Skip to main content

भोग आणि ईश्वर ५७१

भोग आणि ईश्वर ५७१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
आत बाहेर सर्व व्यापून उरलेल्या त्या ईश्वराला जाणण्या साठी मुळात कुठेही जायची खरतर आवश्यकता नाही. कारण कालच्या बादलितील त्या भांड्यात आणि उर्वरित बादलीत असलेल्या जलाप्रमाणे, ईश्वरी अंश देहाबाहेर आहे, तसाच तो आत्मरुपात, देहात सुद्धा वास करून आहेच. अर्थात त्याला बाहेर कुठे शोधण्यापेक्षा, हृदयात वस्ती करून असलेल्या आणि सर्व देहाला चैतन्य देणाऱ्या, आत्म्याला जागृत करणं, हा एकच उपाय सर्वोत्तम आहे. 

खोलात जाऊन विचार केला तर हृदयात वसलेला आत्मा ऊर्जा, बल व चैतन्य स्वरूपात संपूर्ण देहात, अर्थात प्रत्येक पेशीत, नसांमध्ये, धमन्या, रुधिर अर्थात रक्त यांमध्ये सतत फिरत आहेच. हा प्रकृतीचा, विधात्याचा, एकप्रकारे चमत्कार आहे, ज्याप्रकारे हा देह आणि त्याची रचना त्याने केली आहे. आला इतका उत्तम देह, प्रत्येक पेशीमध्ये चैतन्य, हे सर्व ईश्वराने मानवाला देताना, किमान अपेक्षा ही केली की, हा मानव, याबद्दल आपले आभार मानेल. 

तरीही ईश्वर कधीही त्या अपेक्षेने काहीही करत नाही. किंबहुना जगत निर्मिती करतेवेळी, ईश्वराने निरपेक्ष बुद्धीने, संपूर्ण ब्रम्हांड रचून, सर्व व्यवस्था स्वयंचलित पद्धतीने सुरू करून देऊन, आपण समाधिस्थ झाला. अर्थात, अपेक्षा ही होती की, या जगतातील सर्व व्यवहार, नित्य, सुरळीत आणि उत्तम प्रकारे चालतील. कशाही गोष्टीत, कोणालाही त्रास होणार नाही. 

परंतु विश्व निर्मिती करताना, स्वयंचलित व्यवस्था निर्माण करण्याच्या व मानवाला या जगतात गुंतवून ठेवायच्या दीर्घ कालीन उद्देशाने, माया नावाची अदृश्य पण संपूर्ण जगताला व्यापून, जगताला आपल्या तालाने चालवणारी, एक व्यवस्था, ईश्वराने निर्माण केली. या मायेने, प्रत्येक जीवाचं जन्म ते मृत्यू, असं जीवन व्यापून टाकलं. या मायेच्या प्रभावात, जीव अनेक प्रकारच्या आसक्ती, प्रलोभने, मोह, मद, गर्व, अपेक्षा, वासना, क्रोध इत्यादी वेगवेगळ्या भावांनी, घेरला गेलेला असतो 

किंबहुना संपूर्ण आयुष्य काही मिळवणं, मिळवलेलं टिकवणं, याचं प्रपंचात, मायेच्या प्रभावामुळे, गुरफटून राहतो. यातून तयार होणारी कर्माबंधनं, जीवाला बद्ध करतात. म्हणजे सरतेशेवटी, जीवाला मायच, व्याप्त, ग्रस्त व त्रस्त करते. किंबहुना मायेचा अभाव असलेली एकही जागा या जगतात नाही. चेतनाहीन देह हेच मायेचा अभाव असलेले एक ठिकाण आहे. पण मायाराहित होता येणं शक्य आहे का. किंवा अशी स्थिती ही शक्य आहे का. यावर उद्या चर्चा करूया. पण तोपर्यंत, त्याचं सर्वव्यापी ईश्वराचं स्मरण करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...