भोग आणि ईश्वर ५६० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
खरतर सहज सोप्पा असा वाटणारा एखादं प्रश्न प्रत्यक्षात आपल्याला सोडवायला अत्यंत कठीण जावा त्याप्रमाणे, हा सारा गुंता आहे. माणसाला दुःख, दैन्य, भोग, अनिष्ट काळ, कष्ट काळज्या, येणार आणि त्यानंतर सुखाचा, उपभोगाचा काळ सुद्धा येणार. खरी परीक्षा, या दोन्ही काळाना, तोंड देण्यात वा त्यातून नीट जाण्यात नाही, तर त्यामध्ये मनाचा तोल ढासळू न देता, मनाची शुद्धता राखण्यात खरी परीक्षा आहे.
म्हणून मनाला सांभाळणारं, त्याला ज्ञान देणारं, जाणीवा जागृत करून, देहाच्या गरजा कमी करत करत, मनाला अंतर्मुख करणारं असं काही असा, या उद्देशाने, ईश्वराने अनेक गोष्टी घडवल्यात. जेंव्हा आलं ईश्वराने घडवल्या असं म्हणतो, तेंव्हा आपण या विश्वात निर्माण झालेल्या, प्रत्येक निर्जीव व सजीव गोष्टीचा निर्माता, या दृष्टीने त्याला संबोधतो. वास्तविक आपण त्याला कधीही पाहिलं नाही, तरीही ज्ञानाने, जाणीवानी चर्मचक्षुंनी, जगाकडे, त्यातील प्रत्येक घटनेकडे, सूक्ष्मातील सूक्ष्म जीवाला जाणून, अंतर्नादाने, मनःचक्षूनी अश्या अनेक प्रकारे त्याला या जगतात साक्षीभूत मानतो.
या त्याच्या अस्तित्वाच्या अनेक खुणा आढळतात. मग ज्यावेळी या सर्वांची मनाला खूण पटते, मन काही क्षण अंतर्मुख होतं. या अश्या अंतर्मुखतेत, मनाला आत नेण्याची शक्ती आहे आणि हेच साध्य कारण हा या जीवाचा आटापिटा आहे. कारण मन अंतर्मुख होऊन, आत आत्म्याला जाणण्यासाठी त्याच्याकडे प्रवास सुरू करत.
जगातल्या सर्व तत्वज्ञानाचा, वेद पुराण स्तोत्र मंत्र आदीचा उपयोग याचसाठी आहे. मन बाहेरील सर्व चिंतन, विचार, कर्म, वासना, आसक्ती, क्रोध माया सोडून, या जगापासून दूर आपल्या अंतराम्याकडे वळलं पाहिजे. या मनाच्या आत वळवून, त्याला आत्म तत्वाकडे, पाहायला लावण्याच्या प्रक्रियेसाठी योग यागादी अनेक क्रिया, प्रक्रिया योजण्यात आल्यात.
या सर्वांचा लाभ घेण्यासाठी, देहाला, बुद्धीला व मनाला, काही विशिष्ट अवस्थांमधून जावच लागतं. या अवस्थेतून जाताना मनाला अनेक परीक्षा द्यावा लागतात. सहज सोप्या भाषेत त्यांना अध्यात्मिक मार्गक्रमण म्हणतात. अनेक मार्ग धरावे लागतात, अनेक साधनं करावी लागतात, त्यानंतर मनावर थोडं नियंत्रण शक्य होतं. पण तरीही, अनेकदा आयुष्यभर प्रयास करूनही, कधीकधी जीव तसूभर सुद्धा पुढे जात नाही किंवा जाऊ शकत नाही.
याचं कारण अनेकदा, प्रारब्धात किंवा संचीतात काही कर्म अपूर्ण असतात. त्यांच्या पूर्तते शिवाय, आत्मा जन्माच्या बंधनातून मुक्त होणार नसतो. त्यामुळे काही भोग हे भोगुनच संपवावे लागतात. त्यांच्या परिमार्जनाचा, अन्य उपाय उपलब्ध नसतो. ईश्वर वा सद्गुरू सुद्धा याबाबत काही करू शकत नाहीत. काही करू शकत नाहीत, याचा अर्थ, तसं त्यांनी काही n करण्यात आपला दूरगामी हित आहे, हे त्यांना माहीत असतं.
यावरील पुढील चिंतन उद्याच्या भागात बघुया. पण नामाच्या संकल्पाला दृढतेने तसच धरुनच.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment