Skip to main content

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख २ (कडवं २)

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख २ (कडवं २) 

आईचा जोगवा जोगवा मागेन । 

आपल्या आत्म्याच्या उत्पत्तीला कारण असलेली, शक्तीचं प्रतीक आणि जगताच्या चैतन्याचं मूळ असलेली, आई अंबा, भवानी, योगेश्वरी हिच्या प्रकट होण्याचं, जगताच्या कार्यकारण भावाचं निरूपण, पहिल्या कडव्यात करून झाल्यावर, नाथ आईच्या चरणी, आपलं प्रार्थनारूप वंदन करून झाल्यावर, आईकडे भक्तीरुप, ज्ञानरुप, वैराग्यरूप नामरूप भिक्षा अर्थात जोगवा मागतात. 

वास्तविक अर्थाने, जोगवा मागणे म्हणजे जगताच्या कल्याणा साठी, जगन्मातेकडे, सर्वत्यागून, लीन होत, भक्तीची, वैराग्याची कामना प्रकट करणं. ही रूढार्थाने जोगवा या शब्दाची खरी वास्तविकता आहे. नन्तर त्यातून, जगत म्हणजेच देवीचं प्रत्यक्ष प्रकट रूप कल्पून, भिक्षा या शब्दाशी त्याची जोड, जोडून, त्याला अप्रत्यक्ष पणे चरितार्थासाठी वा उदरनिर्वाहासाठी केली जाणारी क्रिया, असा अर्थ, नन्तर अभिप्रेत होऊ लागला. जोगवा म्हणजे नित्य समाधिस्थ असलेल्या,जगतजननीला तिच्या समाधीतून कल्याणार्थ केलेली प्रार्थनारूप आवाहन आईला सांगणं जागं व्हा आई जागं व्हा, जगाला उपकृत करा, जगताचं कल्याण करा. 

पण मूळ अर्थ आणि नाथांना जो अर्थ अभिप्रेत आहे, तो अर्थ म्हणजे, आईपुढे, मस्तक टेकून, भक्तीरुप प्रार्थना करून, हात पसरून, तिची करुणा भाकणं. पण यामध्ये, भक्तांकडून,देवीपुढे साकडं घालून मागणं मागताना, जगतकल्याण प्रित्यर्थ काही वचनं, आपण देणं जरुरी असतं वा अपेक्षित असतं. तरच तो खऱ्या अर्थाने जोगवा ठरतो. नाथांनी याची साक्ष त्यांच्या भारुडांमधून देऊन ठेवली आहेच. नाथांच्या भारुडरूपी जोगव्यामधून काय करणं अपेक्षित आहे, हे पूर्ण उलगडून दाखवलं आहे. 

मुळात, नाथमहाराज हे अलौकिक आत्मा असल्यामुळे आणि त्यांनी सर्व सिद्धी प्राप्त करूनच, संतपद मिळवलं असल्यामुळे व त्यांना आता करायचं असं, काहीही शिल्लक नसल्याकारणाने ते जिथे जिथे मी असा उल्लेख प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे केला आहे, तिथे तिथे तो मी हा  प्रत्येक सामान्य भक्ताचा स्व आहे, हे ध्यानात ठेवून मग त्याचं चिंतन केलं पाहिजे. 

द्वैत सारुनी माळ मी घालीन । 

जगात जन्म झाला की आणि डोळे उघडून, समोर दिसणारं ते सत्य, हा मुलार्थ मनात, बुद्धीत रूढ होत गेल्यामुळे, सत्य मागे पडतं. मी मध्ये आतील आत्मा दाबला जातो. त्यातही, जन्मदाते म्हणजे देहातून देह निर्माण करणारे, लौकिकार्थाने मातापिता, ही संकल्पना, मनात दृढ होते. 

खरतर भेदाची सुरवात इथेच होते. हा भेद म्हणजे द्वैत. देहरुप मी, मला देहरुप जन्म देणारे आणि या जगताच्या पलीकडे असलेला जगतसाक्षी हे भिन्न रूप आहेत. हा भेद जन्मतः मनात दृढ होतो आणि त्या भेदाची भिंत इतकी भक्कम होते की, देहातील व देहाबाहेरील आत्म रुप अंशतत्व एकच असूनही, देहरुप अस्तित्व हेच सत्य, ही संकल्पना मनाचं पूर्ण विश्व व्यापून टाकतं. 

ते भेदाचं, द्वैताचं बीज आणि विश्व बाजूला सारून, तुझ्या विस्मरणाला मागे सारून, तुझ्या स्मरणाची, चिंतनाची माळ घालीन. म्हणजे आत्मरुप ईश्वराच्या स्मरणाला सुरवात करून बाकी सर्व भेद, द्वैत बाजूला ठेवून, तुला प्रार्थण्याचा प्रयत्न सुरू करेन. 

हाती बोधाचा झेंडा मी घेईन । 

मनातील द्वैतभाव बाजूला सारणं, हेच खूप मोठं ज्ञान आहे आणि या जाणीवा एकदा जागृत झाल्या की, हीच खूप मोठी जबाबदारी शिरावर येते. कारण, मन हे बरेच वेळा आपलंच वैरी होतं. हा भेद व द्वैत मिटलं तरी, माया पसारा खूपच भयंकर असतो. ती माया बुद्धीचा कधी घात करून, बुद्धीला पुन्हा कधी भेदावर व अद्वैतावर घेऊन जाईल, हे भगवंतसुद्धा जाणू शकत नाहीत. हा काळ मोठा कठीण असतो. 

म्हणून, हा द्वैत भावाचा त्याग, त्याची जाणीव, नित्य जागृत राहावी, यासाठी, या ज्ञानाचा, जाणिवांचा झेंडा मी हाती धरून, द्वैत या मनात, पुन्हा कधीही प्रवेश करू शकणार नाही, हे पूर्ण ध्यानात धरीन. तो झेंडा मी कधीही पुन्हा खाली ठेवणार नाही. म्हणजेच ती जाणीव रूप ज्योत नेहमी तेवत ठेवीन. 

भेदरहित वारीसी जाईन ॥२॥ 

वारी म्हणजे भक्त होऊन, भगवंताकडे नित्य प्रार्थना करणं. वारी म्हणजे भक्ताने भगवंताकडे, काहीही मागणी न करता, फक्त भक्तीचा दीप, भगवंताच्या चरणांशी लावून, तिथे, त्या चरणी, नित्य आसरा मिळावा, यासाठी केलेली प्रार्थना. वारी म्हणजे भक्ताचं हृदयमंदिरातील भगवंताला समीप बाहून, आत्मचिंतन करणं. अश्या वारीला, खरतर भक्त नित्य जाऊ शकतो, किंवा जावा हे अपेक्षित आहे. 

वारीला जाताना, सर्व सुख व सुखाची अपेक्षा, सर्व मोह माया, कुटुंबाची ओढ, सर्व प्रकारच्या कामना यांचा त्याग करून, वैराग्य वृत्ती धरून, फक्त भगवंत चरणांची धूळ मस्तकी लावायला मिळावी, इतक्या अल्प अपेक्षेने भगवंत द्वारी जाणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे वारी म्हणजे सर्व भेद दूर सारून प्रार्थना करणं. भेद मग ते देहाचे असतील, परिस्थितीवश आलेल्या उच्चनीचतेचे असतील, संगदोषाने जवळ केलेले मनातील भेद वा विकार असतील, ते सर्व बाजूला सारून, अर्थात पूर्ण भेदरहीत किंवा समस्त जगताला विसरून, भगवत भावाशी एकरूप होऊन, स्मरण, चिंतन आणि अर्चन करणं, नाथांना अपेक्षित आहे. 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१९/१०/२०२१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...