Skip to main content

भोग आणि ईश्वर २०३

भोग आणि ईश्वर  २०३
 
कालच्या विषयाला पुढे नेताना, आपण आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग म्हणजे नक्की काय आहे आणि  आपल्या विषयासंदर्भात त्याचा  काय अर्थ व त्याचं काय कार्य आहे ते बघूया. श्रीमद्भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात आणि पन्नासाव्या श्लोकात भगवंतांनी योग शब्दाचा वापर केला आहे. भगवंत म्हणतात 

“समत्वं योग उच्यते”(गीता २/४८)

आणि 

योग: कर्मसु कौशलम्” (गीता २/५०)

आधी अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाचं विवेचन व विश्लेषण करूया. त्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे, समत्व साधल्याने योग उच्च होतो. अर्थात बुद्धी देह व मन यांच्यात समत्व म्हणजेच समन्वय साधून कोणतेही कार्य केल्याने योग अर्थात त्या कार्यात आपला संपूर्ण सहभाग दिल्याने कार्यसिद्धी होते. म्हणजेच योग साधतो. पण म्हणजे आपला संपूर्ण सहभाग हाच योग आहे असं भगवंत म्हणतात. 

पण मग जर हा समन्वय साधला तर योग्य फल मिळेल याची शास्वती भगवंत देतात का.? किंवा तसं म्हणायला वाव आहे का? तर नाही. कारण आधीच्याच श्लोकात भगवंत म्हणतात 

"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणिll" (२/४७)
 
म्हणजेच फक्त कर्म करणं हाच तुझा अधिकार आहे आणि हे कर्म कसं करायचं ते पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात. म्हणजे बुद्धी , देह व मन यांचा संयोग साधून योग्य कर्म करणं म्हणजेच योग साधणं. याचाच अर्थ योग हा शब्द इथे संयोग म्हणजेच समन्वय, संयोग, एकतानता साधणं याअर्थाने आला आहे. 

किंवा भगवंतांनी योजला आहे. पुनः योजणे हा, युज या धातूपासून आलेला शब्द आहे आणि योग हा शब्दसुद्धा युज धातुपासूनच आला आहे. इथे योग हा शब्द, दोन वेगळ्या अर्थाने एकाच श्लोकात भगवन्त वापरतात. एक समत्व म्हणजे मन बुद्धी व देह यांचं समत्व म्हणजे योग आणि  या योगामुळे साध्य होणारा योग, असे एकाच शब्दाचे  दोन अर्थ एकाच श्लोकात त्यांनी वापरून उत्तम योग साधला आहे.

पण लगेच ५० व्या श्लोकात त्याची व्याख्या भगवंत करतात. योग: कर्मसु कौशलम. इथे योग म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितलं आहे. वास्तविक मन, बुद्धी व देह यांचं तादात्म्य पावणं हा योग आहे, हे सांगूनही श्रीकृष्ण पुनः सांगतात की, कर्मातील कुशलता म्हणजे योग. म्हणजेच मन, बुद्धी व देह यांचा समन्वय वा संयोग साधणं म्हणजे योग आहेच. पण कोणतंही कर्म हे प्रत्यक्षात केल्यानंतरच त्याचं सिद्ध होणं व असिद्ध होणं ठरू शकतं. 

म्हणजेच मात्र संकल्प करून उपयोग नाही , तर ते संकल्पिलेलं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं नव्हे तर ते कार्य कुशकतेने करणं हा योग आहे. म्हणजेच मन, बुद्धी, देह यांनी युक्त होऊन, कुशलतापूर्वक कर्म करणं हे योग साधणं होय. योगाचा अजून एक अर्थ जो भक्ती नाम व साधनेसाठी वापरला जातो तो म्हणजे चित्तवृत्ती निरोध करणं. अर्थात विषयाकडे झुकणाऱ्या, विषयासक्त होऊ पहाणाऱ्या आणि विषयात रममाण होऊन कर्मगतीच्या फेऱ्यात आत्म्याला बद्ध करणाऱ्या, चित्त व त्या चित्तात उठणाऱ्या वृत्ती यांचा निरोध अर्थात त्यांना शांत करून फक्त कर्मात एकाग्र होणं म्हणजे उत्तम योग आहे. 

म्हणजेच संयम , विश्वास, शांतता आणि मन बुद्धी व देह यांचं  समत्व साधून त्यायोगे कुशकतेने कर्माचा, साधनेचा योग साधणे म्हणजे कर्मरत राहणे हा अर्थ योग: कर्मसु कौशलम या मध्ये अभिप्रेत आहे. कुशलता म्हणजे एकत्रित करून त्याद्वारे अत्युच्च कर्मयोग साधणे. 

या विषयाचा अजूनही अभ्यास करूया उद्याच्या भागात, पण तोपर्यंत नाम घ्या, नामात रममाण व्हा, नामाचा योग साधा, त्यात स्वतःला समर्पित करा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...