Skip to main content

भोग आणि ईश्वर ५७४

भोग आणि ईश्वर  ५७४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
गर्व आणि अभिमान या दोन घोड्यांना मायेचे पाय आणि षड्रीपुची शक्ती असते. ज्यामुळे हे मनाला ग्रासून, अतीवेगात 
मनाला पळवत नेऊन, आत्म्याच्या मूळ उद्देशापासून लांब नेतात. कारण त्यांना फक्त आणि फक्त आज माहीत असतं. दुसरं म्हणजे त्यांना एका जिवाकडून दुसऱ्या जीवाकडे जाऊन, त्याला भ्रमित करून, मार्ग भ्रष्ट करणं, इतकचं ठाउक असतं आणि परिणामांची कोणतीही तमा नसते. कारण परिणाम देह व आत्मा भोगणार असतात.  

म्हणून एकदा या दोघांनी मनाचा ताबा घेतला की, मन स्वैर होऊन, सर्वात प्रथम सद्सद्विवेक बुद्धी गमावून बसतं. याचसाठी संत महंत, ऋषी मुनी यांनी संयम आणि चिंतन या दोन अस्त्रांना नेहमी जवळ ठेवावं, असं सतत सांगितलं आहे. ही दोन अस्त्र, गर्व अभिमान यांसह देह, बुद्धी व मन यांच्या  सर्व शत्रूंना परास्त करू शकतात.

 कारण संयम चुकीच्या विचारांना येण्यापासून थांबवतो  आणि चिंतन योग्य विचारांना स्थान देऊन, त्या माध्यमातून, योग्य कृती करायला सहाय्यभूत होतं. संयम विचारांचा, रक्तप्रवाहाचा मार्ग सूनियांत्रित करतो आणि मानसिक थकवा घालवून, मनाला योग्य चिंतनाची पार्श्वभूमी तयार करतो. 

कारण चुकीच्या वेळी केलेले विचार आणि चुकीच्या पायावर उभारलेली इमारत नेहमी त्रासदायक असते. म्हणून संयमाने चूक करण्यापासून मनाला परावृत्त्त करता येतं. एकदा मनाला चुकीचा मार्ग त्यागून योग्य मार्गाच्या निकट आणून ठेवल्यानंतर, चिंतन त्या मनाला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजावू शकतं. 

त्यामुळे जाण व ज्ञान या दोन्हींची वृध्दी होते. एकदा ज्ञान येऊन  जाणीवा जागृत झाल्या की, माणूस विवेकाने वागून, योग्य तोच निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे इतक्या सर्व गोष्टी एका.चिंतनातून साध्य होतात. आपण सुद्धा जगात पाहतो की, शांत, संयत मन असलेली माणसंच या जगतात अंतिम ध्येया पर्यंत पोचू शकतात. 

या गोष्टी व्यावहारिक मार्गापेक्षाही अध्यात्मिक मार्गात जास्त लाभदायक असतात. कारण या मार्गात लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, गर्व, अभिमान इत्यादी अनेक शत्रू वा दुष्टप्रवृत्त्ती आहेत. ज्यांच्यामुळे, प्रपंचापेक्षा अध्यात्मिक मार्गात जास्त हानी होते. इथे एका साध्याश्या वाटणाऱ्या, अवगुणांनी, कित्येक वर्षांची किंवा जन्मोजन्मीची तपश्चर्या व साधना वाया जाऊ शकते. 

म्हणूनच आध्यात्मिक मार्गावर चालताना, संयम व चिंतन हे सर्वात जवळचे मित्र आहेत. किंबहुना या वाटेत ते जीवश्च कंठश्च मित्र आहेत. किंबहुना यांच्याशिवाय अध्यात्मिक मार्गावरील वाटचाल अशक्य आहे म्हटलं तरी ते चूक म्हणता येणार नाही. याशिवाय अध्यात्मिक मार्गात, नेट म्हणजे चिकाटी आणि गुरुसेवा व गुरुआज्ञा पालन हे खूप मोठं सहाय्यकारी आहे. यावर उद्याच्या भागात चिंतन करूया, पण तोपर्यंत नामाचा घोष सुरूच ठेवूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...