Skip to main content

भोग आणि ईश्वर ५४६

भोग आणि ईश्वर  ५४६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
    
भाग्य नशीब प्रारब्ध आणि संचित हे वास्तविक एकाच पातळीवरील शब्द आहेत. मुळात भाग्य किंवा नशीब हे वेगळं काही नसून, आपल्या कर्म संचयाचं आपल्यासमोर उघडलेलं एक पान आहे. म्हणजे आपल्याच कर्माच्या पोतडीमधून, एक कर्म पक्व होऊन फलरुपात आपल्या समोर येऊन उभं राहतं. ते चांगलं असेल किंवा वाईट, पण आहे आपल्याच कर्माचा परिणाम. 

खरी समस्या ते फल वा परिणाम योग्य वा मनाप्रमाणे असेल तर, आपण आपल्यावर खुश होतो आणि आपल्याला  आनंद व संतोष मिळतो. पण जर तो परिणाम वा फल वाईट, दुःखकारक, क्लेशदायक वा भोग स्वरूपात असेल, तर मात्र आपण दैव, नशीब या गोष्टींचा विचार करून एकप्रकारे आपली जबाबदारी झटकू पहातो. वाटा तिथे चुकतात. आता योग्यवेळी योग्य ते फल समोर यावं हा झाला योग. हाच साधण्यासाठी आपण निदान प्रयत्न तरी नक्कीच करू शकतो. कारण एक कर्म सोडून बाकी काहीही मानवी हातात नाही. 

कर्म उत्तमच करणं हे आपण प्रयत्नाने नक्कीच साधू शकतो. पण अश्या प्रयत्नात, आपल्याच कर्माच्या एखाद्या अनिष्ट फलाची बाधा वा अडचण नक्कीच येऊ शकते. कालच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे,  त्याला प्रारब्ध नशीब किंवा योग म्हटलं जातं. पण हे मानवी प्रयत्नाने साधणं कठीण आहे. कारण कर्माच्या साखळी तून वेचून योग्य कर्माचं योग्य फल, योग्य वेळी आपल्या समोर आणणं हे आपल्या हातात नाही. 

ते विधाता नामक शक्ती आपल्या ठराविक नियमानुसार करते. यात आपला सहभाग कर्मकर्ता आणि फल भोक्ता इतकाच आहे किंवा असतो. पण ईश्वरी कृपा वा सद्गुरूंची कृपा, हा योग साधू शकते. कारण आपल्या चांगल्या कर्माचा हिशोब जोडून अनिष्ट कर्माचं अनिष्ट फल समोर येताना, त्याच्या मार्गात आपल्याच एखाद्या साधनेचं फल मांडून, त्या अनिष्ट फलाचा परिणाम,  कमी ते नष्ट करण्याची शक्ती ही त्या कृपेत किंवा साधनेच्या फलात असते. 

अशी कृपा किंवा त्या कृपेचा प्रसाद हा आपल्याच साधना रुपी तप व कर्माचा परिणाम असतो. सर्वसाधारण परिस्थितीत आपल्या इतर उत्तम कर्मांचा परिणाम वा फल, आपल्या समोर योग्य वेळी येतो. पण एखाद्या अनिष्ट फलाच्या, समोर येण्याच्या क्षणी वा काळात, आपल्याच एखाद्या उत्तम फलाला त्या मार्गात आणून, धोका वा नुकसान कमी करणं किंवा नष्ट करणं, हे मात्र ईश्वरी वा सद्गुरू कृपाच साधू शकते. 

ते कसं आणि का, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत नाम घेतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...