भोग आणि ईश्वर ५६६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालचाच विषय पुढे नेऊया. आपला हा मानव जन्म आणि त्यानंतरचा पुढील जन्म यातील शाश्वतता, फक्त हा जन्म ही, आहे. कारण पुनर्जन्म आहे हे आपला धर्म, त्यातील ज्ञान, वेद पुराण इत्यादी मधून मांडलं आहे. तर्काने, उदाहरणाने, तात्विक गोष्टींच्या माध्यमातून, हे आजपर्यंत नक्की दाखवून देण्यात आलं आहे की, आत्मा अस्तित्वात आहे, तो वेळोवेळी, देह धारण करतो, अनेक देहात फिरताना, कर्माचे भोग, विविध माध्यमातून भोगतो, उपभोगतो, अनेक जन्म असतात, त्या जन्मातील देहाच्या कर्मांची फलितं, देहच भोगतो, पण त्याचा परिणाम आत्म्याला, पुनर्जन्म रुपात, सहन करावं लागतं.
पुनर्जन्म नाहीत, हे काही धर्मात मानलं गेलं आहे. तरीही, त्याला उपयुक्त पुरावे नक्कीच देता येत नाहीत. कारण वर मांडलेले अनेक प्रश्न हे इतर धर्मातील तत्वज्ञानात दिले जात नाहीत. पण अनेक गुह्य गोष्टी अश्या आहेत, ज्याला निश्चित उत्तर नाही. पण सारासार तात्विक विचार आणि पुराणातील निश्चित उदाहरणं श्रीकृष्ण व श्रीराम यांच्या चरित्रातील अनेक संदर्भ, जे अस्तित्वात होते, त्यांच्या साक्षी खुणा आजही सापडतात, त्या सर्वातून हे नक्की सिध्द होतं की, आत्मा हा अविनाशी तत्व आहे.
हा आत्माच समस्त देहाचं संचालन करतो. प्रत्येक देहात फिरत असलेला आत्मा, सूत्रबद्धनियोजनातून फिरतो. पण तो एका देहात गेल्यानंतर, त्या देहातील मन, बुद्धी यांच्या आधीन होतो. आत्म्याचा मुख्य उद्देश म्हणजे मोक्ष मुक्ती या गोष्टी अनेक उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना एक दिवस प्रत्येकजण स्वर्ग heaven वा जन्नत मधे जाणार, हे सर्वच धर्म मानतात. प्रार्थना, prayer, इबादत हाच इश्वरा पर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग आहे हे सर्वांनीच मान्य केलं आहे.
अर्थात त्याच्या पद्धती भिन्न आहेत. या ईश्वरीय मार्गावर जाण्याचं प्रयोजन, उद्देश, मार्गाची शास्त्रशुद्ध माहिती, त्याच्या सुयोग्य आणि वैज्ञानिक निकषांवर टिकतील अश्या पद्धती, त्याने साध्य करावयाच्या गोष्टी, त्यातील उपलब्ध अनेक विकल्प, त्यातील सहजसाध्य विकल्प आणि कठीण विकल्प या सर्वांचा शास्त्रशुद्ध अभ्यास फक्त आणि फक्त सनातन, वेदयुक्त, शास्त्रीय पाया असलेल्या शाश्वत धर्मातच केला गेला आहे.
याचं धर्मात, जगण्याच्या, प्रार्थनेच्या, मुक्ती व मोक्ष यांच्या अनेक पद्धती विस्ताराने सांगून, त्यावर चालणारी जीवनपद्धती, त्यावर चालणारी माणसं, त्यांचा पिढ्यन्पिढ्याचा अभ्यास, सूत्रसचालन, प्रत्यक्ष आचरण, ते करणारी गुरुशिष्य पद्धत, त्या पद्धतीने जगलेली व्यक्तित्व, त्यांची तपशीलवार माहिती, चरित्र, कथा, त्यांचं नियोजनपूर्वक केलेलं लिखाण, ते लिखाण जतन करण्यासाठी मंत्र, श्लोक, पद, ओवीबद्ध वांग्मय, यांचं पिढ्यन्पिढ्या करण्यात आलेलं सुसंवर्धन, हे सर्व उपलब्ध करून त्याचं मौखिक जतन, हा सर्व एका सूत्रबद्ध रचनेचा, भाग आहेच.
पण त्यामागे ईश्वरी योजना, प्रेरणा, संवेदना, चिंतन यांचा आशिष नक्कीच आहे. अन्यथा, लाखो वर्षांच्या पृथ्वीच्या किंवा भुलोकीच्या अस्तित्वात, हे सर्व जतन होणं, हे मानवी प्रयत्नांनी अशक्य वाटतं. म्हणूनच माणसाच्या प्रयत्नामागे, नक्कीच काही शक्ती वा बल कार्य करतं. अन्यथा एखाद्या पुरात वादळात इतकं सर्व सहज नष्ट होत असलेलं दिसत असताना, हे ज्ञान, विज्ञान, परंपरा, विश्वास, श्रद्धा, आधार, संकल्पना, कल्पना हे सर्व लाखो वर्ष, इतक्या ताकदीने शिल्लक राहिलं नसतं आणि पिढ्यन्पिढ्या पुढे पुढे गेलं नसतं.
या सर्वाचा कर्ता धर्ता ईश्वर आहे आणि त्याच्या कृपा शीर्वादाने हे सर्व जगत चालू आहे आणि योग्यवेळी योग्य गोष्टी घडून किंवा घडवून आणून, तो ईश्वर या जगतात, भूवर आणि समस्त ब्रम्हांडात correction घडवून balance ठेवण्याचा योग्य प्रयत्न करत असतो. हे macro अर्थात ईश्वराचं स्थूल अस्तित्व.
अश्या या सर्व शक्तिमान ईश्वराच्या, या balance ठेवण्याच्या प्रयत्नात, आपल्यासारख्या, आपल्या तील काही जीवांवर अन्याय किंवा दुर्लक्ष होतं, असा आपला समज असतो. पण विश्वाचा पालनकर्ता असलेला ईश्वर या जगतातील प्रत्येक जीवावर एकसमान लक्ष ठेवतो. त्याच्या या गुणांचा परिचय अर्थात micro किंवा सूक्ष्म अस्तित्वाचा परिचय आपण पुढील भागात घेऊया, अर्थात त्याच्या नामाचा आनंद घेत घेतच.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment