Skip to main content

भोग आणि ईश्वर १७३

भोग आणि ईश्वर  १७३

आत्मा या अविनाशी तत्वाला सजीवसृष्टीच्या या प्रांगणात खेळायला पाठवून, मातेचं हृदय असलेला परमेश्वर हा खरतर कसा स्वस्थ बसू शकत असेल, याची कल्पना करता येणार नाही. म्हणजे मातेच्या ममत्वाने तो त्या प्रत्येक जिवाकडे लक्ष देऊन असतो, ज्याला या मर्त्यालोकात पाठवलं जातं, किंवा यावं लागतं. म्हणूनच प्रत्येक आत्म्याची उन्नती व्हावी यासाठी त्या जिवानेच धडपड करावी ही खरतर एका मातृ हृदयी ईश्वराची मनापासून इच्छा असते.

पण त्या कोमल हृदयी ईश्वराच्या मनामध्ये आणि संकल्पा मध्ये एक कठोर पिता दडलेला असल्या कारणाने, जिवाने आपली उन्नती स्वतः साध्य करावी आणि परिस्थितीला टक्कर देऊन, आपलं मन घट्ट करून मोह माया, दुःख, सुख, भोग व उपभोग, यांच्या कोणत्याही फेऱ्यात न अडकता पुढे पुढे जात राहून, प्रगती साधावी, ही दुर्दम्य इच्छा त्याच ईश्वराची असते,जो मातेचं ममत्व बाळगून आहे. 

त्यामुळे कधी कठोर व्हावं आणि कधी कोमलतेने सांभाळून घ्यावं हे योग्य प्रकारे तोच जाणतो. त्याला हे पक्के ठाऊक असतं की, आत्म्याच्या या प्रवासात, कोणत्या देहातील आत्मा मानसिक, शारीरिक यातनांचे, दुःखाच्या वादळाचे, भोगाच्या आडवळणाचे आणि परिस्थितीच्या काट्यांचे घाव, व्रण, जखमा, वेदना सहन करण्यास समर्थ आहे आणि त्यांना कोणत्या काळात कडेलोट होताना, सावरून घ्यायची गरज आहे. 

कोणत्या आत्म्याला आत्मयज्ञ श्रेयस आहे आणि कोणाला तो जमणार नाही. कदाचित हे देखील तो जाणतो की, आत्म्याच्या या प्रवासात कोणत्या आत्म्याची काय पात्रता आहे, काय गुणानुक्रम आहे, काय पतवारी आहे, कोणत्या आत्म्याचं काय बलाबल आहे. कारण त्या त्या आत्म्याच्या 
संचितानुसार त्याला देहप्राप्ती होणारच असते. त्यामुळे प्रत्येक देहाची, मनाची आणि आत्मबलाची इयत्ता काय आहे हे तो जाणतोच. 

यात एक गोष्ट अजून, जश्या इयत्ता वाढतात, तस तसा अभ्यासक्रम, विषय, परीक्षेचं स्वरूप, पद्धती, गुण देण्याची पद्धत हे सर्व कठीण व अवघड होत जातं. खरतर तीच त्या आत्म्याची चाचणी अथवा परीक्षा असते. खूपवेळा खडतर आयुष्य आणि आणि अतीव दुःख सहन करणारी माणसं उमद्या स्वभावाची असतात, तर कित्येकदा सुखासीन आयुष्य जगणारी व्यक्ती रागीट अथवा तुसडी असते. यामध्ये देव वा दैव कोणाची आत्मपरीक्षा घेत असतो, असा प्रश्न केला तर मी म्हणीन की, दोघांचीही.

कारण आत्म्याच्या प्रवासात, आज त्यांचा कोणता टप्पा आहे हे ईश्वर जाणतो. त्यामुळे एखाद्याला न्यून वा कमतरता आणि दुःख देऊन परीक्षा, तर एखाद्याला अतिसुख देऊन परीक्षा. म्हणजे मूठभर धान्य देऊन त्यातून समाधानाचे पसाभर अन्न मागून व एकाला पसाभर देऊन, त्यातून किमान मूठभर समाधान आणून दाखवण्याची परीक्षा, ही अनंताची अजब कसोटी असू शकेल.

मुळात या परीक्षेच्या माध्यमातून ईश्वर सदर आत्म्याची आत्म यज्ञाची पात्रता आणि पुढील जन्मीसाठीची,  अजून जोखमीची तयारी चाचपून पहात असेल. जो या परीक्षेत उत्तीर्ण होईल तो, आत्मयज्ञाच्या या मार्गावर पुढील इयत्तेचा विद्यार्थी असेल. अनुत्तीर्ण मात्र पुढील जन्मी,  परीक्षेस पुन्हा बसणार पुढील जन्मात. 

यावर अजून सखोल विवेचन जरुरी आहे, कारण अजून बरेच कंगोरे,या विषयाचे, पहायचे आहेत. , म्हणून हाच विषय उद्या पुढे नेऊया. तोपर्यंत आपण नाम घेत राहू, पुढे जाण्याचा तो एक उत्तम उपाय आहे.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...