Skip to main content

भोग आणि ईश्वर १९८

भोग आणि ईश्वर  १९८

आता चित्ताची शुद्धता आणि वृत्तीची स्थिरता हे कसं साध्य होतं यावर आज चर्चा करूया. मुळात वृत्ती म्हणजे अंतर्मनाचं  स्वरूप, अर्थात अंतर्मनातील तरंगांचं देहाच्या माध्यमातून प्रकटीकरण,  म्हणजे वृत्ती. अर्थात नेहमी हे प्रकट स्वरूपात दिसेल असं सरसकट म्हणता येणार नाही. कधी कधी एखादी व्यक्ती शांत असते पण हा झाला स्वभाव. आता वृत्ती म्हणजे त्या शांत असलेल्या माणसाचं वर्तन कसं असेल तर, तो जास्त कोणाशी बोलणार नाही, आपल्या कामात मग्न राहील, फार कोणात मिसळणार नाही, मिसळला तरी फार बोलणार नाही, मोजकं पण कामा पूरतं बोलेल. 

या सर्वातून त्याचा स्वभाव, वर्तन व वागणूक दिसेल. पण वृत्ती म्हणजे या सर्वांतुन एकत्रितपणे प्रकट वा अप्रकट होणारं व्यक्तिमत्व वा व्यक्तित्व. ज्याला इंग्रजीत attitude म्हणतात ती म्हणजे वृत्ती. म्हणजे असं की, तो शांत आहे म्हणजे सोशिक असेलच असं नाही, चिडचिडा नसेलच असं नाही, शांत आहे म्हणजे माणुसघाणा असेलच असं नाही. सर्वार्थाने शांत आहे म्हणजे संयमी असेलच असं नाही.

थोडक्यात बाह्य रुपात देहबोलीतून प्रकट होणाऱ्या रूपाच्या पलीकडे जाऊन, त्या व्यक्तित्वाची खरी ओळख म्हणजे वृत्ती. वृत्ती म्हणजे मनाचं मूळ स्वरूप. या मूळ स्वरूपाला आधी जाणून घेणं महत्वाचं आहे. स्थिर अस्थिर, चंचल, मृदू, मीत, संयमी, धीरोदात्त, निस्पृह, निराकार, निगर्वी, निश्चयी, करारी, पाशवी, असुरी, अधमी ही काही वृत्तीची वर्णनं आहेत. स्वभावातील खरा भाग हा वृत्ती दर्शवतो. म्हणजे नाटकीय वागणं आणि त्यामागील खरा चेहरा, यातील खरा चेहरा म्हणजे वृत्ती.

आपली मूळ वृत्ती ओळखणं हा एक खूप मोठा गुण नामाने आणि सद्गुरुकृपेने साधता येतो. मानसशास्त्राचा पाया हा माणसाची वृत्ती ओळखून त्यानुसार उपचार पद्धती व उपाय ठरवणं हा आहे. आपण स्वतः आपली वृत्ती ओळखायला स्वतःशी प्रामाणिक असायला हवं. म्हणजेच वृत्तीत दोष असतील तर, ते ओळखून मान्य करता आले पाहिजेत आणि मान्य करून स्वीकृत करता येणं गरजेचं आहे.

आपली सदोष वृत्ती वा वृत्तीतील दोष दूर करण्यासाठी वा घालवण्यासाठी, एकदा ते दोष ओळखून स्वीकृत केल्या नंतर, मनाला त्यासाठी तयार करणं हे खूप मोठं आव्हान आहे. मुळात दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ पाहणारे आपण, आपले दोष पाहायला गेलो तर पर्वता एवढे दिसतील. आता ते दिसल्यावर त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणं हे खूप मोठं आव्हानच आहे. 

त्यासाठी आधी मनाला शांत करून, ती शांतता सुप्त मनात झिरपत जाणं महत्वाचं आहे. म्हणूनच त्यासाठी स्थिर चित्ताने, स्थिरपणे एकामार्गी होऊन नाम घेणे आणि महत्वाचं म्हणजे नामावर मन स्थिर करणं हे पहिलं ध्येय असलं पाहिजे. ते साध्य करण्यासाठी, स्थिर बैठक जरुरी आहे. यासाठी आधी आपल्या सोयीचं सहजासन लक्षात घ्यावं. एकदा आपलं सहजासन लक्षात आलं की, त्या सहजासनात स्थिर होऊन आपलं निश्चित केलेलं नाम जिव्हेद्वारे, वैखरीने घेण्यास सुरुवात करावी. 

वैखरीने नाम घेत असताना, फक्त आणि फक्त नाम व आपण दोनच गोष्टी या जगात शिल्लक आहेत, अशी संकल्पना मनात योजावी. एकदा हे मनात योजलं की, आपण फक्त नाम सोडून बाकी कसलाही विचार करणार नाही. या एका संकल्पनेवर मन स्थिर झालं की, नामावर स्थिर व्हायला सुरुवात होईल. 

या नामात हरवून जाण्याचा अभ्यास योग्य पद्धतीने होत आहे हे लक्षात आल्यावर, मग आपल्या अभ्यास केलेल्या वृत्तीतील दोषांवर लक्ष द्यावे, किंवा ते दोष मनात चिंतावेत, जेणेकरून मनाला त्यांची जाणीव होईल. मन ते स्वीकारून अस्थिर होईल. हरकत नाही होऊ द्या अस्थिर. ही तात्पुरती स्थिती आहे. त्या अस्थिर होण्याचा देखील अभ्यास करावा. 

हा अभ्यास पुढील कृतीसाठी जरुरी आहे. त्यावर उद्याच्या लेखात विचार करूया. पण तरीही तोपर्यंत नामाचा नेट सोडू नका. कारण जसं मोबाईलवर नेट (इंग्रजी शब्द) अस्थिर झाल्यावर संदेशाची देवाण घेवाण मंदावते, त्याचप्रमाणे नामाचा वा कोणत्याही साधनेचा नेट (मराठी शब्द) अर्थात जोर ओसरल्यानंतर वा कमी जास्त केल्यानंतर, मनाच्या स्थिर होण्यावर परिणाम होतो. म्हणून नेटाने नाम घ्या म्हणजे मनाचं नेटवर्क स्थिर व्हायला मदत होईल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...