भोग आणि ईश्वर ५७३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
एक स्पष्ट आहे की, मनाच्या माध्यमातून देहाचा सुयोग्य वापर करून, आत्मशक्ती जागृत करणं, हाच योग्य मार्ग आहे. अशी आत्मशक्ती मर्यादित स्वरूपात जागृत असेल तर, माणूस या जगतातील अनेक क्षेत्रात, असामान्य कर्तृत्व दाखवून अनेक अलौकिक कार्य व कर्म करू शकतो. याची प्रचिती आपल्याला अनेक क्षेत्रात येते. ही जागृती व्यक्तिगत पातळीवर, निर्विवाद पणे प्रचंड लाभ देतेच, पण सामूहिक पातळीवरही, अनेक प्रकारे अद्भुत कार्य घडवून आणते.
पण ही जागृती आत्म्याची आहे, हे कळण्यासाठी काही कसोट्या आहेत. म्हणजे उद्देश, साध्य अर्थात aim and ambition ही प्रापंचिक, व्यक्तिगत लाभासाठी असेल तर, ती सांसारिक वा भौतिक पातळीवर आणि त्यासाठीची जागृती आहे, हे नक्कीच. पण एकाग्रतेने असा लाभ सांसारिक पातळीवर झाला तर त्याला मनःशक्तीची प्राथमिक अवस्था म्हणता येईल. संपूर्ण जागृतीची अत्यंत प्राथमिक अवस्था.
प्राथमिक यासाठी की, मनाच्या शक्तींचा हा लाभ, सुरवातीला नक्कीच भौतिक प्रगती, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्ती घडवतो. पण तो अंतिम टप्पा नाही. तो एक थांबा आहे. ज्यामध्ये न थांबता, त्याचा फायदा हा मनाच्या शक्तीचा लाभ किंवा ती प्रक्रिया तशीच पुढे नेण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, आपण एखाद्या वाहनात बसलो आणि क्ष थांब्यासाठी आपण पैसे भरून तिकीट काढलं. अश्यावेळी क्ष च्या आधीच्या कोणत्याही स्थानकावर आपण उतरणार नाही.
किंबहुना, आपण आलेल्या प्रत्येक स्थानकाचं नाव वाचून, आपल्या स्थानकाची प्रतीक्षा करू, पण उतरणार नक्की नाही. परंतु हे तेंव्हाच शक्य आहे, जेंव्हा, आपल्याला अंतिम स्थानक वा अंतिम ध्येय माहीत आहे. पण या आत्मजागृतीच्या प्रवासात, मनाच्या या शक्तीचा हा असा प्रापंचिक लाभ मिळणं आणि काही ध्येय गाठणं, काही साध्य करणं आणि मनाच्या शक्तीचा प्रत्यय येणं ही एक पायरी आहे. पण प्रत्येक जीवाला ज्ञाना अभावी ही आत्मजगृती का असावी वा यावी, हेदेखील माहीत नसतं.
म्हणूनच एखादा जीव, प्राथमिक पातळीवरील, देहाच्या काही साध्यतेने समाधानी होऊन, प्राप्तीच्या या आनंदात हरवून गेला की, त्याचा आत्मिक पातळी वरील पुढचा प्रवास इथेच संपतो. कारण अध्यात्मिक, उच्च पातळी वरील आत्मज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठीची किंवा होण्यासाठीची, ही एक तयारी आहे. पण साध्य नव्हे. अर्थात हे जाणणारे साधक सुद्धा अनेकदा, मार्ग भ्रष्ट होतात, तर सामान्य माणसाची काय कथा.
म्हणूनच प्रत्येक साधकाने, जीवाने, भक्ताने, श्रद्धा मार्गी यांनी, मनाच्या काही शक्तींचा प्रत्यय व प्रचिती प्राप्त झाली वा जाणवली तरीही, फार हुरळून जाऊ नये आणि मनावरील प्राप्त नियंत्रण हरवण्याचा प्रयत्न करू नये. कारण भावनेची ही शुल्लक चूक, हा मायेचा खूप मोठा खेळ होऊ शकते. याचं महत्वाचं कारण म्हणजे, मनाला गर्व व अभिमान यांच्यावर आरूढ होण्याची खूप वाईट सवय आहे. आणि हे दोन घोडे, मनाला खूप लवकर चुकीच्या मार्गाने घेऊन जातात आणि कमी अवधीत, ध्येयापासून प्रचंड लांब घेऊन जाऊ शकतात.
यावर पुढील चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत मनाला सतत नामाच्या मार्गात कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment