Skip to main content

भोग आणि ईश्वर ३१८

भोग आणि ईश्वर  ३१८ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

अवर्तनावर आपण चिंतन करत असताना, एक गोष्ट मुद्दाम चर्चेला घ्यावी हे मनात आल्यामुळे, आज नवरात्रीच्या पर्वातील नवमी आहे म्हणून, आज त्यावर चिंतन करूया. मुळात देवी ही शक्तीस्वरूप आणि ही शक्ती विश्वनियंत्याने अनेक कारणांसाठी विश्वात संचारीत केली. देहरूपात त्या शक्तीला स्त्रीदेह प्रदान करून, एकप्रकारे या ब्रह्मांडावर अनंतकोटी उपकार केलेत. 

याचं कारण असं की, ही शक्ती योग्य कारणाने, योग्य प्रकारे, योग्य हातांनी, योग्य बुद्धीने, योग्य प्रेरणेतून आणि योग्यरीत्या हाताळली जाणं, अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण उदाहरणांसह पाहू. आज विश्वात काही देशांकडे परमाणू शक्ती अर्थात अण्वस्त्र ही विनाशकारी शक्ती स्वरूपात अस्तित्वात आहेत. ही जर कोणाकडूनही, विशेषतः उत्तर कोरिया व पाकिस्तान सारख्या बेजबाबदार देशाकडून चुकीने हाताळली गेली, तर विश्वाचा विनाश निश्चित आहे. 

म्हणजेच शक्ती असूनही ती हाताळण्यासाठी नक्कीच योग्य हात, संतुलित बुद्धी आणि संयत मन असणं गरजेचं आहे, हे विधाता जाणून होता. म्हणजे शक्ती, ऊर्जा, प्रेरणा हे सर्व जगाच्या सुत्रसंचालनासाठी आवश्यक आहेच, पण त्याचा वापर योग्य पद्धतीने होणं हेदेखील तितकंच महत्वाचं आहे. त्याचसाठी तितकं सक्षम माध्यम आवश्यक आहे, तरच विश्वाचा डोलारा सुयोग्यपणे सांभाळला जाईल. 

याच हेतूने, कारणाने आणि अवश्यकतेने, ईश्वराने, शक्ती स्वरूपाची अर्थात देवीच्या रूपाची व अस्तित्वाची अर्थात स्रीस्वरूपाची निर्मिती करून त्या हातात शक्तीचा सर्व भार सोपवला. अगदी ईश्वराच्या संकल्पनेतील जगाच्या कार्यकारण भावाची अधिष्ठात्री माया, योगमाया आणि भगवंतलीला या देखील शक्तीस्वरूप असून स्रीरूपात आहेत. विश्वनियंत्याने इतक्या विचारपूर्वक केलेल्या या शक्तीनिर्मितीला सादर वंदन करून, या जगातील व अखिल ब्रह्मांडांमधील शक्तीरूपाला प्रणाम, वंदन, पूजन, अर्चन करून त्या शक्तीला संपूर्ण शरण जाऊनच आपलं हित वा कार्यसिद्धी साधता येईल. 

पण ही प्रतिकात्मक असलेली समर्पणता किंवा शरणागती मनापासून किंवा आत्म्यापासून असावी किंवा असली पाहिजे. तरच या शक्तीला प्रसन्न करून, तिला प्राप्त करून, तिच्या सहाय्याने, स्वहित, धर्महीत आणि विश्वहित साधता येईल. मुळातच आत्मा हासुद्धा शक्तीचाच अंश वा प्रतिकात्मक रूप आहे. म्हणजे मग शक्तीपूजनाची सुरवात, देहापलीकडील स्व पासून अर्थात आत्मानंद हित साधण्यापासून करावं, हाच विधीचा संकेत आहे. 

याच आत्मनंदाची अनुभूती, प्रचिती घेण्याचा पर्वकाळ म्हणजे हा नवरात्री उत्सव. शक्तीस्वरूपातील स्वात्मा आनंदी, प्रसन्न ठेवण्या साठी प्रत्येकाने आपल्या आत्म्याच्या आवाजाला अर्थात स्वत्वाला जाणण्यासाठी या नऊ दिवसांचा सदुपयोग केला पाहिजे. आत्मशक्ती आनंदी असेल तर, विश्वातील शक्तींशी संयोग, योग, भक्तियोग असे सर्व योग साधता येतील. जर हे योग साधले तर सकल जन्माचं हित आपोआप साध्य होईल. 

यासाठीच हे नऊ दिवस सर्व चिंता, काळज्या, प्रश्न हे सर्व विसरून, आत्मशक्तीला संतुष्ट करावं. या पर्वकाळात, मुख्यतः विश्वाची ही अगम्य, अद्भुत आणि अमोघ शक्ती, विश्वात संचार करण्यासाठी व या निजानंदात असलेल्या, साधक, भक्त, समरूप, यांना शक्तीप्रभावाने प्रेरित करून, त्यांना त्यांच्या जीवनात, जीवनातील प्रत्येक कर्मात प्रेरित करून, ऊर्जा व बल प्रदान करण्यासाठी, संचार करायला विशेषत्वाने बाहेर पडते. याचकारणाने या काळात शक्तीचा, ऊर्जेचा प्रभाव जास्त जाणवतो. याच प्रभावाने अनेक कार्य सुरू होऊन, गती घेतात व अंती यशप्राप्तीला पोचतात. 

म्हणून या काळात या शक्तीच्या संचारातून आपल्या आत्म्याला बल व उर्जावृद्धी होईल यासाठीची इच्छा, मनीषा, आकांक्षा मनात धरून, त्या शक्तीला आवाहन करून, तिला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे प्रत्येक कार्यात, ही प्रेरक तारक शक्ती समर्थपणे, अनेक रुपात व स्वरूपात, सहाय्यकारी होईल. याचसाठी नऊ दिवस शक्तीजागर, उत्सव व आनंद साजरा केला जातो. 

उद्या आपला अवर्तनाचा विषय पुढे नेऊया. पण तोपर्यंत नामाची आवर्तनं सुरूच राहूदे. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...