भोग आणि ईश्वर ५६१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
एक प्रश्न जो नेहमी मनात येतो, पण उत्तर सापडत नाही. तो प्रश्न म्हणजे जर प्रारब्धात लिहिलेले भोग हे भोगुनच संपवायचे, तर मग ईश्वर, ईश्वरी आराधना, साधना, जपजाप इत्यादी का करायचं. त्याचं प्रयोजन काय. या प्रश्नांकडे दोन प्रकारे बघता येईल. एक म्हणजे साध्य आणि साधना. म्हणजे यातून काय साध्य करायचं आणि त्यासाठी काय साधना करायची. एखादी गोष्ट जाणायला, आपण पूर्ण बालक होऊन जाणून घेऊ शकतो. कारण तरच आपल्या मनाची शुद्धता प्राप्त होते, शुद्धतेतून निरागसता आणि त्यातून ज्ञानप्राप्ती होते.
कोणत्याही विषयात उत्तर ज्ञात नसताना, आपण क्ष गृहीत धरतो आणि पुढे जातो. त्यानंतर योग्य पायऱ्या पार केल्या की, उत्तर आपल्याला सापडतं. आता आपल्या प्रश्नाकडे वळूया. मुळात आपण प्रारब्धात असलेले भोग भोगतो, म्हणजे काय करतो, तर आपल्याच कर्माची आपल्या समोर आलेली फळं भोगतो किंवा उपभोगतो. उपभोग घेताना आपण कधीही शंका घेत नाही किंवा विचारसुद्धा करत नाही की, मी ज्या सुखाचा उपभोग घेतोय ते सुख, मला कशाप्रकारे प्राप्त झालं.
आपण साधा विचार करतो की, जे मिळालंय ते माझ्या कष्टाने, कर्मानेच प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे त्याचा उपभोग घेण्याचा मला सर्वस्वी अधिकार आहे आणि त्यासाठी मी पात्र आहे. त्यानंतर दुःखाचा भोगाचा काळ आला की, आपला ग म्हणजे गर्व आणि स्व म्हणजे स्वार्थ जागा होतो आणि आपण सोयीस्कर पणे विचार करतो की, हे ईश्वरा हे काय वाढून ठेवलंय देवा. माझं सुख कोणालातरी बघवलं नाही.
या ठिकाणी चूक घडते. जर सुखात आपण सर्व श्रेय स्वतःच्या कष्टांना दिलं, त्याचप्रमाणे, दुःखात व भोगात त्याची जबाबदारी स्वतःवर घेऊन मनातील संदेह दूर करावा. कारण त्यामुळे मनाची द्विधा स्थिती नष्ट होते. आणि जिथे द्वैत संपतं, तिथे माणूस अंतर्मुख होतो. मगच त्या स्थिर मनात, इतर विचार रुजू शकतात. तरच त्या स्थितीतून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. कारण शांत व चिंतारहीत मनच चिंतन व साधन करायला सक्षम असतं.
त्यामुळेच सर्व साधनांचा प्राण, शांत आणि चिंता रहित शुद्ध मन आहे. त्यामुळे भोगांच्या काळात, मन स्थिर व शांत ठेवावं. आता नुसतं मन शांत आणि स्थिर करून, पूर्ण उद्देश साध्य होत नाही. मुळात कर्माची साखळी तोडूनच, पूर्ण उद्देश साध्य होऊ शकतो. अर्थात तरीही प्रश्न हा उरतोच की, ईश्वर चिंतन आणि साधना का करायची, जर सर्व भोगूनच संपवायचं आहे. मुळात भोग भोगत असताना किंवा सुखाच्या काळातसुद्धा आपण कर्म करतच असतो.
त्यामुळे भोग आणि उपभोग यांची साखळी ही, नित्य आणि निरंतर राहते. ते कधीच तुटू शकत नाही. ती तोडण्यासाठी, कर्मरहित होणं अत्यंत महत्वाचं आहे. मानव कर्मरहित तेंव्हाच होईल, जेंव्हा कर्माचं फल प्राप्त करण्याची आसक्ती, वासना ही शून्यावर येईल. म्हणजे कर्म तर करतच राहायचं, कारण कर्म सोडता येत नाही. पण त्या कर्मातील आसक्ती संपली की, त्यातून प्राप्त होणाऱ्या फलामागील इच्छा नष्ट होते.
याव्यतिरिक्त ईश्वरी साधनेच्या मागील साध्य काय यावर उद्याच्या भागात विचार करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment