भोग आणि ईश्वर ५५९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
संपूर्ण आत्मप्रवासात अनेक देहात अनेक जन्मात व काळाच्या वेगवेगळ्या खंडात, त्या त्या देहात असताना आत्मा हा मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो. याचं कारण म्हणजे आत्मा हा स्वतः काही करू शकत नाही. त्याला माध्यम लागतं. ते माध्यम हे फक्त आणि फक्त देह आहे. देहाशिवाय आत्मा काहीही करू शकत नाही. माध्यम असल्याशिवाय आत्मा आला कोणताही प्रवास, कर्माच्या फलांचा भोग वा उपभोग घेऊ शकत नाही. जितका काळ देह मानवदेहाव्यतिरिक्त इतर चौऱ्यांशी लक्ष योनीतून फिरतो, तितके जन्म फक्त आणि फक्त भोग भोगतो.
त्या कोणत्याही जन्मात ईश्वराने आत्म्याला शुद्धता प्राप्त करण्याची, कर्माच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची, श्रद्धा भक्ती अर्पण शरण याद्वारे, जगाच्या मालकाला प्राप्त करण्याची कोणतीही सोय वा मार्ग ठेवलाच नाही. ते फक्त आणि फक्त मानवी देहातून प्राप्त करता येतं. यासाठी मानव देह प्राप्ती हीच मुळात या दिशेने आत्म्याने प्राप्त केलेली पाहिली पायरी आहे. कारण इथेच ईश्वराने ज्या सोयी,सवलती, मार्ग, इंद्रियांची उपलब्धता, सर्व प्रकारच्या अंतर्गत रचनांनी युक्त देह बुद्धी आणि
जाणीवा ज्ञान व आत्मज्ञान प्राप्त करण्याची संपूर्ण क्षमता असलेलं,all powerful मन,जे मानवी देहाला मिळालेलं वरदान आहे, त्याचा सदुपयोग करून आधी सर्व प्रकारची शुद्धी, चित्ताची शुद्धता आणि त्याद्वारे आत्मशुद्धी साधून, मुक्ती मोक्ष अर्थात सर्व शक्तिमान ईश्वराच्या हृदयात स्थान प्राप्ती साधण्याचा योग जुळवून आणू शकतो. बरं हे सर्व कर्माआधिन ठेवलं असल्यामुळे कोणताही मानवी देहधारी जीव, हे साध्य करू शकतो.
यासाठी कोणताही वशिला किंवा लाच कामी येत नाही. माणसाकडे असलेला पैसा अडका, ऐश्वर्य, यातील काहीही उपयोगी नाही आणि गरजेचं नाही. भोगांच्यां मार्गावर चालताना किंवा उपभोगाच्या स्वर्गातून जात असताना, मागील कर्माचा वा कर्माफळांचा विचार न करता पुढील मार्ग सुकर करण्यासाठी पुढील सर्व कर्माचं फल त्याच ईश्वराला अर्पण करून, त्याला शरण जाऊन फक्त त्याचं स्मरण करणं, हे एकमेव कर्म या देहाने व्हावा, या उद्देशाने मानवी देहाची निर्मिती झालेली असताना, तेच नेमकं साध्य होऊ शकत नाही.
त्याव्यतिरिक्त बाकी सर्व या देहाने, बुद्धीने, मनाने माणूस करतो, साध्य करतो, प्राप्त करतो, अपेक्षितो, आसक्तीत राहतो. या सर्वातून जे समोर येईल, त्याचं स्वरूप मना प्रमाणे असेल तर सुखावतो. पण जर तेच मनाविरुद्ध, दुःख देणारं असेल तर, त्या वास्तवाला स्वीकारायला मन तयार होत नाही. हाच खूप मोठा पेच आहे आयुष्याचा.
इथेच अनेक चुका पुन्हा. ज्या आधीच चुकीचं कर्म करून, मन व देह यांनी भावनेच्या भरात, मोहात, लोभात, क्रोधात, वासनेेत मन व देह यांनी केलेल्या असतात. त्याचीच अनिष्ट, नावडती फळं समोर येतात, त्यावेळी ती मनाकडून नाकारलेली किंवा अस्वीकृत केलेली असतात.
आता याच ठिकाणी काय चूक व काय बरोबर हे जाणायला जमलं तर निदान पुढील मार्ग सुधारता येतो, प्रारब्ध बदलता येतं. काय आणि कसं ते जाणुया, पुढील भागात.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment