Skip to main content

भोग आणि ईश्वर २१०

भोग आणि ईश्वर  २१० 

गेले दोन तीन दिवस आपण कर्म ज्ञान यावर विस्तृतपणे चर्चा केली. आज भक्तियोग काय याचा विचार  करू. खरतर भक्ती या विषयावर अखंड आणि प्रचंड लिहिलं गेलंय. अगदी विस्ताराने लिहिलं गेलंय. त्यामुळे हा विषय खूप सोप्पा करून सांगण्यात आला आहेच. मुळात श्रीमद्भागवद्गीतेत या विषयावर प्रत्यक्ष भगवंतांनी निवेदन आणि विवेचन केल्यानंतर पुन्हा यावर बोलण्यासारखं उरत नाही. 

पण याचं कारण, या विषयावरील उपलब्ध प्रचंड लिखाण वा विवेचन वा प्रवचनं नसून, भक्ती हा मुळातच समज ण्याचा, जाणण्याचा विषय नसून, तो फक्त अनुभवण्याचा विषय आहे. भक्ती म्हणजे मनात एखाद्या गोष्टी, व्यक्ती  विषयी असलेलं प्रेम, आपुलकी जिव्हाळा हे व्यक्त करण्याचा मार्ग. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो, तर सतत , नित्य, क्षणोक्षणी फक्त त्याच व्यक्तीचा विचार करतो. 

म्हणजेच नित्य त्याच व्यक्तीचं मनात, हृदयात, आठवणीत
चिंतन करतो, मनन करतो आणि स्मरण करतो. असं एखाद्या विषयी चिंतन स्मरण करताना, त्याचं आणि आपलं काही नातं असतं वा संबंध असतो.  त्या संबंधातून हे प्रेम जन्म घेतं. मग तो नातेसंबंध आई मुलाचा वा मुलीचा असेल, मैत्रीचा असेल, पतीपत्नीचा असेल वा इतर कोणत्याही नातेसंबंधांचा असेल. पण तसा संबंध हृदयातून आणि मनातून आपण मानलेला वा जन्मापासून सहवासाने आलेला असतो. 

म्हणजे जन्म किंवा ऋण यावर हा संबंध अवलंबून असतो हे नक्की. अर्थात जन्म हासुद्धा प्रारब्ध, संचित यावर अवलंबून असतो. म्हणजेच मागील ऋणानुबंधांवर हे प्रेम असणं अवलंबून आहे, हे नक्कीच. हे ऋण सुरू होतात, पहिल्या जन्मापासून. अर्थात शून्यातून सुरू झालेले ऋण पुढे जन्मजन्म सुरू राहतात. कारण ते कर्माने बद्ध असतात. म्हणजेच या नश्वर देहाने एका जन्मात जोडलेले संबंध, आत्मा पुढे अनेक जन्मात व अनेक देहात, ते ऋण वा ऋणाची साखळी पूर्ण होइपर्यंत वागवतो, निभावतो.

या सर्व प्रेमाच्या संबंधांची सुरवात देह धारण केल्यामुळे सुरू होते, असते आणि राहते. पण मुळात आपण ज्या परमअंशाचा अंशरूप भाग आहोत आणि ज्याच्यापासून 
वियोगामुळे या नश्वर देहात आलो, त्याच्यापासून ताटातूट झाल्याची जाणीव, मूळ आत्मरूपाला वा आत्मतत्वाला सतावत असणार, याची जाणीव, त्यावेळी जागृत होईल, ज्यावेळी आपण पूर्ण आत्म्यापासून किंवा परा व पश्यंती वाणीने नाम घ्यायला सुरुवात करू. त्या स्थितीला जाणीव खरी जागृत होईल. खरी उमज व समज प्राप्त होईल. ती खरी जागृती. 

ज्ञानोबा माऊलींपासून तुकोबारायांपर्यंत सर्व संतांनी आर्ततेने, कळवळून, काकूळतीस येऊन, हे बोध दिलेत, ते ही जाणीव जागृत व्हावी यासाठी आहे. त्यासाठी भक्तीचा सर्वात सोप्पा आणि सुलभ असा सहजसाध्य मार्ग, जो त्यांनी आचरणात आणून सांगितला तो म्हणजे स्मरण, नित्य त्याचं स्मरण. इतका वेळ प्रेम या विषयावर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की, 

ज्यावेळी देहाच्या ऋणाच्या परतफेडीची उर्मी जन्म घ्यायला लावते आणि आत्मा ते देहरूपात फेडतो, त्यावेळी या समस्त विश्वाची मायमाऊली जगदीश्वर यांच्या पासून दूर झाल्याची जाणीव आत्म्याला कशी स्वस्थ बसू देत असेल. पण ज्यादिवशी ती जाणीव जागृत होईल, त्यादिवशी भक्तीचा, श्रद्धेचा खरा अर्थ लक्षात येईल, जाणवेल आणि मग आर्ततेने मन आपसूक साद घालेलं, स्मरेल, भेटीलागी जिवा लागलीसे आस ......... तेंव्हा ते खरं स्मरण असेल. 

गुरुकृपेचा प्रसाद मागायचा तो यासाठी. कारण देहाचे जन्माचे ऋण जितके फेडाल, तितके चढत जातील, क्षणोक्षणी घडणाऱ्या कर्मातून. मग साध्य काय करायचं, तर त्याच्या स्मरणात, त्याच्या चरणी सर्व कर्मफल अर्पून, त्याला प्राप्त करण्यासाठीची उर्मी, जाग, जाणीव, व्हावी, हेच मागायचं.  देहाचे चोचले, ऋण, कारभार जितके कराल तितके ते वाढणार, असणार व राहणारच. पण ज्यावेळी हा देह माझा नसून, मी आत्मा आहे या जाणिवेने जाग येईल तो खरा सुदिन. 

विषय मोठा आहे, उद्या सुरू ठेवू. पण तोपर्यंत या जाणिवेच्या जागृतीसाठी नाम घ्या, ईश्वरस्मरण करत रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...