Skip to main content

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख ३ (कडवं ३)

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख ३ (कडवं ३) 

नाथमहाराज जरी भारुड, जोगवा यामधून आसूड ओढत असले तरी, त्यांची मूळ प्रवृत्ती, समाजावर प्रेम करून, समाजाला, सर्व प्रकारच्या वाममार्गातून, सहजपणे, भक्ति मार्गी बनवण्याची आहे. म्हणूनच त्यांचं संपूर्ण वाङ्मय हे ज्ञान देऊन, जाणिवांवर घण घालून, त्या जागृत करून, समाजाला भक्तीरसाची अद्भुतता पटवून देण्यात, धन्यता मानतं. त्यामुळेच, नाथमहाराज हे, चूक काय हे सांगून थांबणारे नुसते निरर्थक टीकाकार नाहीत, तर काय करणं गरजेचं आहे, जे केल्याने, झालेल्या चूका सुधारून, आत्मा सन्मार्गावर जाईल, हे सांगणारे ऋषितुल्य व्यक्ती आहेत. 

नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा । 

ईश्वरप्राप्तीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. कर्म, ज्ञान इत्यादी अनेक. पण त्यासर्वांमध्ये, स्वतः भगवंतांनीसुद्धा, ज्या मार्गाचा विशेषत्वाने गौरव करून,ज्या मार्गाला श्रेयस्कर म्हणून उपाधी देऊन, प्रत्यक्ष श्रीमद्भागवद्गीतेत पुरस्कारित केलं आहे, तो मार्ग म्हणजे भक्तीमार्ग. 

हे भगवंताचं विशेष प्रेम लाभलेलं अपत्य आहे. वेद शास्त्र पुराणं यांनी ईश्वरप्राप्तीसाठी, भक्तीच्या अनेक मार्गांना संकलित करून नऊ विविध मार्ग सांगितले आहेत. हे मार्ग शास्त्रसंमतच नसून, प्रत्यक्ष भगवंताच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग, या नवविधा भक्तीतूनच जातो. 

या नऊ विविध मार्गांना भगवंताच्या हृदयात जाण्याची, नऊ द्वारं म्हटल्यास, ते संयुक्तिक ठरेल. नवरात्र हा देखील देवीला अर्थात शक्तीला पूजण्याचा, भजण्याचा आणि स्मरण्याचा प्रकार आणि पर्वकाळ आहे.वास्तविक आपण नवरात्री व त्यांचं महत्व जाणतोच. पण या नऊ आकड्या वर अध्यात्मिक मार्गी, सांख्ययोगी, कर्मयोगी, ज्ञानी इत्यादी सर्वांचंच विशेष प्रेम आहे. गणितीय दृष्टीने पाहिल्यास, नऊ हा पूर्णांक समजला जातो. त्याचं कारणसुद्धा आहे की, नऊ या अंकाच्या गुणाकारात येणाऱ्या, प्रत्येक संख्येची अंतिम बेरीज ही नऊच येते. जसं  ९x२=१८ यात १+८=९ याप्रमाणे पुढे 

म्हणजे नऊ प्रकारातील भक्तीने, नऊ प्रकारची नवरात्री मी भक्तिमय करीन. नवरात्री या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे नवं प्रकारच्या रात्री. अर्थात प्रत्येक भक्तिमार्गाने एकप्रकारे अश्या प्रकारे, नऊ प्रकारांनी नऊ विविध तर्हेच्या शक्तीच्या पूजनाच्या रात्री मी जागवीन. कारण शक्तीचा जागर म्हणजे शारीरिक दृष्टीनेच नाही, पण मन, बुद्धी आणि आत्मरसाने सर्व समर्पण भावाने, शक्तीला, देवीला, लीन होऊन, तिच्या चरणी चित्त स्थिर करणं, हा खरा जागर.  यासाठी नवनवीन प्रकारे, आई,  प्रत्येक नवीन दिवशी मी तुझा, नवीन जागर मांडीन. 

करुनी पोटी मागेन ज्ञानपात्रा। 

हे सर्व मी करीन आणि त्याद्वारे, माझ्या ज्या जाणिवांची जागृती होईल आणि मला जे ज्ञान प्राप्त होईल. त्यातून मी हे नक्की पाहिलं असेल की, सरतेशेवटी जाणिवांची जागृती होऊन केलेला जागर वा प्रार्थना, हीच खरी प्रार्थना आहे. त्यातून आलेली भक्ती व भगवंताचं प्राप्त झालेलं ज्ञान आणि त्यातून लक्षात आलेला, त्याच्या जगतपसाऱ्याचा व्याप व त्याचं कळलेलं विश्वरूप, हेच खरं ज्ञान आहे.या ज्ञानाच्या रुंदावलेल्या कक्षा आत्म्याच्या अणू ते ब्रह्मांड या रुपात एकरूप होऊन, सिद्ध झालेल्या असतात, त्यावेळी ते खरं ब्रह्मज्ञान असतं. 

फक्त आपल्याला त्याची जाणीव होणं हे महत्वाचं आहे. अन्यथा सर्व अगम्य, गूढ व गुह्य आहे. या ज्ञानाच्या प्राप्ती साठी संत महंत, ऋषीमुनींनी अनेक जन्म ईश्वरा कडे मागून घेतले. संतश्रेष्ठ जगतगुरु श्रीतुकोबाराय यांनी तर " तुका म्हणे गर्भावासी, सुखे घालावे आम्हासी" अशी रोखठोक मागणी, प्रत्यक्ष वैकुंठनायक श्रीपांडुरंग, यांच्या कडे आगाऊ नोंदवून ठेवली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. हे ज्ञान,ही भक्ती करण्याची ओढ,तळमळ कळकळ पांडुरंग विरहाची ती आंच इतकी सुखावह व सुखमय आहे की, यासाठी कित्येक जन्म घेण्याची तयारी तुकोबा रायांनी दाखवली आणि प्रत्येक जन्मात हा त्रास, हा छळ, ही भेटीची आस आम्ही आवडीने आत्मसात करू, पण भक्तीच करून तुला प्राप्त करू. 

याचाच पहिला अध्याय, शंभर वर्षे आधी, नाथमहाराज लिहितात आणि आईला विनवणी करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यायोगे आईकडे या ज्ञानाचा, जाणिवेचा, दीप अर्थात दिवा प्राप्त करून घ्या, यासाठी समस्त भक्तांना प्रोत्साहित करत आहेत. इथे पुत्र म्हणजे वंशाचा दिवा हा लौकिकार्थाने रूढ शब्द वा मागणी, नाथमहाराज करू देतील वा करण्यासाठी प्रवृत्त करतील, हे असंभव आहे.  म्हणूनच इथे जाणिवांचा, ज्ञानाचा, ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि त्या अस्तित्वाला समजून घेण्यासाठीचा बुद्धिरुप, ओजरूप, आत्मसाक्षात्काररूप दीप अर्थात मोक्षाच्या प्राप्तीचा सन्मार्ग प्राप्त करून घेण्याचा सल्ला वजा बोध देत आहेत. हा दीप म्हणजे तो पुत्र, जो प्रत्येक साधकाने, ईश्वरमार्गी भक्ताने परमदयाळू आई भगवतीकडे मागावा. 

धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । 

अध्यात्मिक व ऐहिक उन्नतीचा महामार्ग हा आतून बदल होण्यापासून सुरू होतो,हे सर्वात मोठं प्रमेय आहे. ज्याला ज्याला खऱ्या अर्थाने उन्नती साधायची आहे आणि आत्मचिंतनाचा मार्ग अवलंबायचा आहे, त्यांना सर्वात प्रथम अंतरीचा भाव हा सत्वयुक्त शुद्ध व सात्विक करणं गरजेचं आहे. मनात एक आणि ओठांवर एक, हे आत्म घातकी आहे. भाव अर्थात मनाचा संपूर्ण प्रवाह हा स्फटिकयुक्त स्वच्छ आणि पारदर्शी व्हायला हवा. यात सर्वकाळी सर्ववेळी, कोणताही गैर भाव क्षणमात्रसुद्धा मनात प्रवेश करता कामा नये, हे कटाक्षाने बघितलेच पाहिजे. 

आता हा सन्मार्गी भाव अर्थात सद्भाव हा दृढ धरायचा, हे तर नक्कीच. कारण साधनेतूनच प्रगती अन्यथा अधोगती अशी कलियुगी स्थिती असताना, आपणच आपला घात, कितीजन्म करत राहणार आहोत. आता यातून सुटण्या साठी, सर्व भाव वर्ज्य करून, एकात्म भावाने, अर्थात सदभावाने वर्तणूक केल्यास, त्या भावाचा अंगीकार केल्यास, मार्गभ्रष्ट होण्याचा संभवच नाही. हे सर्व साधायचं एकच साधन म्हणजे हा नरदेह. या देहातूनच मुक्तीचा मोक्षाचा मार्ग मिळू शकतो. 

त्यासाठी या देहाला, बुद्धीला, मनाला एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण हे तिन्ही घटक, महामाया लोभ यापैकी एकाचे वा अनेकांचे सहजी बळी होतात. मग यांना कोणत्या उपायाने दृढपणे एकत्रित बांधता येईल. तर त्यासाठी, एक सन्मित्र, खरा मार्गदर्शक, पथ उद्धारक मीत, सखा, हितोपदेशक, हितेशी आहे. तो म्हणजे अंतरात वसलेला आत्मा. या मित्राच्या सहाय्याने, सल्ल्याने प्राप्त होणारा विवेकरूप दीप, या समर्पणाच्या, त्यागाच्या व आत्मतेजाच्या मार्गावर, देह,बुद्धी, मन या त्रयीला सहज एकत्र ठेवू शकेल. 

म्हणून या अंतरीच्या मित्राला, आश्वासन द्या, आश्वस्त करा की, हा देह, बुद्धी व त्याद्वारे प्राप्त झालेले हे निर्मळ मन, हे तीनही, सद्भावाचा, सन्मार्ग स्वीकारून, त्यावरून कधीही न ढळणार नाही व मार्गस्थ राहीन. 

दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥ 

आता हे सर्व ज्ञान, जाणिवांचा उमाळा आल्यानंतर, देह, देहाकरता इष्ट गोष्टी, या अविवेकी व अवाजवी ठरतात आणि वाटायला लागतात. मुळात आता सद्भाव अंगि कारून, सन्मार्गी होऊन, दृढनिश्चयाने, आईच्या, शक्तीच्या चरणांवर मस्तक ठेवून, भक्तीची कास धरल्यावर, संसारा तील अनेक गोष्टी या दांभिक, फोल व निरर्थक ठरतात. अश्या या निरर्थक व दांभिकपणा घडवून मार्गभ्रष्ट करणाऱ्या सांसारिक गोष्टींचा त्याग करणं हे क्रमप्राप्त होतं. त्यामुळे अश्या कुपात्री म्हणजेच नरकात कुंभ पाकात ढकलणाऱ्या वृत्ती, प्रवृत्ती म्हणजेच अनिष्ट गोष्टींचा, माझ्याकडून नक्कीच त्याग होईल, कारण माझ्या आत्मिक  जाणीवा व ज्ञानयुक्त चक्षु प्राप्त झाल्या मुळे, अश्या अशुद्ध व विनाशक वृत्त मी नक्कीच त्यागीन आणि सत्पात्री होऊन आई तुझा जागर, तुझी भक्ती मी योग्य अंतःकरणाने करीन, हे वचन मी माझ्या अंतरीच्या मित्राच्या साक्षीने देत आहे. हा माझा दृढ संकल्प व दृढनिश्चय आहे. त्यापासून मी कधीही ढळणार नाही. 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२०/१०/२०२१
श्रीकृष्ण प्रेरणेने !! श्रीकृष्णार्पणामस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...