भोग आणि ईश्वर ४९३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।
आपण ज्या विषयासंदर्भात चिंतन करत आहोत, त्या शरणागती बाबत मनात अनेक विकल्प उभे राहतात. त्या विकल्पातून, शंकाकुशंका, इष्ट अनिष्ट विचार येतात. याचं कारण म्हणजे मनात सकार व नकार भरलेला आहे. तो मनातून तो आत्म्याला देखील ग्रासून उरतो. सर्व शंका, संशय, संदिग्धता या मनातूनच उत्पन्न होतात. मुळात त्या तिथे असतात, फक्त काहींच्या बाबतीत, ते भाव विशेष प्रकट होऊन, मनावर राज्य करतात.
या व्यक्तींना अंशतः ते संपूर्ण अश्या वेगवेगळ्या प्रमाणात, या शंका, संशय व संदिग्धता या भावांनी ग्रासलेलं असतं. ग्रासणं या शब्दातच,ते भाव मनाचा घास घेतात हे अध्याहृत आहे. पण हे ग्रासणं कायमस्वरूपी, तेंव्हा असेल ज्यावेळी ते, संपूर्णपणे मनाला ताब्यात घेतं. हे भाव मनात हळूहळू ते अतिजलद पसरतात. त्यामागचा तर्क किंवा कारण असं आहे की, मनाच्या कुवतीवर यांचं प्रवेशणं ते प्रसारित होणं अवलंबून आहे.
कुवत म्हणजे मनाची स्वतःची शक्ती, बल व ऊर्जा. म्हणजे जर मनाची शक्ती ही प्रभावी असेल तर, त्या मनात बाहेरून कोणतीही गोष्ट वा विचार अथवा विखार आत जात नाही वा जाऊ शकत नाही. म्हणजेच बाहेरील कोणताही नकारात्मक विचार आतील अनिष्ट केंद्रांना प्रभावित करू शकत नाही. वास्तविक ही ऊर्जा व शक्ती सर्व मनात अस्तित्वात असते. मात्र काही मनात ती शक्ती व ऊर्जा प्रभावहीन किंवा बलहीन असते. या प्रभावहीन उर्जेला आणि शक्तीला प्रभावशाली किंवा बलशाली करण्याचे उपाय मागेच विस्ताराने चर्चिले आहेत.
त्यानुसार कमी कुवत वा शक्ती असलेल्या मनाला, लुप्त झालेली किंवा कमजोर झालेली बल व ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी, सतत सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या व त्याद्वारे मनाची शक्ती वाढवणाऱ्या, विचारांचं खाद्य देणं वा देत राहणं, हा सर्वतोपरी उत्तम मार्ग आहे. या कार्यातसुद्धा, सर्वात श्रेष्ठ उपाय म्हणजे भगवननाम आणि सतत ईश्वरस्मरण हा उपाय सर्वश्रेष्ठ आहे. कारण या स्मरणातून वा चिंतनातून फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, मनाचं बल वा कुवत वृद्धी होते.
याद्वारे मनाचं बल पूर्ववत करून, आत्म्याला नकारातून सकारात आणता येईल. अश्या सकारात्मक ऊर्जा व बल याने परिपूर्ण मनाला, शंकाकुशंका, संशय व संदिग्धता हे तणरूपी भाव ग्रासू शकत नाहीत, किंबहुना अश्या सकारात्मक मनात, हे भाव प्रवेशुच शकत नाहीत. एकदा मन संशयरहित व शंकारहित झालं की, स्मरण व शरण यांना साध्य करायला, ते संपूर्णपणे तयार होईल.
कारण स्मरण व शरण हे, शुद्ध, सकारात्मक बलाने व ऊर्जेने भरलेल्या आणि भारलेल्या मनाने निःसंशयपणे साधता येईल. या स्मरण व शरण या जोडीला बांधणारी तिसरी गोष्ट वा भाव असणं अत्यंत आवश्यक आहे, किंबहुना तो या दोघांचा प्राण आहे. त्यावर उद्या चिंतन करूया. तोपर्यंत नामाचं चिंतन आपण करतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment