भोग आणि ईश्वर २०६
योगाबद्दल चर्चा करताना आपण ज्ञानयोग आणि भक्तियोग यावर प्रदीर्घ चर्चा केली. योग हा शब्द श्रीमद्भगवद्गीतेत विस्तृतपणे कथन करताना भगवान श्रीकृष्ण यांनी अजून एक योग सांगितला . तो म्हणजे कर्मयोग. कर्माने प्राप्त संचित भोगत असताना पुढील कर्मभोग भोगायला लागू नये म्हणून खूप विचारपूर्वक हा योग सांगितला आहे.
मुळात प्रत्येक मनुष्य हा कर्मरत असतोच असतो. म्हणजे एकाच वेळी तो मागील हिशोब चुकता करत असतानाच पुढील हिशोबाच्या वह्या स्वहस्ते निर्माण करत असतो. हे कळतनकळतपणे घडत असतं खरतर घडत असतं या शब्दात, आपोआप असं सूतोवाच होतं, असा अर्थ अभिप्रेत आहे. पण इथे तसा अर्थ अपेक्षित आहेसुद्धा आणि नाहीसुद्धा.
आहे या अर्थाने की, आपण प्रत्येक कर्म करताना किंवा आधीच्या कर्माचे भोग भोगताना, नकळत पुढील कर्मात बद्ध होतो म्हणून आपोआप असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे आणि नाही याअर्थी की, कर्माची ही बद्ध करणारी साखळी, आपण जाणीव आणि अज्ञान अश्या दोन्ही पातळीवर जाऊन करत असतो, म्हणून नाहीसुद्धा. थोडसं गोंधळात टाकणारं आहे. म्हणून आपण उदाहरणं घेऊन सोप्प करूया.
ज्यावेळी आपण नवीन कर्म करतो आणि त्याचवेळी मागील हिशोबाचे भोग किंवा उपभोग आपल्या वाट्याला येतात, त्यावेळी आपण चालू कर्म आणि भोग यांचं चुकीचं गणित मांडतो आणि अकारण त्याचा गुंता तयार करतो. कारण चालू कर्म आणि मागील भोग या दोन भिन्न गोष्टी आहेत. पण मन त्यात तशी तफावत वा भेद करत नाही. म्हणजेच आपण आपोआप त्या साखळीत बद्ध होतच जातो. जसं मी आज ठरवलं की, मला ऋणमुक्त व्हायचं आहे आणि त्याचवेळी एखादी नड अशी येते की, नवीन ऋण काढण्याशिवाय पर्याय राहात नाही. म्हणजे ही झाली नकळतपणे घडलेली कर्मबद्धता.
याव्यतिरिक्त आपण जाणीवपूर्वक अधोगतीने, वासनेच्या आहारी जाऊन, मद मत्सर द्वेष आदींच्या आधीन होऊन, मायेच्या प्रभावात चुकीचं कर्म करतो वा चुकीचा मार्ग धरतो, त्यावेळी आपण जाणीवपूर्वक बद्ध कर्म करतो. म्हणजेच कळत वा नकळत, जाणीवपूर्वक वा अज्ञानातून आपण कर्मबद्ध साखळी तयार करतोच करतो. ही साखळी आपलं ऋण तयार करत जाते.
या साखळीत फक्त भोगच असतात असं नाही. तर चांगली कर्म, म्हणजेच दिलेलं ऋणसुद्धा असू शकेल. मग ते ज्याचं बाकी आहे, त्याने ते फेडून, आपल्याला ऋण मुक्त करेपर्यंत, आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडूच शकत नाही. त्यामुळे आपली बद्धता चांगल्या व वाईट दोन्ही कर्मात आहेच. म्हणजेच अश्या ज्ञात व अज्ञात आणि चांगल्या व वाईट दोन्ही कर्मांचा हिशोब चुकता करणं हे अनंतापर्यंत सुरू राहणार.
पण आता यातून मार्ग कसा आणि काय काढायचा हा मोठा गहन प्रश्न आहे. याचंच उत्तर भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत दिलेलं आहे. निष्काम कर्मयोगी हो. हे साध्य कसं होणार. याचा उपाय सांगताना प्रभू म्हणतात की, आधीच्या सर्व कर्मफलाची आशा , आस, इच्छा आणि कामना त्याग. ती सर्व फल इच्छा मला अर्थात भगवंताला अर्पण करायची.
आता अशी इच्छा वा भावभावना नक्की कशी अर्पण करायची. तर येणाऱ्या भोगातून वा उपभोगातून मनाला निवृत्त करायचं. आलेले वा येणारे सर्व भोग हे ईश्वराचे आहेत, माझे नाहीत, या जाणिवेने पेलायचे. म्हणजे सुखात आणि दुःखात निर्विकार होऊन जगायचं. ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवू, पण उद्या. आज इथेच थांबुया. तोपर्यंत नाम घेतच रहा, तेच तुमचं तारणहार आहे.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. आजच भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून दिले आहेत. खालील लिंकवर क्लीक केल्यावर माझ्या चॅनेलवर आपण जाल, त्यानंतर तिथे Video option वर क्लिक करून आपण तिथे पोस्ट केलेले video ऐकू शकता. Video ऐकून झाल्यावर bell icon प्रेस करून चॅनेल subscribe करायला विसरू नका, म्हणजे पुढचे सर्व नोटिफिकेशन आपल्या यू ट्यूब पेजवर येतील. धन्यवाद.
भोग आणि ईश्वर यू ट्युब चॅनेल लिंक
https://www.youtube.com/channel/UCdwwjep_mL7Jrt7xrd8SAjA
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment