भोग आणि ईश्वर ५४५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालपर्यंत आपण पाहिलं की, आपल्या मनातील विचार हे आपले खरे मार्गदर्शक, दिशादर्शक असतात. हे विचार दूषित वा पूर्वग्रहदूषित असतील,तर आपल्याला दिसलेला वा जाणवलेला मार्ग, साफ चुकीचा असू शकतो. जर मार्ग चुकला तर, आपलं कर्म चुकणार आणि चुकीच्या कर्माचं, त्यानुसार फल, समोर येऊन उभे राहणार. त्यावेळी आपल्याला हे लक्षातही येणार नाही की, आपणच चुकीच्या विचाराने भारले जाऊन, आपलंच कर्म चुकीचं लिहून ठेवलं, जे काळाने आपल्यासमोर आणून ठेवलं.
म्हणून आधी मार्गदर्शक योग्य असणं खूप महत्वाचं आहे. आता आपले विचार हे, आपलं ज्ञान, जाणिवांची जागृती आणि त्यांची व्याप्ती, अनुभव,अनुभूती,कल्पना, भविष्या बद्दल ज्ञान, माहिती व अंदाज या सर्वांवर अवलंबून आहे व असतं. यामध्ये खूप महत्वाचा घटक जो योग या तत्वाशी जोडलेला आहे, असं आपण दोन तीन दिवसां पूर्वी पाहिलं. ज्यामध्ये, ज्ञान जाणीवा अनुभव या बरोबरच योग देखील आपल्या विचारांना, मनाला आणि बुद्धीला कार्यरत, प्रेरित व उर्जित करायला कारणीभूत असतात, असं म्हटलं.
यातील ज्ञान व जाणीवा या विचारांनी, माहितीने, अनुभवाने, साधनेने परिपक्व होतात. पण योग हे पूर्णतः आपल्या पुण्यकर्म व सद्गुरू कृपा यावर अवलबून असतात. एक उदाहरण लक्षात घेऊ. आपण आर्थिक, व्यावसायिक व व्यावहारिक क्षेत्रात आपल्या ज्ञान व अनुभव यांच्या बळावर उत्तमपैकी अंदाज वर्तवू शकतो. तो बऱ्यापैकी योग्य होऊ शकतो. पण जगात आणि जीवनात काही गोष्टी या आपली कल्पना व ज्ञान याहून भिन्न घडतात. ज्यावर आपलं कोणतंही नियंत्रण असतं नाही किंवा असू शकत नाही.
अश्या गोष्टी, घटना, प्रसंग इत्यादी कदाचित आयुष्याची दिशा, मार्ग, गती आणि प्रगती वा अधोगती, यांना बदलू शकतात. अश्यावेळी, आपल्या नियंत्रणाबाहेरील घटना, प्रसंग, गोष्टी, व्यक्ती इत्यादींवर नियंत्रण असणाऱ्या वा नियंत्रित करू शकणाऱ्या शक्तिस्थानाला, योग म्हणतात. किंबहुना ज्या सर्व गोष्टी आपल्या नियंत्रण कक्षेबाहेर येतात, त्या घडण्यासाठी वा टाळण्यासाठी किती प्रमाणात असे योग कार्यरत असू शकतात, यावर आपण विचार करूया.
अश्या काही उदाहरणांचा आपण विचार करूया, म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल. समजा एखादी परीक्षा आहे, मुलाखत/interview आहे वा महत्वाची बैठक अर्थात मीटिंग आहे. आपण त्यासाठी पूर्वतयारी व्यवस्थित केलेली आहे. ज्या दिवशी हे घडणार आहे, त्यादिवशी कर्मधर्मसंयोगाने काही रेल्वेची गैरसोय किंवा आपण जात असलेल्या वाहनाची नादुरुस्ती यापैकी काही किंवा इतर काही अडचणी येऊन, बेत स्थगित झाला, रद्द झाला किंवा उशिरा पोचल्या मुळे मनासारखं सादरीकरण नाही घडलं. आला की नाही यात योग.
अश्यावेळी मनात विचार येतात की, का हे असं घडावं, का इतकी मेहनत करून मुख्य कर्म करण्याचा योग चुकावा किंवा नीट न घडावा. काय दोष झाला इत्यादी इत्यादी. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण असे अनेक अनुभव आपल्याला नित्य येतात आणि त्याचं उत्तर सापडत नाही. यावर उद्याच्या भागात विचार करूया. पण आपलं नामाचं नीज कर्तव्य करत राहूया, ते नक्की फलरुप होईल.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment