भोग आणि ईश्वर ५४९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
सर्वसामान्य जनांना आपल्या कर्माच्या आलेखातून, आपल्या ललाटी असलेली, जन्म मृत्यू रूपातील पुनरावृत्तीस्वरूप आयुष्य जगत जगत मागील पानावरून पुढे सुरू, असं प्रारब्ध भोगायचं की, यातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या वाटेवर वाटचाल करायची.
पण मुळात ही जाणीवच नसेल की, मी बद्ध आहे आणि मला मुक्त व्हायचं आहे, तर ही जाणीव आधी उत्पन्न होणं महत्वाचं आहे. त्यासाठी जीवाला जाग आणणं हे सर्वात पहिलं काम आहे.
यासाठी दयासागर. ईश्वराने अनेक गोष्टी अंमलात आणल्या आहेत. संत महंत, भगवत भक्त इत्यादी मार्गांनी ईश्वर आपल्या कनवाळू पणाची साक्ष देत असतो. हे संत महंत, ऋषीमुनी, साधू सन्यासी, नवविधा भक्तीच्या मार्गातून, भजन कीर्तन, प्रवचन, संबोधन इत्यादी अनेक मार्गांनी, सर्वसामान्य माणसाला हे समजावून सांगण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. त्यातून काहीजणांना समजतं, जाणवतं, ज्ञान प्राप्त होतं. त्यातील काही जण यावर जाण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी होणं न होणं, हे सर्वस्वी इश्वराधीन आहे.
कारण जो पर्यंत आपलं प्रत्येक कर्म हे त्या ईश्वराला. समर्पित होणार नाही, तोपर्यंत त्या कर्मातून निर्माण होणारं फल देखील ईश्वराला अर्पित होणार नाही. म्हणजेच ईश्वरी प्रेरणेने मी हे प्रयत्न करू शकलो, आता जे परिणाम होतील, ते सर्वस्वी ईश्वराच्या मर्जीवर अवलंबून आहे. ही वृत्ती अर्पण व शरण भक्तीची उत्तम साक्ष म्हणता येईल.
यात सर्वात शेवटी जे म्हटलंय की ईश्वराच्या मर्जीवर किंवा इश्र्वराधीन आहे, यामधे विनम्रता, आपण निमित्त आणि ईश्वर कारण हे आपण अध्याहृत करतो. असं करण्याचं अजून एक कारण म्हणजे, सर्व सृष्टीचा, ब्रम्हांडाचा निर्माता, नियंता आणि नष्टकर्ता, स्वतः तोच आहे. इतकं असूनही, जो फक्त साक्षीरुपात आपलं अस्तित्व या जगतात दाखवतो. पण या सृष्टीतील प्रत्येक सजीव व निर्जीव याचं चलनवलन, पालनकर्ता या नात्याने स्वतः पाहतो,
असा हा ईश्वर एक खेळ मांडून बसला आहे. तो कधीही आपला कसलाही हस्तक्षेप या जगताच्या कारभारात करत नाही. जीवाच्या जगण्यातील प्रत्येक श्वास, त्या जीवाला आपल्या मर्जीने जगता येईल, हेखील पाहतो. पण मानवाला आपला अस्तित्व कळेल, जाणवेल याची क्षणोक्षणी तजवीज करून ठेवतो. याचं अस्तित्वाच्या खेळाला योग असं म्हटलं जातं. बरेचदा आपण काही गोष्टी योजलेल्या असताना त्याहून भिन्न गोष्टी घडून येतात.
या गोष्टी आपल्या मनातील योजनांहून भिन्न,, कदाचित अनपेक्षित व बरेचदा गूढ असतात. त्या घडल्यावर आपण विचार करतो की, हे कसं काय घडून आलं. नेहमी चांगल्या योगाच्या गोष्टींमधे ईश्वरी हात किंवा संकेत असतात. ते जाणवावेत अशी त्याची इच्छा नसते. कारण तो स्वतः निरिच्छ आणि निरपेक्ष असतो.
त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्या संकेतांबद्दल आणि त्याच्या कार्यकारण भावाबद्दल उद्याच्या भागात चर्चा करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment