Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०८

भोग आणि ईश्वर  ३०८ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

मुख्य विषयाकडे वळण्याआधी आपल्या चेंडू फेकण्याच्या मुद्द्या कडे वळूया. अशी कल्पना करा की, तो चेंडू फेकताना समोर भिंत नाही, पण झेलायला कोणीतरी आहे. म्हणजे समोर कोणी आहे, ही जाणीव किंवा हे ज्ञान एकदा झालं की, आपण प्रत्येक चेंडू निर्धास्तपणे फेकू. या जाणिवेने वा ज्ञानाने आपली कृती वा प्रत्येक कर्म हे पूर्ण एकाग्रतेने आणि आपलं सर्वस्व ओतून होईल. 

ह्याची प्रचिती आपण क्रिकेट या खेळात गोलंदाज जेंव्हा चेंडू फेकतो, त्यावेळी येते. कारण गोलंदाजाला माहीत असतं की, चेंडू फलंदाजांच्या बॅटमधून सुटला तरी, मागे अडवायला, यष्टीरक्षक आहे. हीच जाणीव जीवनात झाली, की माणूस प्रत्येक कर्म त्याच प्रकारे व पूर्णत्वाने करेल. पूर्णत्वाने म्हणजे पूर्ण झोकून देऊन किंवा एकाग्र चित्ताने करेल. मुळात मनाला ही जाणीव का लागते की माझ्यामागे कोणाचंतरी पाठबळ आहे. 

याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे मन सतत भविष्याची चिंता आणि भूतकाळातील चुकांचा विचार करतं. दुसरं म्हणजे परिणाम या शब्दालासुद्धा ते खूप भीतं.  आपण असा विचार केल्याचं आठवतंय का की भूतकाळातील चांगल्या गोष्टी आठवून मन समाधानी झालं. सहसा असं होतं नाही. आपण आधी नकारात्मक, अनिष्ट आणि चुकीच्या केलेल्या गोष्टी वा कर्म लक्षात ठेवतो आणि योग्य, इष्ट व समाधानकारक कर्म सहसा लक्षात राहात नाहीत.  त्या लक्षात न ठेवण्याचं वेगळं कारण काही नसतं. 

पण मनाचा तो गुणधर्म आहे की, आधी मन शंकेचा, अनिष्ट परिणामांचा विचार करतं. कारण मन आत्म्याच्या आणि देह व बुद्धीच्या मध्ये सांधा असल्यामुळे, प्रत्येक गोष्टीत विकल्प कल्पून, त्यातून वाईट किंवा चुकीच्या गोष्टी किंवा त्यांचे परिणाम आधी विचारात आणेल. आपण स्वतः सुद्धा आठवून बघा आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा, आपण घडणाऱ्या किंवा आपल्या हातून नित्य होणाऱ्या कर्मातसुद्धा, जे घडणं अपेक्षित नाही, ते घडण्याची कल्पना करून, त्या काल्पनिक भीतीने भयभीत होऊन, त्यातून सुटण्यासाठी मार्ग शोधतं. 

आपलीच गोष्ट आहे, पण आपल्याला आता विचित्र वाटते. पण ही वस्तुस्थिती आहे. सामान्यतः हे चित्र असंच दिसतं. याला कारण आपण मनाची मशागत तशीच केलेली असते, ज्यायोगे आपण अनिष्ट परिणाम, दुःख, भय, भोग यांना काहीतरी भयंकर मानण्याची सवय लावून घेतो. कारण आपल्याच कर्माचे भोग आपण भोगतो, ही कल्पना आपण लहानपणापासून रुजवत नाही. त्यामुळे मनाला, परिणाम या संकल्पनेचीच भीती वाटते. 

परिणाम हे आपण आधी केलेल्या कर्मातूनच आपल्या कडे वा आपल्यासमोर येतात, ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. दुसरं असं की, या जन्मात न केलेल्या, पण मागील जन्मात आपल्याच हातून, कळत वा नकळत पणे, घडलेल्या कर्माची बीजं, आपणच पेरलेली आहेत, जी आज आपल्यासमोर कधीही येऊ शकतात. त्यामुळे त्याने धास्तावून न जाता, उलट मनाला खंबीर करून, जे समोर येईल ते ते आपल्या संचितातील फल आहे हे जाणून, त्यातून बाहेर येण्याचा उपाय म्हणजे नित्य ईश्वर स्मरण हे जाणून, मार्गक्रमण केलं पाहिजे. 

मन मुळात अनिष्ट परिणामांना तोंड द्यायलाच घाबरतं. कारण भय किंवा भीती ही इतर प्राणीमात्रांप्रमाणे मानवाला, देह धरणात मिळालेली गोष्ट वा गुण आहे. पण विचार, बुद्धी आणि विवेक ह्या त्रिगुणांच्या आधारे, भीतीला भयाला चिंतन व शुद्ध सात्विक विचार यांनी नियंत्रित करता येतं. एखादी गोष्ट घडूच नये हे वाटणं हा मूळ स्वभाव झाला. पण जर एखादी अनिष्ट गोष्ट वा घटना घडली, तर त्याला यशस्वी तोंड देऊन, त्यातून स्वतःला सिद्ध करून दाखवणं हा खरा मानवी गुणधर्म आहे. 

याचे अजूनही पैलू आहेत, ते उद्याच्या भागात पाहूया. परंतु, नाम हे मनासाठी उत्तम औषध आहे, त्यामुळे त्याचं नित्य सेवन करत रहा. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...