Skip to main content

भोग आणि ईश्वर २०८

भोग आणि ईश्वर  २०८

खरतर कर्म ज्ञान व भक्ती या तिन्ही योगांबद्दल आपण विस्ताराने बोललो, तरीही काही राहिल्याची जाणीव झाल्यामुळे पुन्हा थोडं त्याविषयी. कर्ममार्गी आणि ज्ञानी अर्थात मुमुक्षु हे आपल्या मार्गाने उन्नत होत जातात. ज्ञानाने ज्ञानी जनांच्या जाणीवा प्रगल्भ होत जातात आणि तसतसा जीवनाकडे, नैतिकतेकडे, संसाराकडे, सुख दुःख वासना माया याकडे बघण्याची वेगळी दृष्टी प्राप्त झालेली असते. याबाबत अधिक सुजाणता आल्यामुळे त्यांना स्थितप्रज्ञता येत जाते. 

स्थितप्रज्ञ म्हणजे जो सुख दुःख, आयुष्यातील चढउतार, भावभावना या सर्वांतून मुक्त झालेला असतो. म्हणजेच मनाच्या अश्या अवस्थेला पोचलेला असतो की, जिथे काही मिळवायचं किंवा काही गमवायचं नसतं. मन ज्ञानयुक्त स्थितीला गेल्यामुळे घडणारी प्रत्येक गोष्ट ही 
मायेचं बंधन आहे आणि मी आता त्यापासून मुक्त होऊन पुढे आलो आहे, ही जाणीव जागृत झालेली असते.  त्यामुळे हे बांधनाचे दोर मला आता बांधू शकत नाहीत. मनाची स्थिती ही फक्त आणि फक्त एका ध्येयावर स्थिर असते. 

ते ध्येय म्हणजे आत्मतत्वाचं परमात्मतत्वात सामावलं जाणं. या स्थितीप्रत ज्ञानी आलेला असतो की, मनाला संसाराकडे, मायेकडे, विषयाकडे घेऊन जाणारे सर्व क्षण, घडणाऱ्या सर्व घटना, कृती या सर्वांची जाणीव जागी झालेली असते. ज्याची प्रज्ञा स्थिर किंवा एका तत्वावर स्थित झालेली असल्यामुळे, मनाच्या सुक्ष्मतील सूक्ष्म, संवेदना स्थिर झालेल्या असतात. 

निर्गुण निराकार ब्रम्हाचं ज्ञान झाल्यामुळे, आत्मा मन प्रज्ञा आणि देह यांचा समसमा संयोग होऊन, एकतानता साध्य झालेली स्थिती आलेली असते. पूर्ण ब्रम्ह हे सत्य आणि मायाकारी जगत हे मिथ्या अर्थात कल्पना विश्वातील आहे, ही जाणीव जागृत झाल्यामुळे आता जगातील घडामोडीतून मन बाहेर येऊन, परब्रम्हतत्वावर ते स्थिर असतं. ओढ त्या परब्रम्हतत्वाकडे लावून, देहाचे भोग, उपभोग, देहाच्या जाणिवा यातून मन बाहेर आलेलं असतं. 

मी आणि देह या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि जो भोगतंय तो देह, जो सुखाची, आनंदाची कांक्षा अर्थात कामना करतोय तो देह आहे. मी याहून भिन्न आहे. मी स्वयं आत्मा असल्यामुळे,  मला या जगतातून काही प्राप्त करायचं नाहीये. देहाला देहाच्या कमीतकमी गरजा दिल्यानंतर बाकी शक्ती, बुद्धी व मन या तिन्ही ईश्वरी शक्तींचा उपयोग फक्त आणि फक्त त्या परमेश्वरी शक्तीच्या प्राप्तीसाठीच करायचा  आहे, या ज्ञानाप्रत प्रज्ञा व मन आलेलं असतं.

हा देह फक्त एक ईश्वरी साधन आहे, विषय वासना व मायामुक्त होऊन, ईश्वराच्या प्राप्तीसाठीचं. प्रज्ञेची स्थिरता, मनाची शांती आणि आत्म्याच्या संवेदना व आत्म्याची युगानुयुगाची गरज ज्ञात झाल्यामुळे चित्त स्थिर झालेलं असतं. ज्ञानाने आलेलं मुमुक्षत्व आणि प्राप्ती साठी एक ईश्वर याव्यतिरिक्त काहीही शिल्लक राहिलेलं नसल्यामुळे, मन पूर्ण अंतर्मुख होऊन, आत आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेलं असतं. 

अशी स्थिती , स्थिरता, जागृती, मुमुक्षत्व यायला अर्थातच ज्ञानासोबत ईश्वरी कृपा प्राप्त होणं हे अत्यंत जरुरी आहे. कारण सर्वकाही ज्याच्यासाठी आहे, तो कोण हे ज्ञात झालेलं असल्यामुळे ईश्वरचिंतन हे पूर्ण जागृतीने होऊ लागलेलं असतं. या जगतात येण्याचा उद्देश हा ज्ञात झालेला असतो.  मन शांत निर्विकार झालेलं असल्यामुळे ज्ञानी मनुष्य एका विलक्षण शांतीचा अनुभव घेत असतो.

यावर अजून चिंतन करू पुढच्या लेखात तोपर्यंत नाम घ्या त्याने अनेक योग साधतील. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...