नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख १
नाथमहाराज अर्थात परमपूज्य संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज यांनी, भक्तीच्या माध्यमातून, समाजातील, भक्तीच्या मार्गातील, भक्तांच्या कर्मकांडातील विरोधभासावर वा चुकीच्या परंपरांवर आणि कर्मठ पणावर आसूड ओढून, समाजाला जागं करण्याचा कायम प्रयत्न केला. असेच त्यांचे अनेक अभंग, आरत्या, भारुडे यांची रचना, याच गोष्टीसाठी नाथांनी केली. नाथांना आद्य समाजसुधारक म्हटलं तरी ते योग्यच ठरेल. देवीच्या प्रस्तुत आरतीमध्ये नाथ भक्ती मधून, दांभिकता व कर्मठता यावर येथेच्छ आसूड ओढून, त्यातील त्रुटी व त्यावरील उपाय दोन्हींवर प्रकाश टाकून, एकप्रकारे समाजाच्या व भक्त भाविक यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घालतात. हाच गूढ, गुह्यर्थ व मतितार्थ जाणूया, प्रत्येक कडव्यातून.
अनादि निर्गुण प्रगटली भवानी ।
जी कधी अस्तित्वात आली आणि जीचा अंत माहीत नाही अशी महाशक्ती निर्गुणातून सगुणात प्रकट झाली. नाथांच्या या वाक्यातून, विश्वाच्या उत्पत्तीच्या, ज्या स्फोटाच्या रहस्यासाठी विश्वातील शास्त्रज्ञानी एक महाविस्फोट घडवून आणला आणि त्या स्फोटाच्या निष्कर्षात देवकणाचं आतित्व विज्ञानाला सापडलं, तो महाविस्फोट म्हणजेच ही भवानीरूप आदिमाया, आदि शक्ती आत्मज्योति,प्रकट झाली. ती शून्यातून अर्थात निर्गुणातून सगुणात प्रकट झाली, म्हणजेच तो महा विस्फोट होण्याआधी काहीच नव्हतं, पण तो महाविस्फोट होऊन, त्या शक्तीतून विश्वरूप ब्रह्मांडातील चैतन्य प्रकटलं.
मोह महिषासूर मर्दना लागुनी ।
विश्वाच्या अस्तित्वाबरोबरच, माया जन्माला आली आणि जगत व्यापून ती उरली. ही विश्वरूप माया प्रत्येक सजीवात व निर्जीवात प्राधान्याने वास करून, आपल्या सहाही शस्त्रांनी, जीवाला वासनारूप, मायारुप, कामरूप क्रोधरूप, मोहरुप कर्म करायला भाग पाडून, जीवाला यातना व त्रास देऊन, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवून ठेवते. अश्या या जीवाजीवात वास करणाऱ्या मोहरुप महिषासुराला नष्ट करायला, त्याचं मर्दन करायला, याच शक्तीरुप देवीला,मातेला, याच देवकणाला शरण जाणं हा एकच उपाय आहे. कारण तिनेच निर्माण केलेल्या मायेला तीच नियंत्रित व नष्ट करू जाणते.
त्रिविध तापाची कराया झाडणी ।
माया जीवाला तिनरुपात विभागून पिडते, सत्व, रज आणि तम. अर्थात या तीनही तापाना देह, वश होऊन, जीवाला अनंत जन्म फिरवत ठेवतो. या तापातून मुक्त व्हायला,या तापांची निर्माती, आदिमाया, आदीरुप शक्तीला, शरण जाणं, हा एकच उपाय भक्तांकडे, साधका कडे उरतो.कारण या त्रिविध तापातून, भक्तांना, फक्त आईच सोडवू शकते. कारण तिच्याकडेच ती शक्ती, ओज आहे.
भक्तालागोनी पावसी निर्वाणी ॥१॥
अशी ही परमदयाळू, परमात्मा शक्ती भक्तांच्या भक्तीला सरतेशेवटी अर्थात निर्वाणी पावते. निर्वाणी याचा अजून एक मतितार्थ असाही आहे, की आई भक्तांची सेवा, भाव, भक्ती यांची सत्त्वपरीक्षा घेते, भक्तांचा निश्चय किती दृढ आहे. असा हा भक्त साधनेवर, मायेच्या पाशातून बाहेर पडण्यावर आणि स्वतःच्या आत्मोन्नतीवर किती ठाम आहे आणि शक्तीवर की श्रद्धा व विश्वास ठेवून आहे, याची आई परीक्षा घेते. तरीही अश्या भक्तांना त्यांच्या साधनेत, साधनेतील प्रगतीत, मार्गातील बांधांवर तीच शक्ती सहाय्यभूत होत असे. भक्तांच्या अश्या आत्म संयमाची प्रचिती आल्यानंतर, आदिशक्ती, भक्तांना निर्वाणापर्यंत किंवा मोक्षाप्रत जाण्यास सहाय्य करते. अशी ही आदिशक्ती भक्तवत्सल आहे.
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१५/१०/२०२१
Comments
Post a Comment