती मुळे, अनेक मार्ग हे निरुपयोगी सांगण्यात आले. त्याचंही  मुख्य कारण व उद्देश, लोकांचा, ईश्वरप्राप्तीचा, मनःशांती मिळवण्या वरचा विश्वास ढळू नये हेच आहे. म्हणून मार्ग जो पुराणकालीन आहे व सहजसोप्पा आहे, तोच ईश्वराने अनेक रुपात येऊन, सतत सांगितला. 

पण कुठेही यामध्ये जवळचा रस्ता, अर्थात शॉटकट सांगितला नाही. मात्र सद्गुरुकृपेने काही विशिष्ट परिस्थितीत, सद्गुरू, एखादया भोळ्या भक्ताचा भाव जाणून, आत्मोद्धार करू, शकतात आणि अत्यंत विपरीत परिस्थितीत सहाय्य निश्चित करतात.  पण अर्थात हा शॉटकट नक्कीच नाही. तर सद्गुरू कृपा प्राप्तीसाठीच्या प्रेरणेचे प्रयोजन आहे. यात अजून एक नमूद करण्या सारखी गोष्ट म्हणजे, जसं तूप बनवण्याच्या या प्रक्रियेत, मूलस्वरूपातील दूध अनेक देह धारण करत, अनेक तापत्रयातून जात असताना, त्याला योग्य त्या प्रक्रियेतून नेणारे आपण साक्षी असतो, 

त्याचप्रमाणे आपल्या अनेक जन्मांतून, आपल्याला दूध ते तूप अश्या संस्कारप्रक्रियेतून नेणारे व आपल्या तापत्रयात आपल्याला मूळ उद्धार प्रक्रियेपासून दूर जाऊ न देमारे, पण सर्व प्रक्रियेचे साक्षी सद्गुरू व ईश्वर असतात,  याची खात्री बाळगा. म्हणजे एखाद्या तापात वा अनिष्ट परिस्थितीत,  ज्यावेळी आपण सहाय्याची अपेक्षा ठेवतो आणि ते सहाय्य आपल्याला मिळत नाही, तेंव्हा नक्की समजा की, ती परिस्थिती आपल्या परीक्षेची आहे आणि पुढे जाण्यासाठीची आहे. त्यावेळी निश्चिन्त मनाने श्रद्धा व विश्वास ढळू न देता, साधना सुरू ठेवा. कारण मन अश्यावेळी नकारात्मक निर्णय घेऊन, आपल्या दूध ते तूप बनण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत विघ्न आणू शकतं किंवा प्रक्रिया संपवू शकतं. 

याचं पुढील चिंतन उद्याच्या भागात पाहूया. आपलं नामसाधन अर्थातच योग्यप्रकारे सुरू राहूदे. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...