भोग आणि ईश्वर २००
१ डिसेंबर, २०२० रोजी, खरतर फक्त दोन लेख लिहायचं ठरवून सुरू केलेली ही लेखमाला, आज बघता बघता २०० व्या भागापर्यंत आली. खरतर हा २०० दिवसांचा हा प्रवास, अद्भुत असा होता. ही मालिका किंवा यातील प्रत्येक लेख लिहिताना माझ्या व्यक्तिगत विचार सरणीत आणि व्यक्तमत्वात खूप फरक पडला, हे नक्कीच. महाराजांनी या ज्ञानाच्या माध्यमातून, लोकांना मार्गदर्शन करताना, अत्यंत कुशलतेने मलासुद्धा घडवत नेलं.
या दोनशे दिवसात अनेक व्यक्तीशी संपर्क आला. काही प्रतिक्रिया देण्याच्या निमित्ताने, काही प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने, काही पुस्तकासंदर्भात बोलण्याच्या निमित्ताने, अश्या विविध कारणांसाठी जनसंपर्क आला. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या, किंबहुना जगाच्या सर्व विभागातून लोकांनी खास फोन करून प्रतिक्रिया दिल्या. वास्तविक पुस्तकाची संकल्पना पूर्णपणे वाचकांचीच. ती इतक्या उत्तमरीतीने प्रत्यक्षात येईल हे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. किंबहुना एका क्षणाला ही कल्पना सोडून द्यावी असाही विचार आला.
पण त्या स्थितीत एक वाचक आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या एका बालमित्राला ही गोष्ट समजल्यावर, त्याने तात्काळ फोन करून,लागेल ती सर्व मदत करण्याचा, इच्छारुप आग्रह, व्यक्त केला आणि मग संकल्पना साकार झाली. प्रथम भाग प्रसिद्ध होऊन, पहिल्या आवृत्तीच्या जवळजवळ सर्व प्रति संपत आल्या. मला आज असं वाटतं की, एखादी गोष्ट सद्गुरूंनी योजली की ती, कशी पूर्ण करून घ्यायची, यासाठीची त्यांची कार्य योजना तयार असते. ते ती जनहितार्थ प्रत्यक्षात आणतातच. यावेळी माध्यम मी होतो इतकंच. असो आता विषयाकडे वळूया.
काल पाहिलेलं चक्र, आत्म्या साठी साधन, साधनेसाठी वृत्ती स्थिर, वृत्ती स्थिर राखण्यासाठी शांत मन, शांत मना साठी स्थिर बुद्धी, स्थिरबुद्धी साठी आत्मसंयम व आत्म संयमासाठी आत्मविश्वास असा हा व्यूह आहे. आत्म विश्वास ही पहिली पायरी झाले आणि उत्तम साधना ही शेवटची पायरी. आत्मविश्वास हा शब्दांची संधी आहे. आत्म म्हणजे स्व आणि विश्वास म्हणजे श्रद्धा. म्हणजेच स्वतःवर विश्वास ही प्रथम अवस्था प्राप्त करता आली पाहिजे. त्यासाठी ज्याची भक्ती करायची, तो ईश्वर वा ते सद्गुरू हे, हृदयातच आहेत, जी जाणीव जागृत करणं महत्वाचं आहे.
ते तिथेच आहेत, ही भूमिका ठामपणे स्वीकारून, ती मनात खोलवर रुजली पाहिजे. तो विश्वास ठेवून पुढे गेलं की, आत्मविश्वास हा नक्कीच प्राप्त होईल. म्हणजेच एका क्षणाची गोष्ट आहे. साधा तर्क लक्षात घ्या की, माझं अस्तित्व माझ्यामुळे नाही, म्हणजेच तो कुणीतरी आहे. शुक्राणूंच्या एका क्षणात सर्व विश्व निर्माण करण्याची ताकद आहे. पण त्या कणात ही ताकद भरली कोणी. अनंत देह निर्माण करणारी ही शक्ती आणि त्या शक्तीला धारण करणारं बीज, हे मानवी शक्तीपलीकडील आहे हे नक्कीच.
म्हणजेच तो जो कोणी आहे, त्याला सगुणात संत महंत यांनी आणून आपली जन्मजन्मीची सोय करून ठेवली आहे. अश्या त्या आत्मरूपात साकार ईश्वराला मानून, प्रसंगी कल्पून, आपण प्रथम पायरीवर नक्कीच ठामपणे पाय ठेवूया. जेणेकरून स्वतःवर अर्थात या देहात वास करणाऱ्या चैतन्यावर विश्वास ठेवून, आत्मविश्वास प्राप्त करूया. आत्मविश्वास हा श्रद्धा असल्याचा प्रथम पुरावा आहे. कारण मी आहे म्हणजे तो आहेच आणि मी नसेन तेंव्हाही तो असेलच, आत्म्याच्या रुपात.
ज्या गोष्टीसाठी हा सर्व भक्तीप्रपंच करायचा व त्याला जागवायचा, तो अणूरूपात, हृदयात आहेच. फक्त आपल्याला साधनेने, त्याला जागृत करून, प्रकट करायचं आहे. त्यासाठीच्या साधनेची सुरवात, विश्वास व श्रद्धा याद्वारे करायची आहे. म्हणून तो विश्वास व श्रद्धा या प्रथम पायरीवर आपण ठामपणे उभे राहूया.
पुढच्या पायऱ्या उद्याच्या लेखातून पाहूया. तोपर्यंत श्रद्धेने नाम घ्या.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment