Skip to main content

भोग आणि ईश्वर ८०

भोग आणि ईश्वर  ८०
  
आठवणींचा मागोवा घेणं थांबवून, त्या जशा येतील तशाच जातील हा विचार डोक्यात ठेवून, मुख्य म्हणजे त्यांचा गुंता होऊ न देता, मनातील विचारांचा ओघ कमी करत, किंवा त्यातील चांगला विचार घेऊन पुढे जात, मनाला एका शांत स्थानकावर आणायचं. हे जाणीवपूर्वक करत असतानाच, आपला नामस्मरणाचा ध्यास नित्य सुरूच ठेवायचा. 

ध्यास म्हणजे काय. ध्येयाकड़े जाण्याची आस म्हणजे ध्यास, ध्येयाशी आसक्त होण्याची आस, ध्येयासाठी प्रत्येक श्वास म्हणजे ध्यास. एखाद्या गोष्टीसाठी माणूस ज्यावेळी स्वतःला झोकून देतो आणि नित्य त्याच गोष्टीचा विचार करतो, त्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं म्हणतात. ध्येय जितकं शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक तितकं त्याच्या प्राप्तीसाठी झटणं उत्तम आहे आणि त्याचा ध्यास श्रेयस्कर असतो. 

ध्येयवेडा माणूस प्रसंगी तहानभूक विसरून आपले कष्ट सुरू ठेवतो. भौतिक जगतात माणूस आयुष्यात अनेक ध्येयं निश्चित करतो आणि त्यांच्या पाठलागासाठी तारुण्यातील  आयुष्याचे मौल्यवान क्षण वेचतो आणि त्या ध्येयाला मिळवण्यात यशस्वी होतो. यात गैर काहीच नाही. पण हीच ध्येयासक्ती अध्यात्मिक पातळीवर निश्चित करताना माणूस नफातोटा, हे सर्वसामान्य कोष्टक वापरतो आणि ध्येय म्हणून अध्यात्मिक उन्नत्ती न ठरवता, वेळ मिळाला तर करण्याचं साधन म्हणून बघतो.

मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आयुष्याची वर्ष सत्तर ते ऐंशी त्यातील पहिली वीस बावीस वर्ष शिक्षणासाठी जातात, त्यानंतर व्यावहारिक पातळीवर ध्येय ठरवून, ते साध्य करण्यासाठी नोकरी वा व्यवसाय करून तद्नंतर सांसारिक जबाबदारी शिरावर घेतो. या सर्वात उणीपुरी तीस वर्षे जातातच.

संसाराच्या जबाबदाऱ्या पेलून, त्यातून बाहेर पडायला, अजून पंचवीस ते तीस वर्षे जातात. त्यानंतर आलेल्या अनुभवातून, जमवलेल्या पुंजीतून, आयुष्याचा ताळेबंद केल्यानंतर, माणूस देवाधर्माचा विचार करतो. या सर्वात प्रारब्धाचे भोग भोगून, माणूस पुढचं संचित सुधारण्याचा विचार कधी करू शकणार आणि ध्येयाचा ध्यास कधी धरू शकणार. म्हणून आपल्या संचिताचा, प्रारब्धाचा आणि पुढील जन्माचा विचार आतापासूनच करून या सर्वांच्या सुधारणेसाठी जितक्या लवकर, जितक्या वेळा नाम सुरू करता येईल तितक्या लवकर नामस्मरण सुरू करा. 

ध्यासच घ्यायचा तर माझं नाम कसं वाढेल, मला मिळेल तितका वेळ, मी नामात कसा घालवीन, मला मनात येणारे विचार नियंत्रित करून, त्यातून अयोग्य पद्धतीने वाया जाणारा वेळ , जास्तीतजास्त नामाच्या साधनेत सत्कारणी कसा लावता येईल, याचा ध्यास धरणे, नामाच्या माध्यमातून मनाची शांतता, एकाग्रता, चिकाटी, स्थैर्य हे प्राप्त कसे करता येईल या सर्व गोष्टीचा विचार करणं, हे ध्येय असावं आणि ते साध्य करण्याची तळमळ लागावी, ज्यायोगे नामचा ध्यास जडेल, नामावर श्रद्धा दृढ होईल, नामातच रिकामा वेळ जाईल आणि तो सत्कारणी लागेल. 

म्हणून ज्या ज्यावेळी इतर काही विचार मनात येईल, राग क्रोध, मोह, लोभ इत्यादीमध्ये मनाचा तोल जाईल, त्या त्यावेळी नामाचा आधार घेऊन, त्याच्या सहाय्याने, मन स्थिर ठेवून, मनाचा तोल सांभाळता येईल. नामाच्या जपाने जर पापांचे पर्वत नष्ट होऊ शकतात आणि तशी खात्री साधुसंत, महंत, सद्गुरू, सत्पुरुषांनी दिली आहे, तर आपल्या मनातील चुकीच्या विचारांना नियंत्रित करण्याची शक्ती नामात असलीच पाहिजे. म्हणून सर्व काही प्राप्त करण्यासाठी आधी नाम घ्या, तेच नाम आपल्याला ध्येयाच्या प्राप्तीपर्यंत नेईल हे नक्की. 

म्हणून नित्य नामचिंतन करा, नामाचाचं विचार करा आणि नामालाच पुढे करा, अनेक प्रश्नांना मार्ग सापडतील. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...