भोग आणि ईश्वर ५४८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालच्या लेखातील शेवटच्या भागातील विचाराचा सखोल अभ्यास करूया. मुळात आपल्या आयुष्यात जात असलेला प्रत्येक क्षण हा आपण कर्माच्या लेखणीने आपल्या आयुष्याच्या ललाट पटलावर लिहिलेला असतो. तो क्षण त्यानुसारच जाणार. आपण त्याबाबत फक्त आणि फक्त एक प्रेक्षक म्हणून त्या जाणाऱ्या क्षणाकडे पाहिलं तर त्यातून घडू पाहणारा, अतिरिक्त कर्माचा आलेख तरी नक्कीच थांबू शकेल. निदान तसा प्रयत्न आपण नक्कीच करून पाहू शकतो.
यामधे, मागे म्हंटल्याप्रमाणे, आपण प्रतिक्रियेच्या जाळ्यात अडकणार नाही. अश्या प्रत्येक क्षणातील प्रत्येक कर्मफलाचा आलेख आपण उतरता ठेवण्याचा प्रयत्न करून बघू शकतो. आता अश्या प्रत्येक प्रयत्नात आपलं मन आपण नियंत्रणात ठेवलं किंवा त्यावर थाप मारणारे, कर्मफलाच्या लहरी, निष्प्राण होतील. म्हणजे त्या अनिष्ट असतील तर, नक्कीच उलट परिणाम न करता नष्ट होतील. त्याचप्रमाणें, त्या जर, सकारात्मक असतील तर आजूबाजूची नकारात्मकता कमी होईल.
पण यासाठी आपण करत असलेलं चिंतन, साधन हे सकस, शुद्ध व सात्विकता निर्माण करणारं असावं. पण क्षण क्षण घडत जाणाऱ्या कर्मसाखळीत, आधीच्या कर्मफलाला सकारात्मक रित्या सुधारण्याची वा अनिष्ट असल्यास नष्ट करण्याची शकतो असावी. असं क्षणाक्षणाला जोडणारं साधन हे घडत असलेल्या परिणाम वा फळाला तेंव्हाच जोडेल, ज्यावेळी आपण घडून गेलेल्याची चिंता वा काळजी न करता, फक्त वर्तमानात जगायला शिकलो तरच.
याचं साधं कारण म्हणजे घडून गेलं ते आपल्या हातात naahic आणि घडणारं आतातरी आधांतरी किंवा अज्ञातात आहे. मग उरतो तो चालू क्षण. त्यातसुद्धा जर आपण दुःख, भोग, राग लोभ यांचाच विचार करत जात असलेलं प्रत्येक क्षण वाया घालवला तर काहीच अर्थ उरत नाही. यातून एक गोष्ट नक्की घडेल वा घडतही असेल. आपल्याला समोर आलेल्या धक्यातून वा भोगातून पुढे जाण्यासाठी दिलेला बहुमूल्य वेळ, श्रम इत्यादी आपणच आपणहून वाया घालवला.
अनुभव ही खूप मोठी देणगी आहे. ज्या योगे आपण आपल्या मनाला, याबाबत समजावू शकतो. अनेक घडून गेलेल्या गोष्टी आठवून, काढून वा उगाळून अर्थ नसतो. म्हणून त्या दुःख व भोग भावनेतून, बाहेर येणं महत्वाचं आहे. यासाठी घडलेल्या गोष्टीवर जर आपलं नियंत्रण होऊ शकलं असतं, तर या गोष्टीचा उपयोग, घडत असलेल्या किंवा घडणाऱ्या कर्मांसाठी वापरू शकतो. म्हणजे घडत असलेलं, सुखरूप घडेल. किंवा तसा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो.
पण जर वाट्याला आलेलं दुःख वा भोग अश्या प्रसंगातून आलेत, ज्यावर आपलं काहीही नियंत्रण असू शकलं नसतं. मग या गोष्टीचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही. या निष्कर्षाला आल्यानंतर, आपण घडत असलेलं कर्म व भविष्यात घडणारे कर्म कश्याप्रकारे, सुधारता येईल आणि त्यासाठी कृपा कशी उपयोगात येईल, यावर चिंतन करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment