भोग आणि ईश्वर ५७० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
सूक्ष्मातील सूक्ष्म जीवात आणि महत्तम जीवात असलेला अंश हा ईश्वराच्या अस्तित्वाचा खूप मोठा जिवंत पुरावा आहे. अति उच्च दर्जाच्या सूक्ष्मदर्शक यंत्रात दिसणाऱ्या किडा वा प्राण्याच्या देहातील हृदयात, तितकाच सुक्ष्मांश होऊन ईश्वरी अंश तोसुद्धा देह चालवतो. या समस्त जगताचा पसारा, सांभाळणारी शक्ती विविध रुपात, विविध देहात, देहाबाहेर आहेच पण ब्रम्हांड, त्या पलीकडे आणि त्याही पार हा ईश्वर अंशरुपाने आहेच.
एक उदाहरण घेऊ, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. एक बादली घेऊ, ती ब्रम्हांड स्वरूप मान्य. त्या बादलीत पाणी आहे, जे ईश्वरी अंशाचं स्वरूप आहे. त्या बादलीत एखादं भांडं ठेवलं. त्या भाड्यात पाणी साठल्यावर, ते भांडं तळाशी गेलं. ते भांडं हे देहाचं प्रतीक आहे. त्यामध्ये जमलेलं पाणी हे आत्मरुप चैतन्याचं प्रतीक आहे.आता भांड्यात चैतन्य आहेच पण त्या भांड्या बाहेर सुद्धा तेच चैतन्य आहे.
आता बादलीत जे चैतन्य आहे, तेच त्या भांड्याच्या आत आहे. भांड्याच्या आतील चैतन्य आणि बादलीत असलेलं चैतन्य हे एकच आहे. पण देह, बुद्धी व मन यांच्या मर्यादेत, मायेच्या आधीन असल्यामुळे. या आत आणि बाहेरील चैतन्याला ते मन जाणतच नाही. म्हणून मी हा तो असे भेद, देहाने करतो.
कारण या विश्वरूप चैतन्याची जाण, ओळख इत्यादी नसल्या मुळे. हे भेद घडतात. यालाच द्वैत भाव म्हणतात. हा भेदाभेद न मानणारे अर्थात सर्व रुपात जे चैतन्य, तेच विश्वात भरून उरलेलं आहे, त्या बादलीतील जलाप्रमाणे. ही एकरूपता मानणारं तत्व ज्ञान म्हणजे अद्वैत तत्व ज्ञान. हा भेद हे रहस्य जाणणारे, अनेक ऋषीमुनी, संत महंत, सद्गुरू यांनी, या देहातील व देहातीत असलेल्या ईश्वराला शद्ध मनाने पुजलं, त्याचेच गोडवे गायले, त्याला आपल्या हृदयात स्थापित करून, त्याचीच मनधरणी केली.
म्हणजे जर व्यापक अर्थाने पाहिलं तर, हा देह जो त्याला जाणण्यासाठी ईश्वराने दिला असला, तरी त्याचं देहातील चंचल मन, बुद्धी यांच्यावरील मायेच्या प्रभावाने, दुर्मती प्राप्त होऊन, त्याचं ईश्वराला अर्थात आत्मशक्तीला हरवून बसतो. मायेच्या प्रभावात कर्म करत गेल्यामुळे,त्या कर्माच्या बद्धतेत, आत्मशक्ती हरवून बसतो.
ईश्वराच्या या अद्वैत स्वरूपाला जाणण्यासाठी, त्यालाच स्मरण्याचा एक उत्तम मार्ग संतांनी आखून दिला. या शुद्ध सात्विक ईश्वरी नामाच्या सूक्ष्म प्रभावाने, मुख्य शत्रू माया, नामोहरम होते. कारण माया ही ईश्वराची छाया समजली जाते. जो जीव ईश्वराच्या सानिध्यात असेल, त्याला तितका काळ मायेचा प्रभाव जाणवत नाही. जीव हळूहळू परब्रम्ह स्वरूपाला जाणतो किंवा त्या दृष्टीने जागृत होतो. परंतु यामधे खंड पडला की माया पुन्हा जीवाचा ताबा घेते.
याबद्दल अजून जाणूया पुढील भागात, तोपर्यंत स्मरणाच्या मार्गाने जात राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment