भोग आणि ईश्वर १९०
सद्गुरुकृपा, साधनेची दृढता हे सर्व आपल्या श्रद्धा आणि विश्वास यावर अवलंबून आहेत. मुळात दृढता ही मनाच्या स्थिरतेवर आणि स्थिरता ही मनाच्या बलावर अवलंबून आहे. मनाचं बल किंवा शक्ती हे, येणारे प्रत्येक आघात, भोग आणि उपभोग यांना पचवून पुढे जाण्याच्या मनाच्या क्षमतेवर अवलंबून आहे.
मनाची ही क्षमता मनाला शांत करण्याची हातोटी अर्थात किमया साधण्यावर अवलंबून आहे. खरतर हे एखाद्या अडथळ्याच्या शर्यतीप्रमाणे आहे. पण शर्यतीत आपल्याला पूर्ण कल्पना असते की, आता आपली कसोटी आहे, शारीरिक व मानसिक कुवतीची, शक्तीची. मात्र तिथे आपल्याला माहीत असतं म्हणजेच काही अंशाने किंवा पूर्णांशाने आपण मनाने तयार असतो की, आता मला शर्यतीत भाग घ्यायचा आहे. त्यासाठी आपण तयारी केलेली असते किंवा करत असतो.
पण जीवनाच्या त्या वाटेवर, जिथे आपल्याला मार्ग माहीत नाही, अडथळे समजत नाहीत, तयारीची माहिती नसते, मनाला कल्पनाच नसते, अश्या सर्व स्थितीत कसोटी देणार कशी, कोण आणि कशाची. म्हणजेच हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, आपण कुठून आलो, कुठे जाणार, काय साध्य करायचं, जे साध्य करायचं त्यातील या एका जन्माच्या प्रवासात काय जमू शकेल, या प्रवासात आणि अनोळखी मार्गावर माझा हात कोण धरेल की हा प्रवास मला एकट्याला करायचा आहे, मुळात हे सर्व का करायचं आहे, आजपर्यंत कुठे पोचलो, इथून पुढे कसं जायचं.
या सर्व प्रश्नांना पूर्णतः जाणून घेतलेले मार्गदर्शक हे आपले सद्गुरू असतील आणि या प्रवासातील महत्वाचा साथीदार म्हणजे आपलं मन आणि जाणून घेण्याची स्थिती म्हणजे आत्मज्ञान. अध्यात्म म्हणजे अज्ञान ते ज्ञान हा प्रवास. हा प्रवास करण्यासाठी एक वा अनेक जन्म आणि मनाकडून आत्म्याकडे ते ज्ञान पोहोचणं हे महत्वाचं आहे.
म्हणजे मनाची प्रगल्भता वाढवत नेत आणि त्याद्वारे जाणिवांची उंची वाढायला हवी. त्यासाठी साधनेची चिकाटी वाढवून, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहून, त्याने विचलित न होता, चित्त व वृत्ती स्थिर राखणं महत्वाचं आहे. हा सर्व समतोल साधत, साधना नियमित करत राहणं हेदेखील तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे.
असा हा प्रवास म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर तसा अवघड नाही.पण यात सर्वात मोठा साथीदार असलेलं हे मन अनेक प्रकारच्या भावभावना, कंपनं, संवेदनशीलता, जाणिवा यांचा तोल सांभाळत पुढे जाणार. घडणारे दुःखाचे प्रसंग, त्यांचे आघात, अवचितपणे समोर येणारे धक्के, आयुष्यात प्रिय व्यक्तींचा वियोग, त्याचं दुःखं, आनंद सुख, भरभराट, ऐश्वर्य याद्वारे आयुष्य मनाला एका उंचीवर नेऊन, त्याला दुसऱ्याच मार्गावर घेऊन जाणाऱ्या मायेचे खेळ, हे एवढं सर्व सांभाळत जाणाऱ्या मनाला, खरतर नित्यनवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं.
या सर्वात मनाचा तोल, दृढता, त्यांचीच नियंत्रणात राहू शकते ज्यांचं मन प्रगल्भ आहे, जाणिवा उच्च आहेत आणि दुःख, भोग यांच्या कर्मफलाशी असणाऱ्या संबंधांची कल्पना आहे, त्यांचा त्यांच्या साधनेवर, श्रद्धेवर, विश्वासावर पूर्ण भरवसा आहे. त्या दृढतेमुळे कसलाही विपरीत परिणाम त्यांचं मन आणि जाणिवा होऊ देणार नाहीत.
पण हे सर्व ज्यांना शक्य नाही त्यांचं काय. त्यांना हे सर्व साध्य करण्याचा अधिकार नाही. त्यांना आत्मोन्नतीच्या संधी मिळणार नाहीत का. जर असेल तर कशी मिळेल ती संधी आणि नसेल तर का मिळणार नाही. यावर विस्तृत पणे चर्चा उद्याच्या भागात करूया. पण तोपर्यंत नाम घ्या, श्रद्धा दृढ ठेवा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी .
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment