Skip to main content

भोग आणि ईश्वर ५५८

भोग आणि ईश्वर  ५५८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
जेंव्हा आपण जन्म व मृत्यू आपल्या हातात नाही, असं म्हणतो, त्यावेळी ते अर्ध सत्य असतं. किंवा असं म्हणता येईल की, ईश्वरी अंशातून, एक अंश या ब्रम्हांडात पुढील यात्रेसाठी येतो, तोच मुळात ईश्वरी संकल्प असतो. म्हणजे मग, असं म्हणता येईल का की, पुढचा सर्व प्रवास किंवा यात्रा हा ईश्वरी संकल्पच असतो.  पण तसं नाही. याचं कारण की, एकदा या ब्रम्हांडात आत्मा आला की, तो या ब्रम्हांडातील वातावरण, लहरी, पंचमहाभूते यांचे जगत या सर्वातून निर्माण झालेली माया, या सर्वांच्या प्रभावात येऊन आधीन होतो आणि या जगताचा एक भाग होतो. ही आधिनता, ही अपरिहार्यता आहे पण आणि नाही पण. यावर उद्या चिंतन करूया. 

म्हणजे नंतर जे काही कर्म त्याच्या हातून होतं, ते त्याच्या स्वतःच्या उद्देशांचा, जबाबदारीचा भाग असतो. म्हणजेच नंतर घडणारा सर्व प्रवास हा अनंताकडे नेणारा वा जाणारा असतो. आता या प्रवासात जीवाला जे भोगावं, बघावं लागेल, याचं उत्तरदाित्वसुद्धा, त्या जीवाचच असतं. पण मग तरीही आपण का म्हणतो की, जन्म आणि मृत्यू, आपल्या हातात नाही. 

कदाचित हाच संभ्रम आणि हीच गूढता जीवाला आयुष्यभर आणि जन्मोजन्मी चुकीच्या समीकरणात अडकवून, त्या जीवाला ब्रह्मांड सागरात, हेलकावे खायला सोडून देतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे विकारवश, अज्ञानाने आत्मतत्वावर केलेलं आवरण. एकप्रकारे अंध व्यक्तीचा या जगात घडणारा प्रवास वा जीवनयात्रा, ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे, ही स्थिती आहे. 

या सर्वात, योग्य ज्ञान आणि योग्य साधनेनेच, त्या जीवाचे आत्मनेत्र उघडून, जे ज्ञान हा देह, बुद्धी व मन यांच्या पलीकडे आहे, ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. पण या देहाच्या ज्या मर्यादा आहेत, त्या पार करून, ते नेत्र व जाणीवा उघडून, जीव या जगतात आला ते या जगातून जाण्या साठीचं ज्ञान प्राप्त होऊन, जीव त्या मार्गाकडे जाण्याचा विचार करू शकतो. म्हणजे यासाठी आत्मनेत्र, जाणीवा यांना उघडू शकणारी काही गोष्ट घडली तरच, ती ज्ञान प्राप्ती होईल. 

कारण नुसतं वाचून, ग्रहण होईल, पण जाणीव जागृती ही सर्वस्वी त्या जीवाची कर्म संपवून वा जाळून अर्थात नष्ट करून झाल्यावरच शक्य आहे. कारण जोपर्यंत कर्माचा एक एक थेंब शिल्लक आहे, तोपर्यंत, मुक्ती मोक्ष यांच्या बाबत जाणीव जागृती होणं अशक्य आहे. कर्म भोग संपण्यासाठी, त्या कर्मातिल मनाचा सहभाग संपणं अत्यंत गरजेचं आहे. हे गुरुकृपेने, साधनेने, भक्तीने, योगाने आणि यम नियम यांनी शक्य आहे. 

खरंतर सामान्य जीवाला, या सर्वांच्या जवळ नेण्यासाठी, ज्ञान, निष्काम कर्म, साधना, कृपा, अर्पण, शरण, सेवा, भक्ती, श्रद्धा, नियम आणि स्मरण या गोष्टी साधता येणं आवश्यक आहे. यातील कित्येक जन्मोजन्मीच्या पुण्याई वर, प्राप्त होतात. इथेच एक गूढता आहे. ती म्हणजे, कर्म जीवाला जन्म मृत्यूच्या बंधनात बांधून ठेवतं आणि कर्मा तुन बाहेर पडलं तरच जीवाला या जगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. 

म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की, जन्म आणि मृत्यू हे आपणच आपल्या कर्मानी लिहून ठेवतो आणि कर्मातील आसक्ती, इच्छा, वासना, ओढ यांचा त्याग जीवाला जन्म आणि मृत्यू यांच्या साखळीतून बाहेर काढतो. ब्रम्हांडा तील माया, वातावरण, पंच तत्व यात जीवाची आधीनता यावर पुढे चिंतन उद्याच्या भागात सुरू ठेवू पण नामाचा हात न सोडता. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...