Skip to main content

भोग आणि ईश्वर १८५

 भोग आणि ईश्वर  १८५

सृष्टीकर्ता आणि समस्त ब्रह्मांडाचा मालक हा वैज्ञानिक असलाच पाहिजे, कारण त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी नियमधारीत आहेत. म्हणजेच काही गोष्टी स्थिर आणि काही गोष्टी चल आहेत. जन्म मृत्यू, ऋतुचक्र, काळ व काळाचं गणित, ग्रह तारे यांच्या सीमा, गती, परीघ, फिरण्याचा कालावधी हे सर्व गणिती नियमांना धरून आहे. 

आज हजारो लाखो करोडो वर्ष झाली तरीही गतीत व गणितात एका सूक्ष्म सेकंदाचासुद्धा फरक संभवत नाही. मागे हजारो वर्षे जाऊन वा पुढील हजारो वर्षांचे गणित मांडून आपण त्या वर्षातील एखादा दिवस बघू शकतो आणि तो त्याच दिवशी येईल वा येतो. कोणता ग्रह कोणत्या परिघातून कधी जाणार, पृथ्वी सूर्य चंद्र यांच्या जवळ वा लांब कधी येईल वा जाईल हे हजारो वर्षांचं अचूक गणित आजही मांडून ते ताडता येऊ शकतं.

कोणी म्हणतील की हे गणित वा शास्त्र शेवटी मानवी मेंदूनेच शोधलं ना. पण ज्या आधारावर शोधलं, तो ग्रह ताऱ्यांचा मार्ग, दिशा, गती आपण नाही ना ठरवली आणि आपण नाही निर्माण केली. कोण्या  अज्ञात शक्तीने निर्माण केली असं गृहीत धरलं, तर त्या शक्तीकडे हे शास्त्र कुठून आलं. म्हणजे कुठंतरी हा पेच एका क्ष वर येऊन अडकणारच. याच क्ष ला प्राचीन ऋषीमुनी यांनी जाणून समजून पाहून शास्त्र बद्ध ओवीबद्ध व संज्ञाबद्ध केलं. त्याच्याबद्दल समाजाला विश्वाला ज्ञान मिळावं म्हणून त्याच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवून ती मांडली. 

त्यांच्यापर्यंत पोचण्याचे मार्ग, लागणारी शक्ती, शास्त्र, पद्धती, सूत्रबद्ध करून अनेकानेक पिढ्यांची सोय, सनातन धर्माच्या छत्राखाली मांडून, त्यातून वेळोवेळी सार काढलं. कालानुरूप त्याच्या पद्धती बदलत गेल्या. पण मुख्य उद्देश एकच त्या विश्वनिर्मात्यापर्यँत पोचणं.  का पोचायचं कारण तरच जन्म मृत्युच्या चक्रातून सुटका होईल. ती कर्म गतीच्या फेऱ्यावर आणि कर्मबंधनावर अवलंबून आहे, कर्मगती कर्माच्या बद्धतेवर अवलंबून आहे. हा व्यूह भेदण्या साठी बद्ध कर्म कमी करणं.

बद्ध करणारं कर्म कमी करण्याचा मार्ग अकर्मी होणं. अकर्मी होण्यासाठी सर्व कर्मफल श्रीचरणी अर्पण करून मार्गस्थ होणं. श्रीचरणी कर्म अर्पण कसं करणार, तर प्रत्येक कर्मात त्याचं स्मरण करणं आणि स्मरणात कर्मरत राहणं. हे एवढं सर्व नियमांत बांधून आपल्यापर्यंत पोचवण्याचं आणि नित्य त्यासाठी या जगतात अनेक रुपात अनेक देहात, येऊन, 

सद्गुरू संत महंत, ऋषीमुनी अश्या अनेक देहात प्रकटून पुनः पुनःमानवाला मार्गभ्रष्ट होण्यापासून रोखणाऱ्या, त्याच्या रक्षणार्थ सज्ज असणाऱ्या आणि कर्मगतीचं मर्म ठसवणाऱ्या विश्वाच्या मालक चालकाला तो अस्तित्वात नाही, हे म्हणताना, हे सर्व चक्र जे समोर दिसत आहे, जन्म आहे,मृत्यू आहे, विश्व आहे, नियमांत बांधलेलं जगाचं गणित आहे तरीही फक्त वैयक्तिक अनुभवाच्या आधारावर देव वा विश्वाचा निर्माता श्रेष्ठ वैज्ञानिक अस्तित्वात नाही, हे म्हणताना कसा काय विचार करत नाहीत हे तो ईश्वरच जाणे.

असो आपण गेले तीन भाग नास्तिकता या विषयावर चर्चा केली. तरीही आपण आपल्या मार्गापासून पथभ्रष्ट होता कामा नये. म्हणूनच नाम घ्या, साधनेत रहा. उद्या पुन्हा चिंतनासाठी भेटूया. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...