Skip to main content

भोग आणि ईश्वर ७९

भोग आणि ईश्वर  ७९
  
नामाच्या मार्गात पुढे जाताना खरतर, मार्ग सहज व सोप्पा असायला हवा. त्यावर वाटचाल करताना अडचणीच्या गोष्टी सहजी उलगडल्या पाहिजेत. पण सहसा असं घडताना दिसत नाही. त्यातील एक महत्वाचं कारण, माझ्या मते, आपल्या आठवणींचा जुडगा, जो आपण नेहमी डोक्यात आणि मनात बाळगतो आणि मनात त्याचा कुठेतरी पाठलाग करतो, तो नामस्मरण करताना आड येत असावा किंवा येतो.

जुडगा यासाठी म्हटलं की, जुडग्यात अनेक चाव्या नित्य लागणाऱ्या आणि नेहमी न लागणाऱ्या, या आपण जवळ बाळगतो. म्हणून आठवणींचा जुडगा हा शब्द त्यासाठी वापरला. कारण त्या चावीच्या जुडग्याप्रमाणे याही जुडग्यात आपण अनेक आठवणी, काही हव्याश्या, पण बऱ्याचश्या नको असलेल्या, या साठवून, त्यांचं ओझं मनासोबत घेऊन फिरत असतो. त्यांचं वर्गीकरण व पृथक्करण करून त्यांचं नित्य विश्लेषण करून टिकाऊ व टाकाऊ अश्या दोन भागात त्यांचं वाटप करावं.  

टिकाऊ म्हणजे ज्या आठवून, आता इथून पुढे मन विचलित न होता, त्यातून आनंद, उत्साह आणि सकारात्मक भावभावना हाती लागतील, अश्या सर्वच आठवणी येतात. या मर्मबंधात विशेष करून बालपणीच्या सुखकर आणि मन प्रसन्न व प्रफुल्लित करणाऱ्या सुखावह अश्या आठवणी असतात वा असाव्यात. या आठवणी जीवनाला ऊर्जा प्रदान करतात. 

टाकाऊ म्हणजे ज्या वास्तविक अर्थाने त्याज्य आहेत, ज्या आठवून नकारात्मकता वाढीला लागते, ज्यांच्यामुळे मनाचा दाह, ज्वर, ताप वृद्धिंगत होतो, ज्या मनाला कटुता देतात आणि प्रसंगी मनाला बोचणी देतात, ज्या अनेक दिव्य प्रसंगांना समोर आणतात, अश्या अनेक आठवणी या जुडग्यात असतात.

इथे मी पुन्हा एकदा संगणकाचं उदाहरण देईन. खूपदा आपला संगणक नादुरुस्त व अकार्यक्षम होतो आणि त्यासाठी आपण तज्ञाला पाचारण करतो. सदर तज्ञ येऊन परीक्षण करून सांगतो की मेमरी अर्थात आठवणींचा कप्पा वा कुपी ही भरून गेलेली आहे आणि काही फाईल्स काढून टाकल्या, तरच संगणक पुन्हा व्यवस्थित कार्य करू शकेल. कारण सदर फाईल्स उगाचच जागा व्यापून आहेत.

अशावेळी अनेक नको असलेल्या फाईल्स आपण, पाहणी करून काढून टाकतो. काही वेगळ्या करून दुसऱ्या छोट्या डिस्क मध्ये अथवा पेनड्राईव्ह मध्ये साठवून संगणकातून काढतो, काही कायमच्या काढतो अर्थात नाहीश्या करतो. म्हणजेच ज्या फाईल्स कामाच्या नाहीत आणि ज्या जागा व्यापून कार्यात अडथळे निर्माण करतात, त्या फाईल्स काढल्या की संगणकाचं कार्य पुन्हा उत्तमरीतीने सुरू होतं, हा आपला अनुभव आहे. 

जी गोष्ट मानव निर्मित बुद्धी, मेंदू आणि मनरुप संगणकाची, तीच प्रत्यक्ष मानवी देहातील मेंदू आणि मन यांच्या कार्याबाबत सांगता येईल. ज्याप्रकारे तिथे, जुन्या कामाच्या नको असलेल्या फाईल्सबद्दल आपण केलं, तेच आपल्या मनात आपणच साठवलेल्या कटू आठवणी, जुने हेवेदावे, वादविवाद, दुःख व ताप देणाऱ्या काही घटना, अपमान वाटलेले काही प्रसंग या नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या आठवणीरुप फाईल्स कायम स्वरूपी काढून टाकून, ती जागा आनंद, समाधान, सुख, सकारात्मकता, प्रेमभाव व भगवंताच्या भक्तीरुप आनंदाला देऊन मनाची स्पेस अर्थात जागा प्रफुल्लित, प्रसन्न आणि प्रशांत राखण्याचा अनुभव घ्यायला हरकत नाही. 

किंबहुना नामस्मरण करताना ही पार्श्वभूमी तयार केली, तर याचा नामस्मरणाला खूप सहयोग होतो आणि मनाच्या प्रसन्न व प्रफुल्लित अश्या एका सुंदर बैठकीवर नामस्मरणाचं बीज रोवलं जाऊन, त्यातून अमूल्य असा आनंद मिळतो. 

म्हणून कटू तिखट तुरट असे आठवणींचे लोणचे बाजूला काढून नित्य नामचिंतन करा, सद्विचार येतील  म्हणून नामचं घेऊन पुढे जा, अनेक प्रश्नांना मार्ग सापडतील. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...