भोग आणि ईश्वर १८४
मुळामध्ये मन हेच सर्व कार्यात देहाला प्रेरित करतं, देहाचा व्यापार चालवतं, जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत जी चेतनाशक्ती देहाला कार्यान्वित करते, ती देहाला पुरवून त्या चैतन्यशक्तीला नित्य जागृत ठेवते. या सर्वांचं मोठं प्रतीक म्हणजे कोमामध्ये गेलेली कोणतीही व्यक्ती, त्या व्यक्तीच्या मनातील भावभावना जागृत होताच,शरीराने प्रतिसाद देऊन पुन्हा सर्वसामान्य जीवनात परत आल्याची अनेक उदाहरणं आहेत.
म्हणजेच कुठेतरी जे प्रत्यक्ष दिसत नाही, पण अस्तित्वात आहे, त्या मनालासुद्धा विज्ञान मानतं. म्हणजेच ज्याचा ठावसुद्धा नाही आणि लांबी, रुंदी, उंची, खोली अर्थातच त्रिमिती माहीत नाही, किंवा आकार उकार माहीत नाही म्हणजेच निर्गुण निराकार आहे, त्या मनालासुद्धा विज्ञानाने मान्य केलं. पुन्हा याचा पसारा हा अवकाशासमान आहे,हे देखील विज्ञान जाणतं आणि शास्त्र म्हणून त्याला मान्यता आहे.
त्याचा अभ्यासक्रमात समावेश करून, त्याला एकप्रकारे विज्ञान म्हटले आहे. मग मला सांगा जर, विज्ञानसुद्धा मानतं, जी गोष्ट दिसत नाही पण परिणाम दिसतो अश्या मनाला, आणि त्याच मनाच्या सहाय्याने श्रद्धा, विश्वास, भावभावना, राग, लोभ, क्रोध,मोह, मद, मत्सर इत्यादी गुणदोष विज्ञानाने मान्य केले. त्याचा आधार घेऊन,मानसशास्त्र लिहिलं गेलं. त्याला मान्यता मिळाली, त्याचे तज्ञ तयार झाले, त्यांनी ते विज्ञान जगभर नेलं. म्हणजे जे दिसतच नाही, त्याला विज्ञान कसं काय मान्य करू शकतं. तर तर्काच्या आधारावर. पुढे मी त्या व्यक्तीला प्रश्न केला की, म्हणजेच सर्व गोष्टी दिसल्याच पाहिजेत आणि तरच ते सत्य हा विज्ञानाचा आधार विज्ञान स्वतःच खोटं ठरवतं नाही का.
की, आपल्याला फायदेशीर ते शास्त्र आणि ज्यातून कोणताही लाभ पाश्चात्य जगताला नाही, त्या देव, श्रद्धा, विश्वास, भक्तीभाव या वेडगळ कल्पना हे दुटप्पी धोरण नाहीतर मग काय आहे. मुळात देव नाही ही संकल्पना मांडणारे बहुतांश कोणत्यानाकोणत्यातरी व्यक्तिगत नकारात्मक अनुभवातून गेलेले असतात. ज्यामुळे त्यांची नकारात्मक मानसिकता तयार होते.याच नकारात्मक मानसिकतेतून मग, देव नाही, का तर मला मदत मिळाली नाही आणि माझ्या संकटात देव वा जो कोणी आहे तो धावून आला नाही, म्हणजे तो नाही, असा सरळ सोपा तर्कसिद्धांत मांडून हे लोक मोकळे होतात.
म्हणजेच त्यांच्या मनाला अश्रद्धा या एका भावाचा आधार लागतो. त्यानंतर असे बहुतांश लोक आपल्या मुद्द्याच्या वा भूमिकेच्या समर्थनासाठी पाठिंबा बघतात वा शोधतात. श्रद्धावान, भक्तीवान लोकांना आव्हान देऊन, बरेचदा देव आहे हे सिद्ध करा, असा आग्रहसुद्धा धरतात. अश्यावेळी मी त्यांना सांगतो की, सर्वात प्रथम देवाने , तो आहे हे, सिद्ध करण्याची कोणतीही जबाबदारी मला दिली नाही. दुसरी गोष्ट यासाठी कोणतेही एजंट नेमले नाहीत. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य ते माप कर्मच देतं. त्यामुळे जर, तुझ्या कर्मात तेवढी शक्ती असेल तर जो आहे, तो देव, तो आहे अथवा नाही हे सांगायला, स्वतः येईल.
जर तो देव स्वतः आला नाही तर समज की, तुझ्या सत्तर ऐंशी वर्षांच्या आयुष्यात तू काही न मिळवता, जन्म मात्र अनावश्यक, निरर्थक कर्मात, चिंतनात वाया घालवलास. त्यामुळे ते कर्म सुधारायला तुला मात्र पुढे जन्म घ्यावाच लागेल. कारण एक गोष्ट तुला मान्य करवीच लागेल की, विर्याच्या एका थेंबातील ताकद आणि श्वासाच्या एका स्पंदनाची शक्ती, ज्याने निर्माण केली आणि ती विज्ञानाने मानवाला फक्त संशोधन करून, पृथक्करण करून, जाणायला व शास्त्र म्हणून मांडायला इसवीसनाची दोन हजार वर्षे जावी लागली.
पण तरीही मानवाच्या मतीला हे समजत नाही की, पूर्ण सजीव वा पुनरुत्पादन हा ज्याने या जगाचा गाभा अनादी अनंत वर्षांपूर्वीच या देहात देऊन, या शरीराचं, मनाचं,त्यातील चैतन्याचे विज्ञान रचून ठेवलं, तो रचयिता किती मोठा वैज्ञानिक असेल. मग तू त्याला देव न म्हणता श्रेष्ठ वैज्ञानिक संबोध, काहीच फरक पडत नाही. पण तो सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक पूजनीय,प्रार्थनीय, वंदनीय, आचरणीय, अनुकरणीय, प्रशंसनीय ठरतोच ठरतो. तू मान्य कर अथवा नको करुस. पण त्याने त्याच्या अस्तित्वाला काहीच फरक पडणार नाही. त्याला तू वैज्ञानिक म्हण, मी देव म्हणतो.
यात अजूनही काही मुद्दे वाकी आहेत ते उद्या बघूया. तोपर्यंत त्या सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकाचे गुणगान करा, नाम घ्या. कारण तो शुद्ध भावाचा भुकेला आहे. त्याला तेवढं दिलं तरी पुरतं.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी .
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment