Skip to main content

भोग आणि ईश्वर ५५३

भोग आणि ईश्वर  ५५३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
भगवंत हे फक्त रथी महारथी यांच्यावरच कृपा करून, त्यांचं क्षेम पाहतात, असा मात्र, कालच्या उदाहरणातून अर्थ कोणीही काढू नये. भगवंत अगदी अमिबा सारख्या सूक्ष्म जीवा पासून ते महाकाय प्राण्यांचाच नव्हे तर अगदी निर्जीव वस्तूंचा सुद्धा तितकाच विचार करतात. पण आपणच आपल्या कर्मांनी त्यांना कृपावंत या ब्रीदाला जागण्याची संधी देतो किंवा आपणच आपल्या पासून त्यांना दूर लोटतो. 

कृपा करणं हे सर्वस्वी आपल्याच कर्मावर अवलंबून आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे भगवंत कधीही कोणालाही, बदल्यात काही घेतल्या शिवाय देत नाहीत.भगवंताइतकं उत्तम व्यवहारी त्रिखंडात कोणी नाही. द्रौपदी कडून आधी आपल्या बोटाला वस्त्र बांधून घेतलं आणि मगच त्याबदल्यात, तिचा रक्षण केलं. भगवंताला सर्वात प्रिय काय असेल तर, भक्तांच्या ऋणात राहून, ते ऋण फेडण्यासाठी, सर्वकाही करणं. 

भक्तांकडून भक्तीच बीज घेऊन त्याबदल्यात, भक्ताला उदंड आणि अमाप देणं. कृपासिंधु हे नामाभिधान भगवंताला याचसाठी प्राप्त झालं आहे. कृपेचा, करुणेचा, दयेचा, मायेचा आणि स्नेहाचा सागर, भगवंताला उगाच म्हटलं जात नाही. परंतु या सर्वात अडकलेला भगवंत हा निस्सीम, निरपेक्ष प्रेमाचा भक्तीचा भुकेला आहे. अश्या भगवंताला बाध्य करून घ्यायला आपली अनेक जन्मातील पुण्याई असावी लागते. 

आपण पडलो सर्वसामान्य जन. आपल्याला त्या इच्छित पायरी पर्यंत न्यायला, सद्गुरू रूप दुवा पुरेसा आहे. आपल्याला कृपेची, प्राप्ती करवून घेण्यासाठी सद्गुरू भक्ती हा सर्वात सोप्पा मार्ग भगवंतांनी स्वतः आखून दिलेला आहे. आधी म्हटल्या प्रमाणे,  कृपा म्हणजे मुळात आपल्याच कर्मातील एखादी उत्तम गोष्ट निवडून, त्याचं फळ आपल्यासमोर अश्यावेळी, सद्गुरू कृपा मांडते, ज्यावेळी ती गोष्टीची किंवा मदतीची नितांत आवश्यकता असते. 

आपण बरेचवेळा याची संगती लावू शकतो. पण ते उमजण्याची बुद्धी ही कृतज्ञता या भावनेतून जन्माला येते. मुळात देवाला आपल्या पुत्रांना दुःखात पाहून आनंद होतो असं मुळीच नाही. पण आपल्या कर्माच्या गाठीनी जसे आपण बद्ध असतो, तसाच इश्र्वरासुद्धा त्या गाठींशीच बद्ध असतो. म्हणजे आपण आपल्या कर्मांनी, त्याला कृपेसाठी, मदतीसाठी काही करायला वावच ठेवला नाही, तर भगवंताचा सुद्धा नाईलाज असतो. अन्यथा, विश्वाची माऊली असलेला भगवंतांना, आपल्याच निर्मित जीवांना संकटात, दुःखात गांजताना, पीचतांना, असहाय्य अवस्थेत, फिरताना पाहून, किती यातना होत असतील, याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. 

म्हणून आपण आपल्या प्रत्येक कर्माला जागृतपणे पाहून, चूक अपराध गुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कारण आपणच भगवंता साठी आपल्या हृदयाची, देहाची दारं उघडू शकतो किंवा बंद करू शकतो. त्यामुळे आपणच याबाबत काही गोष्टी जाणीवपुर्वक केल्या आणि काही टाळल्या पाहिजेत. यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...