भोग आणि ईश्वर ५७६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालचा विषय पुढे नेताना, मनामध्ये असलेला गैरसमज दूर करू. गीता ही फक्त युद्धासाठी अर्जुनाला तयार करण्यासाठी असती, तर ती अठरा अध्यायांइतकी दीर्घ सांगितली गेली नसती. त्यामुळे समस्त विश्वाला, विश्वा तील प्रत्येक जन सामान्यांना कल्पांतापर्यंत मार्गदर्शन करत राहील, हेच त्यामागील प्रयोजन असावं. याचं अजून एक कारण म्हणजे, जर असा काही उद्देश नसता, तर त्यानंतर साडेतीन चार हजार वर्षांनी श्रीसंतज्ञानेश्वर माऊली या रुपात अवतरून, प्रभूंनी स्वमुखे तीच गीता संस्कृत या फार कमी लोकांना ज्ञात असलेल्या भाषेतून, प्राकृतात आणली नसती.
म्हणजेच या गीतेमध्ये नक्कीच, जनसामान्यांसाठी काहीतरी असणार. काय, ते बऱ्याच जणांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यातील बरेच अर्थ, भावार्थ, मतितार्थ गुह्यार्थ हे अध्यात्मिक मार्गाचा धागा पकडून, पुढे शोधत आतपर्यंत गेले आहेत. फारच थोड्या विद्वानांनी यातील प्रापंचिक दृष्टीने सार शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आज त्या दृष्टीने प्रयत्न करूया.
गीतेतील सर्वश्रेष्ठ दोन सिद्धांत आहेत, कर्मयोग आणि भक्ती योग. तिसऱ्या, सांख्ययोगात हा मुळात ज्ञानी व योगी जनांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर काय काय सिद्ध व साध्य होतं, या योगा बद्दल विस्तार पूर्वक कथन केलं आहे. पुन्हा सद्य स्थितीत असे ज्ञानी जन हे दुर्मिळ आणि अल्प होत चाललेत. त्यामुळे त्याचा जनसामान्यांना फार उपयोग होणार नाही, हे बहुदा निश्चित.
म्हणजे आपण कर्म आणि भक्ती याबद्दल चिंतन करूया आणि सामान्य जनांना काय व कशाप्रकारे, सांसारिक दृष्टीने, यातून उपलब्धता होते, ते पाहूया. मुळात कर्म हे नित्य व अनिवार्य आहे. याला कोणताही विकल्प उपलब्ध नाही. कारण काही न करता, बसून राहणं, हेदेखील एक कर्मच आहे आणि त्याचेही, अनेक प्रकारांनी विपरीत परिणाम व फलप्राप्तीत्या त्या व्यक्तीला होऊच शकतात. म्हणजे क्षणक्षण काही ना काही कर्म करण्याला कोणताही पर्याय उपलब्ध नाही, हे निश्चित.
आता सांसारिक कर्मांची परिणती सांसारिक फलप्राप्ती असणार हे अध्याहृत आहे. अशी ही फलप्राप्ती, सांसारिक कर्मांप्रमाणे संसारात अडकवणारी असणार, यात शंका नाही. म्हणजे अनिश्चित आणि अशाश्वत. आता या दोन्हींचा अर्थ सांसारिक कर्म ही सागरातील लाटांप्रमाणे प्रवाहात कायम खेळतं ठेवून प्रवाहहिन करणारी आणि तरंगणं आणि डुबणं यामधे आयुष्य भर ठेवणारी असतात. म्हणूनच सांसारिक कर्मातून होणारी लाभहानी ही अनिश्चित ,अशाश्वत आणि अनित्य आहेत. अनित्य यासाठी की, त्यातील कोणत्या कर्माचा लाभ कधी आणि कोणत्या कर्मातून प्राप्त हानी कधी, हे नित्य वा निश्चित नाही.
याचं विषयावरील चिंतन आपण उद्याच्या भागात पुढे सुरू ठेवूया. तोपर्यंत साध्य ईश्वर आणि साधन नाम हे नित्य कर्म करत राहु.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment