भोग आणि ईश्वर २०७
निर्विकार व्हायचं म्हणजे नक्की काय, तर दुःखात जाणवणारा उद्वेग, दुःख, कारुण्य, भावनेचा आवेग हे मनातून काढून टाकून जगायचं. आपण दुसऱ्याच्या घरात आहोत, अगदी अनोळखी घरात. अश्या वेळी त्यांच्या घरी घडणाऱ्या गोष्टी, आपण त्यांच्या घरातुन बाहेर पडल्यावर फार मनात धरून ठेवणार नाही. खंत वाटेल, मन खिन्न होईल, पण ते काही काळासाठी. त्याचप्रमाणे आपलं दुःख हे परदुःख मानून जगण्याचा प्रयत्न करावा.
खरतर हे सांगणं जितकं सहज आहे, तितकं ते प्रत्यक्षात आणणं, त्याहून अत्यंत कठीण आहे, हे मान्य आहे. पण गीतेत सांगितलेल्या कर्मसिद्धांताचा उपयोग याचसाठी आहे की, मनाला समजावून सांगावं, जे दुःख, दैन्य, तापत्रय, सांसारिक चिंता , मनातील विकार, मनात उत्पन्न विचार , घडणारं कर्म हे सर्व पूर्वसुकृत आहे. म्हणजेच जी पटकथा आपण आधीच लिहून ठेवली, तीच आपण प्रत्यक्षात अनुभवतो, अंमलात आणतो. म्हणजेच या पटकथेचा लेखक, निर्माता आणि मुख्य अभिनेता मीच आहे.
एकदा ही पक्की खात्री झाली, की एक गोष्ट लक्षात येईल, एकदा लिहून झालेल्या कथेत बदल विधातासुद्धा करू शकत नाही. म्हणजे जे आता भोगतोय किंवा उपभोगतोय ते आधीचं केलेलं आहे, ते होणार आणि समोर येईल तसं सहन करावंच लागणार. म्हणून जे आपणच लिहून ठेवलंय, ते आपण फक्त एखाद्या कथे प्रमाणे किंवा मालिकेप्रमाणे पाहायचं. त्याचा जास्त विचार करून अधिक लाभ काहीच नाही. मग काय करायचं.
एकतर जे भोगतोय ते कर्मगतीसुसंगत आहे हे मनाला पटवून द्यायचं. जे फल अजून भोगायचं बाकी आहे, ते ईश्वरार्पण करून, पुढे आपण घडवू शकणाऱ्या पटकथेचा विचार करायचा, जी आपण अजून लिहिली नाही. त्याबद्दल किंवा उरलेली कथा कशी उत्तम लिहू शकतो याबद्दल, विचार करायचा. यासाठी जे भगवंतांनी सांगितलं आहे गीतेत, त्या मार्गांचा अवलंब करायचा. म्हणजे नक्की काय करायचं.
एकतर आपल्या जगण्याचं ध्येय निश्चित करायचं. कारण इथून पुढे आपण जे करू ते पुढील आयुष्याचा किंवा जन्मांचा मार्ग ठरवणार असल्यामुळे, विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे. एकदा ध्येय ठरलं की पुढचा मार्ग सुधारायला हवाय किंवा आहे ते भोगत पुढील आयुष्य किंवा जन्म येईल तसं जगायचं. ध्येयनिश्चिती यासाठी जरुरी आहे.
पण जर एकदा ठरवलं की सुधारण्याचा प्रयत्न करायचा की, मग काही गोष्टी करायच्या. बाकी असलेली कर्मफलं ईश्वरस्वाधीन करायची. हे ज्ञान ग्रहण करायचं की, जे मी करीन ते का करणार आहे आणि कोणत्या उद्देशाने करणार आहे. त्यानंतर पुढील प्रत्येक कर्म हे, ईश्वरो पासना समजून आणि त्याच्या चरणी वाहून, त्यातून आपलं मन काढून घ्यायचं. मन काढून घेणं, म्हणचे कर्म करताना त्याच्या फलाबाबत निरिच्छ राहायचं. अर्थात कर्म मात्र प्रामाणिकपणे करायचं. कारण एकदा मन काढून कर्म केलं की, जो गुंता कर्मफलाच्या आशेमुळे निर्माण होतो, त्यातून जीवाची सुटका होईल.
विषयविस्तार वाढत असल्यामुळे, पुढील चर्चा उद्याच्या भागात करू. तोपर्यंत ईश्वरार्पण भावाने कर्म करा आणि नाम घ्या. अंती नामच आधार राहणार आहे, हे पक्कं ध्यानात असुद्या.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. खालील लिंकवर क्लीक केल्यावर माझ्या चॅनेलवर आपण जाल, त्यानंतर तिथे Video option वर क्लिक करून, आपण तिथे पोस्ट केलेले video ऐकू शकता. Video ऐकून झाल्यावर bell icon प्रेस करून चॅनेल subscribe करायला विसरू नका, म्हणजे पुढचे सर्व नोटिफिकेशन आपल्या यू ट्यूब पेजवर येतील. धन्यवाद.
भोग आणि ईश्वर यू ट्युब चॅनेल लिंक
https://www.youtube.com/channel/UCdwwjep_mL7Jrt7xrd8SAjA
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment