भोग आणि ईश्वर ५४२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
काल आपण, स्वयं ईश्वरी चैतन्याने प्रेरित किंवा भारलेले सद्गुरू यांविषयी पाहिलं. पण तरीही, जी विशेषणं व गुण वैशिष्ट्य आपण पाहिली, ती सर्वसाधारणपणें सर्वच सद्गुरूंना लागू होतात. किंबहुना, त्या गुणविशेषानी युक्त चैतन्य स्वरूप व्यक्तित्व, हे सद्गुरू पद प्राप्त करण्यास योग्य आहे. पण यामधे सर्वात प्रमुख गुण म्हणजे साधक, भक्त यांविषयी अपार करुणा व प्रेम.ज्यामुळे, साधकांच्या भक्तांच्या दुःखाने व्यथित होऊन, त्यांचा पुत्रवत सांभाळ कारण, हा विशेष स्वभाव, हे सद्गुरुंचा स्नेहाचं विशेष वैशिष्ट्य आहे. म्हणूनच सद्गुरूंना माऊली म्हणूनही संबोधलं जातं, ते याचमुळे. अपार करुणा हा त्यांचा आत्मविशेष असतो म्हणजे तो त्यांच्या आत्म्याचा गुणधर्म असतो.
हा स्नेह, भक्तांविषयी ही चिंता हा प्रत्येक सद्गुरुंना, आपले साधक , शिष्य व भक्त यांच्याशी बांधून ठेवते. खरतर सद्गुरू होणं, ही ईश्वरी कृपेशिवाय, अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजेच पर्यायाने असं नक्कीच म्हणता येईल की, प्रत्येक सद्गुरूंच्या मागे, ईश्वरी पेरणा, शक्ती व ऊर्जा ही नक्कीच असते. म्हणूनच कोणत्याही सद्गुरूंच्या प्रेरणेने आपण साधना करत असलो तरीही, त्यामागे ईश्वर उभा असतो, निश्चित.
सद्गुरुंचा दुसरा प्रकार म्हणजे जे साधनेने, भक्तीने आणि आपल्या वृत्ती, प्रवृत्ती व निग्रह यांच्या सहाय्याने मनातील विकार, शत्रू यांच्यावर जय प्राप्त करून, आपल्या गुरु कृपेने अश्या ठिकाणी पोचतात,जिथे प्रत्यक्ष सद्गुरू तत्व त्यांना, ते उच्चपद प्रदान करून, तो अधिकार देतात, जो सर्वमान्य सद्गुरूंना प्राप्त होतो.
अशी साधनेची, भक्तीची, त्याग, वैराग्य व निग्रह यांची पराकाष्ठा केलेले अनेक पवित्र व सात्विक आत्मे, चैतन्य स्वरूप प्राप्त करून, चिदानंदात रत असतात. पण कोणतेही सद्गुरू हे सिद्धआत्मे असतात. त्यांना फक्त आणि फक्त आपल्या साधकांचा मोक्षमार्ग सुलभ करणं, याचीच ओढ, चिंता व प्रेरणा असते. त्यासाठी आवश्यक ते सर्व कारण ही त्यांची मनीषा असते. त्यांचा अंतरात्मा शुद्ध असल्यामुळे, त्यांना जनहित, परहित साधणं आणि परदुःख शांतीसाठी कार्यरत असणं इतकंच माहीत असतं.
स्वयं ज्या ठिकाणी विराजित आहोत, ते सुखस्थान नसून, एक ईश्वरी प्रेरणा व जबाबदारी आहे, याची जाणीव व ज्ञान असल्यामुळे, साधक व भक्तांनी, मधेच हात, साथ वा साधना बंद केली, सोडली तरीही, त्यांना हरप्रकारे, पुन्हा सन्मार्गावर वा योग्य मार्गावर आणणं, हे प्रत्येक सद्गुरूंच्या मनात कायम असतं.म्हणून प्रत्येक सद्गुरूंच्या अंतर्यामि साधक हित, हे सर्वतोपरी उच्छा ध्येय व ब्रीद असते.
सद्गुरूविषयी जाणून घेतल्यानंतर, त्यांच्या कृपा प्राप्ती विषयी, उद्याच्या भागात जाणून घेऊ. पण आपलं नामाचं सत्कार्य सुरूच ठेवूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment