भोग आणि ईश्वर ५७७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
भले भले महात्मे,संत इत्यादी, संसार सागर का म्हणतात, याचा बोध काल आला असेल. मूळ स्व साध्य करण्या साठी करत असलेल्या कर्मातून, मिळणारं फल समोर आल्यावर सामान्य जन, नेहमी त्यात वाहात जातो. हे अंतिम सत्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्या फलाच्या प्राप्तीने आनंद व दुःख होतच राहणार. हे अपरिहार्य व अनिवार्य आहे.माणूस कुठे चुकतो,तर त्याची स्वीकृती वा अस्वीकृती माणूस प्राप्त परिणामांवर ठरवतो.
या चुकीचा अर्थ आणि परिणाम असा आहे की, स्वीकृत फल मनाला आनंद देते आणि अस्वीकृत फल मनाला क्लेश देते. हा आनंद आणि क्लेश हेच सर्व दुःखाचं मूळ कारण आहे. आनंद हे दुःखाचं कारण कसं असेल, असा साहजिक प्रश्न मनात येईल. विचार करा की, एकदा एका कर्मफलातून आनंद प्राप्ती झाली की, माणूस त्याचं प्रकारच्या कर्मात स्वतःला अडकवत जातो. याची एक शृंखला तयार होते. यामध्ये मागील कर्माचा दुःख भोग आला की, मनात अविचार येतात.
माणूस चुकीचा मार्ग आणि चुकीचं कृत्य करण्यास प्रवृत्त होतो. कारण ओढ इच्छा आणि अपेक्षा यातून तयार झालेली आसक्ती ही माणसाला दुःख भोग आणि अनिष्ट फल स्वीकारू देत नाही. यातून फल नाकारण्यात आणि हे मला काय प्राप्त झालं, हे विचार करण्यात माणूस आपली शक्ती, ऊर्जा व्यर्थ खर्च करतो. यातून मनाला क्लेश आणि त्यामार्गे, सुप्त मनात त्याची बीजं जाऊन आत्मक्लेश मात्र पदरी पडतो.
या सगळ्या चक्रातून संसार जातो आणि माणूस आयुष्य भर या क्लेश सगरात राहतो. कारण कोणताही आनंद आणि दुःख हे कायमस्वरूपी नसतं. हे ब्रम्हवाक्य दुःखाच्या वेळी माणूस मनाला समजावून सांगतो. पण आनंदाच्या काळात, हे वाक्य स्वीकृत होत नाही. पण... या पणला पर्याय नाही. यातून बाहेर पडण्याचा उपाय काय, हा विचार माणूस करतो, जो योग्य आहे. पण मार्ग मिळत नाही.
इथेच भगवंतांनी गीतेतील सांगितलेलं ज्ञान उपयोगी येतं. ते म्हणजे कर्म करताना, त्यातील आसक्ती काढून कर्म करणे. म्हणजे प्राप्त फल स्वीकृत वा अस्विकृत राहणार नाही. कारण सर्व चक्र हे मनाच्या गुंतण्यामुळे सुरू होतं. म्हणजे काय हे जरा सोप्प्या भाषेत समजावून घेऊ. एखादी गोष्ट करताना त्याचे परिणाम काहीही होऊ देतं, पण मनात खेद, दुःख, आनंद, उत्साह हा भाव त्या परिणामांशी जोडणार नाही आणि त्याचा परिणाम मनाच्या स्थितीवर होणार नाही.
अर्थात हे तसं वरवर वाचायला सोप्पं वाटतं असलं तरी प्रत्यक्षात वागायला किंवा अंमलात आणायला कठीण आहे. म्हणजे कर्म तर करायचं पण त्याने समोर आलेलं किंवा भविष्यात येणारं फल कोणताही भावबदल न होता, मन स्वीकृत करेल. यामधे मनाचा एक गुणधर्म आपल्या उपयोगी येतो वा येऊ शकतो. तो गुणधर्म काय आणि कशाप्रकारे हे घडेल, यावर उद्याच्या भागात विचार करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment