भोग आणि ईश्वर ३३०
साधना, सेवा आणि गुरुआज्ञा शिरसावंद्य, या तीन त्रयीवर, गुरुकृपेची प्राप्ती होते. गुरुकृपा प्राप्ती, हा एक अमृतयोग आहे.कारण याची प्राप्ती झाली की, माणसाला जीवनात फक्त साधनेच्या मार्गावर राहून, नित्य उपासना करून सर्व प्रकारच्या सहाय्याची प्राप्ती होते. सहज कर्मात अद्भुत प्राप्ती होते. कर्मात असलेले भोग, सुखेनैव भोगण्याचं सामर्थ्य, बल, शक्ती प्राप्त होते. भोग सवलतीने भोगण्याची सुविधा मिळते. भोग भोगताना, त्यांचा ताप होत नाही, झाला तर त्याची जाणीव रहात नाही.
गुरुकृपा ही कधी, कोणाला, आयुष्यात कोणत्या वळणा वर प्राप्त होईल, हे फक्त आणि फक्त सद्गुरू जाणू शकतात. कृपा याची थोडक्यात व्याख्या करणं तसं कठीण आहे. पण कृपा म्हणजे एखाद्याची मर्जी संपादन केल्यानंतर, त्या व्यक्तीकडून, मिळणारी सहानुभूती वा स्नेह, प्रेम, आदर इत्यादी. हा स्नेह वा हे प्रेम ज्या व्यक्ती कडून लाभतं, ती व्यक्ती, तुम्हाला संकटसमयी पाठीशी उभं राहून, हतोत्साहित होण्यापासून वाचवते आणि अश्या काळात आपल्यावर येणाऱ्या संकटांवर मात करण्याची, ऊर्जा, बल आणि सहाय्य करते.
सहाय्य हे कोणत्याही प्रकारचे असू शकेल. जर संकट घनघोर वा तीव्र असेल तर, त्याचा प्रभाव कमी करणं, जर ते शक्य नसेल तर त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक शक्ती व ऊर्जा देणं वा अन्यप्रकारे प्रोत्साहित करणं, जेणेकरून त्या प्रिय व्यक्तीला निराशा येणार नाही. जर हे दोन्ही शक्य नसेल तर एखादा हितचिंतक, हितकारी व्यक्ती निवडून,त्याच्या मार्फत योग्य तो संदेश वा सहाय्य पोचवणं किंवा असं काही जे शक्य असेल ते करणं, ज्यायोगे, त्या प्रिय व्यक्तीच्या त्या काळात, त्याच्या मनातील चिंता कमी व्हायला मदत होईल आणि संकटावर मात करण्यासाठी धैर्य प्राप्त होऊन, संकट काळात मार्गक्रमणा सुलभ होईल.
कारण एक स्पष्ट आहे, कर्म व कर्माची लढाई ही आपल्यालाच लढायची आहे. अगदी श्रीकृष्ण प्रत्यक्षात धरणीवर उपस्थित असूनही, अर्जुनाला त्याने, युद्धकर्म करण्यासाठी, प्रवृत्त केलं, पण कर्म अर्जुनानेच करणं अपेक्षित होतं. जे श्रीकृष्णानेसुद्धा अर्जुनाला स्पष्ट केलं. पण त्यासाठी लागणारे, डावपेच आखून ते घडवून घेणं, धोके ओळखून वेळीच सावध करणं, प्रसंगी समोरच्या योद्ध्याप्रमाणे कुटनीतीचा वापर करून, त्या योध्याला संपवणं हे सर्व मधुसूदनाने सहाय्यभूत होऊन, सल्लागार, हितचिंतक, सखा, भगवंत, प्राणरक्षक या सर्व भूमिकां मध्ये राहून, अर्जुनाकडून करवून घेऊन, विजयश्री आणून दिली. तरीही युद्ध प्रत्यक्षात अर्जुनासह पांडवांनीच लढलं, हेदेखील सत्य आहे.
पण ही कृपा, स्नेह, करुणा, माया, दया प्राप्त होण्यासाठी शिष्य वा सखा अर्जुनासम असला पाहिजे. म्हणजेच आपल्या आराध्यावर आपण पूर्ण व ठाम विश्वास, त्याच्या चरणी दृढ श्रद्धा, त्याच्याबद्दल अपार प्रेमभाव, त्याच्या शब्दांवर व वचनावर पूर्ण भरवसा असला पाहिजे. म्हणजे आपला हितचिंतक वा आपले सद्गुरू हे आपले सखा, पिता, ज्येष्ठ बंधू, आप्तेष्ट आहे आणि आपल्या हितापेक्षा अधिक त्यांना दुसरं काहीही मिळवायचं नाही, हे अखंड ध्यानात असलं पाहिजे. आपल्या परम सुखाची सर्व चिंता त्यांनाच आहे, हे ध्यानात व मनात सतत जपलं पाहिजे.
इथे एक वाचनात आलेला प्रसंग सांगतो, ज्यात विश्वास व श्रद्धा किती ठाम असाव्यात, हे लक्षात येईल. एकदा हवेत उंचावर असलेलं एक विमान, अचानक हेलकावे खायला लागलं. त्याबरोबर विमानातील सर्व प्रवासी हवालदिल झाले.कुणी घाबरलं, कुणी देवाचा धावा सुरू केला, कुणी आपल्या बाजूच्या लोकांना सहाय्य करण्यासाठी विनवू लागलं. पण यासर्व गोंधळात, एक छोटी मुलगी आपल्या हातातील बाहुलीशी छान पैकी गप्पा मारत खेळत होती. एकाने तिला विचारलं की, तुला भीती वाटत नाही, त्यावर त्या मुलीने शांतपणे उत्तर दिलं,नाही वाटत. कारण या विमानाचे मुख्य पायलट माझे बाबा आहेत आणि मला खात्री आहे की, ते आपल्या लाडक्या लेकीला काहीही होऊ देणार नाहीत.
याला विश्वास, श्रद्धा म्हणतात. प्रसंग छोटासा आहे, पण बरच काही शिकवून जाणारा आहे. गुरुकृपेचा महिमा अद्वितीय व अवर्णनीय आहे. त्याच्याबद्दल अजून चिंतन उद्या करूया. त्या कृपेचा मला आलेला अनुभव,पुढील भागात मी सांगेन. पण तोपर्यंत आपल्या गुरुसेवेचा भाग असलेलं आपलं नाम घेत राहून, तीच कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहू.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment