भोग आणि ईश्वर ५७५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
खरंतर नेट (मराठी) अर्थात चिकाटी ही सर्वच क्षेत्रात उत्तम लाभ देते हे नक्कीच. पण ईश्वर कार्यात किंवा अध्यात्मिक मार्गात, चिकाटी नक्कीच अती लाभदायक मानली जाते. कारण इथे कोणताही प्रापंचिक लाभ मिळावा यासाठी आलेल्यांना पदरी निराशा प्राप्त होऊ शकते. कारण प्रपंचातील लाभ हानी हे कर्मधिष्टीत आहेत, हे सर्वश्रुत आहे. म्हणजे तिथे जे पेराल तेच उगवेल हे नक्की. कर्म आणि फल यांचा ताळमेळ किंवा फल प्राप्तीची वेळ ही, कर्माच्या गतीवर अवलंबून आहे.
त्यामुळे प्रापंचिक जीव हा समोर हे फल येईल, त्यानुसार आपलं मत, भाव आणि इच्छा अपेक्षा ठरवतो. किंवा साहजिक तसच मत भाव आणि अपेक्षा ठरतात. पण अतीदुःख आणि अतीसुख माणसाची मती आणि मतं बदलू वा बनवू शकतात. म्हणजेच एकप्रकारे ज्याला आपण बुद्धीभ्रम म्हणजे ब्रेनवॉश म्हणतो तेच करतात. कारण आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या खूप छोट्या ते खूपच मोठ्या, सुखद आणि दुःखद घटनांच्या आधारे आपली मतं बनवतो किंवा ते आपली मती घडवतात वा बिघडवतात. अर्थात हा झाला बुद्धीभ्रम.
मग अपेक्षित काय हा एक प्रश्न या ठिकाणी सहज मनात येईल. अपेक्षित काय याचं उत्तर किंवा याचे विकल्प अर्थात options अनेक मार्गांनी, अनेकांनी सांगुन ठेवलेत किंवा आपल्या जगण्यातून दाखवून दिलेत. त्यातील काही, संसारात न येता साध्य करता येतात किंवा करावे लागतात. तर काही संसारात राहून आणि प्रपंच करता करता साध्य करता येतात. अर्थात यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत.
प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेतून, त्यावर दीर्घ भाष्य करून, अर्जुनाच्या माध्यमातून, विषादग्रस्त जीवाला, विषादातून बाहेर येण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. पण अर्जुन हा परम ईश्वराचा सखा असल्याकारणाने, त्याचे सर्व लाड पुरवत, त्याच्या मनातील सर्व शंकांचं निरसन, योग्यप्रकारे करत, भगवंतांनी अंती, त्याला विजयाप्रत नेल. आता इथे प्रश्न येतो की, मी अर्जुन नाही आणि अर्जुनासम महत्तम नाही, मग माझ्यासाठी, कोण ईश्वर का येईल.
आणि तो समर प्रसंग होता, ते रणांगण होतं, म्हणून ईश्वर तिथे, त्या काळात उपस्थित होते. त्यामुळे सुद्धा उपदेश करणं, अर्जुनाने ते ऐकणं आणि कर्मप्रवृत्त्त होणं हे घडलं. माझ्यासाठी कोण ईश्वर, या भुवर येईल, उपदेश करेल, हृदयाशी धरेल. मग मी अर्थात अर्जुन सोडून सर्व सामान्य जन काय करू शकतात. खरतर याचं उत्तर प्रत्यक्ष भगवंतांनी स्वतः गीतेत मांडलं आहे. नव्हे गीतेमध्ये त्याची साक्ष त्यांनी पदोपदी देऊन ठेवलेली आहे. कारण त्रिकाल ज्ञानी असलेल्या भगवंतांनी, हे नक्कीच जाणलं होतं की, पुढील काळ कसा येणार.
त्यावर उद्याच्या भागात आपण चिंतन करून, ते जाणून घेऊ. पण तरीही तोपर्यंत आपला नामाला घट्ट चिकटलेलं मन तिथेच ठेवण्याचा प्रयत्न करतच राहू.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment