Skip to main content

भोग आणि ईश्वर ५६२

भोग आणि ईश्वर  ५६२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

प्रत्येकाच्या आयुष्यात एका विशिष्ट वयात व काळाच्या विशिष्ट कालखंडात, उमेद संपल्यानंतर, निवृत्त होण्याची स्थिती येते. त्यावेळी अनेक गोष्टी, ज्या करायच्या राहिलेल्या असतात किंवा नोकरी धंद्याच्या काळात, त्या करता आलेल्या नसतात, त्या करण्यासाठी निवडल्या जातात. बहुतांश जण, त्या काळात, अध्यात्म, वाचन, मनन, चिंतन, इत्यादी अनेक क्षेत्र निवडून, त्यात वेळ घालवून, मन शांत करून, आयुष्यात आलेले चढउतार, बरे वाईट अनुभव, दुःख भोग इत्यादींमुळे आलेला शिणवटा, मनात त्यावेळी तयार झालेले, पण अव्यक्त असलेले भाव, या अध्यात्मिक वाचन व चिंतन या माध्यमातून, घालवण्याचा अर्थात release करण्याचा प्रयत्न करतात.

अर्थात यात काही गैर आहे असं मला म्हणायचं नाही. पण या उदाहरणातून, जे तत्व आपल्याला सापडतं, त्यावर आपण विचार करण्याचा प्रयत्न करूया. यातून एक लक्षात येतं की, एका ठराविक काळानंतर, मनाला काही स्वस्थता, शरीराच्या हळूहळू मंदावत जाणाऱ्या हालचालीतून डोकावणाऱ्या स्वास्थ्याच्या चिंता या सर्वातून, शांतता व मोकळीक हवी असते. मग विचार करा की, अनेक देहातून, अनेक जन्मातुन आणि काळाच्या वेगवेगळ्या कालखंडात वावरणाऱ्या आत्म्याला, एक देह सरत असताना, हाती काही न मिळाल्याचं दुःख, खिन्नता, निराशा किती येत असेल. 

पण मानव म्हणून, कित्येक जणांना या गोष्टीचा पत्तासुद्धा नसतो की, आपल्या देहातील आत्म्याला, ज्या कारणां साठी हा देह प्राप्त झाला आहे, ते साधण्याचा, योग कधी येईल की नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, आपल्या देहातील आत्म्याला आपण वेगळं मनात नाही. किंवा त्याला त्याची ओळख, या देहाच्या व्यापात, होतच नाही. ज्यावेळी ही ओळख, ही वेगळी जाणीव होईल, त्यावेळी, त्या आत्म्याच्या मुख्य उद्देशांची ओळख, जाणीव व त्यासाठी काही करण्याची प्रेरणा होईल. यालाच आत्म तत्वाची ओळख किंवा खरी जागृती म्हणता येईल. 

यासाठी मुळात देह म्हणून अस्तित्वात असलेला आणि ज्ञानेंद्रियांना जाणवणारा मी आणि माझ्या देहातील चैतन्य स्वरूप व या देहाचा खरा मालक असलेला मी अर्थात आत्मा, हे जाणवले पाहिजेत. ही वेगवगळी ओळख, जागृत झाली पाहिजे. ही जाणीव जागृत होण्यासाठी, ही ओळख पटण्यासाठी , जे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे, त्या ज्ञानाचं नाव, म्हणजे अध्यात्म. हेच आपण उतार वयात, गात्र शिथिल होताना आणि आता देहाची सांगता होताना सुरू करतो. थोडफार काही समजायला, जाणवायला, कळायला लागल्यानंतर, वा त्याच सुमारास आपण देह सोडतो. 

कुठेतरी, त्या आतील आत्म्याला, जागृती येत असताना, आपण केलेली सर्व कर्म कळत असताना, देहाला सोडून जाण्याची वेळ येते. आत्मा इथे हतबल होतो. कारण ज्यासाठी त्याने हा देह धारण केला,त्या उद्देशाना पूर्णत्वाला नेण्याचा मार्ग,काळ येण्याआधी देहाने स्वतःची इतकी झीज, करून घेतली की, आत्म्याला काही करण्याची व काही प्राप्त करण्याची संधीच मिळाली नाही. या अपार खिन्नतेत देह सोडणारा आत्मा, पुढे काय काय करतो किंवा या मानसिकतेतून अंत झालेला आत्मा कसा प्रवास करतो, हे आपण उद्याच्या भागात पाहूया. पण नामस्मरण सुरू ठेवूनच. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...